पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २०१२ ते २०१६ यम कालावधीत झालेल्या बांधकामांतील अनियमिततांबाबत नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी (कॅग) ताशेरे ओढले होते. या बाबत विद्यापीठाने नेमलेल्या समितीकडून चार वर्षांत या समितीकडून कार्यवाहीच झाली नसल्याची माहिती समोर आली असून, विद्यापीठाच्या आज (३० मार्च) होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिसभेत या बाबत गांभीर्याने चर्चा होऊन दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय होणार का, हा प्रश्न आहे. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेची कार्यक्रम पत्रिका अंतिम करण्यात आली आहे. त्यात अधिसभा सदस्यांनी व्यवस्थापन परिषदेला प्रश्नही विचारले आहेत. त्यात कॅगने निदर्शनास आणलेल्या त्रुटींबाबत प्रश्न उपस्थित करत कॅगने ज्यांच्यावर ताशेरे ओढले त्यांच्यावर काय कारवाई केली असे प्रश्न अधिसभा सदस्य गिरीश भवाळकर यांनी विचारला. या प्रश्नाला व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. महेश अबाळे यांनी उत्तर दिले आहे. कॅगच्या अहवालासंदर्भात विद्यापीठाने वित्त व लेखा अधिकारी, डॉ. महेश अबाळे आणि गिरीश भवाळकर यांची समिती नियुक्त केली. या समितीच्या चार बैठका झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर दोषींवरील कारवाईबाबत समितीचे कामकाज सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, २०१२ ते २०१६ या कालावधीत झालेल्या बांधकामांमध्ये अनेक त्रुटी होत्या, त्यामुळे खर्च वाढला, काम पूर्ण होण्यास विलंब झाला. या संदर्भात कॅगने अहवालात ताशेरे ओढले. या संदर्भात अधिसभेतच प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने विद्यापीठाने समिती नियुक्त केली. मात्र चार वर्षांत अधिकाऱ्यांकडून प्रकरणाची माहिती घेण्यात आली, अनियमितांची यादी करण्यात आली. कारवाई करण्याबाबत काहीच हालचाल झालेली नाही. अशा प्रकारे सार्वजनिक निधीचा गैरवापर होणे, त्याबाबत कारवाई न होणे चुकीचे आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफीसाठी आंदोलन करोनामुळे पालक गमावलेल्या ५०७ विद्यार्थ्यांना शुल्कमाफी, १ हजार १३८ विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी देण्यात आल्याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिली आहे. मात्र शुल्कमाफीबाबत अनेक विद्यार्थी अद्यापही वंचित असल्याने आज (३० मार्च) अर्थसंकल्पीय अधिसभेवेळी विद्यापीठात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळय़ासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्टुडंट हेिल्पग हँडचे कुलदीप आंबेकर यांनी ही माहिती दिली. कुलगुरूंची अखेरची अधिसभा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाळ मेमध्ये संपणार असल्याने अर्थसंकल्पीय अधिसभा ही त्यांच्या कार्यकाळातील अखेरची आहे. कुलगुरूंसह अधिसभा सध्या, प्र कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, अधिष्ठाता यांचीही ही अखेरची अधिसभा आहे. त्यामुळे या अधिसभेत केलेल्या कामांचा लेखाजोखा कुलगुरूंकडून मांडण्यात येईल.