राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वातील गट भाजपाबरोबर सरकारमध्ये सहभागी झाला. यानंतर या बंडाबाबत अनेक तर्कवितर्क लावले गेले. यानंतर आता फुटीनंतर पडलेले राष्ट्रवादीतील शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते रविवारी (१ ऑक्टोबर) पुण्यातील जुन्नर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “जे लोक भारतीय जनता पार्टीबरोबर आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असू शकत नाहीत. आज कुणी भाजपाबरोबर जाण्याची भूमिका घेऊन तडजोड करण्याचा विचार करत असतील, तर तो विचार आम्ही स्वीकारणार नाही. त्याचं कारण कालच्या निवडणुकीत, मग ती विधानसभा असो की लोकसभा, लोकांना भाजपाच्या विरोधात मतदान केलं आहे.”

“जनतेने भाजपाच्या विरोधात आम्हाला मतदान केलं असेल, तर…”

“जनतेने भाजपाच्या विरोधात आम्हाला मतदान केलं असेल, तर आम्हाला त्याचा आदर करावा लागेल,” असंही मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.

“कायद्यानुसार निवडणूक आयोगासमोर २/३ पाठिंबा सिद्ध करावा लागतो का?”

निवडणूक आयोगासमोर बाजू कशी मांडणार? पक्षावरील दाव्यासाठी कायद्यानुसार निवडणूक आयोगासमोर २/३ पाठिंबा सिद्ध करावा लागतो का? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, “पक्षावर आपला दावा सिद्ध करण्यासाठी दोन तृतियांश पाठिंबा दाखवावा लागतो, असा कोणताही कायदा नाही. मला निवडणूक आयोगाचं ६ ऑक्टोबरला हजर राहण्याचं समन्स आलं आहे. मी सुनावणीसाठी जाणार आहे. यावेळी आमचे वकिलही हजर राहतील. तेथे आम्ही आमची भूमिका मांडू.”

हेही वाचा : शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”

जुन्नरमधून आमचा उमेदवार कोण? यावरही पवारांनी मत मांडलं. “निवडणुकीला अजून वेळ आहे. त्यामुळे जुन्नरमधून आमचा उमेदवार कोण असणार आहे याबाबत बघू. माध्यमांनी त्याबाबत काळजी करू नये. निवडणुकीत पुणे जिल्हा आणि जुन्नर तालुक्यातील लोकांचा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे. ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत,” असं म्हणत शरद पवारांनी अजित पवार गटाला टोला लगावला.