राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ७ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ‘ईडी’ला तपासात आढळले. त्यानुसार ‘ईडी’ने बुधवारी ही कारवाई केली आहे. त्यावरुन आता भाजपाने नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नारायण राणेंचे उदाहरण देत भाजपाला प्रत्युतर दिले आहे. “नवाब मलिक यांना राजकीय हेतूने अटक करण्यात आली आहे. गेली २० वर्षे नवाब मलिक महाराष्ट्राच्या विधानसभेत आहेत. त्याकाळ हे सर्व दिसले नाही. एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला की त्याला दाऊदाचा जोडीदार म्हटले जाते. कारण नसताना आरोप केले जात आहेत. मला त्याची चिंता नाही कारण कधीकाळी माझ्यावरही आरोप झाले होते. हे लोक एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही,” असे शरद पवार यांनी म्हटले. “काम झालेले नसतानाही मेट्रोचे उद्घाटन”; पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यावरुन शरद पवारांचा टोला “नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. त्यांना आणि कुटुंबीयांना यातना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे जाणूनबुजून केले जात आहे आणि याच्याविरोधात आम्ही संघर्ष करु. नवाब मलिकांना अटक केल्याने राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मला काळजी एकच आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचे सहकारी नारायण राणे यांनाही अटक केल्याचे वाचनात आले होते. नारायण राणेंना अटक केल्यानंतर त्यांना मंत्रीमंडळातून कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे माझ्या पाहण्यात आले नाही. एक न्याय तुम्ही नारायण राणेंना लावता आणि दुसरा न्याय मलिकांना लावता. याचा अर्थ हा सगळा राजकीय हेतूने सुरु असलेला उद्योग आहे, असे शरद पवार म्हणाले. दरम्यान, नबाब मलिक यांच्यावर ईडीच्या कारवाईनंतर अटकेची कारवाई झाली. देशद्रोही खटल्यात मलिक अडकलेले असल्याने त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी भाजपाकडून केली जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. यावेळी भाजपाच्या नेत्यांनी हातामध्ये अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचं बॅनर धरुन घोषणाबाजी केली. यावर राजीनाम्यासाठी विधिमंडळाचे कामकाज रोखण्याच्या विरोधकांच्या इशाऱ्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आघाडीच्या नेत्यांनी विचारांती मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले असल्याचे सांगितलं. कोणाचा राजीनामा घ्यायचा आणि कोणाचा नाही याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असतो. अनेक निर्णय सभागृहातील परिस्थिती पाहून होत असतात, असे अजित पवार यांनी म्हटले.