पुणे : रस्ते तयार करताना अनेकदा गरज नसतानाही गतिरोधक बसविले जात असल्याचे प्रकार समोर आल्याची गंभीर दखल महापालिकेच्या पथ विभागाने घेतली आहे. आवश्यकता असेल आणि पोलिसांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) असल्याशिवाय रस्त्यावर कोठेही गतिरोधक तयार करू नका, अशा स्पष्ट सूचना पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी अभियंत्यांना दिल्या आहेत.
शहरात महापालिकेच्या वतीने रस्त्यांची कामे केली जातात. रस्त्यांची कामे करताना आवश्यकता नसतानाही गतिरोधक केले जातात. तर, काही वेळा स्थानिक राजकीय व्यक्तीच्या दबावाखाली रस्त्याचे काम करणारे ठेकेदार गतिरोधक बसवितात. त्यामुळे अपघात होण्याचे प्रकारही घडलेले आहेत. या पार्श्वभूमीवर पथ विभागाचे प्रमुख पावसकर यांनी या सूचना केल्या आहेत.
पथ विभागाच्या वतीने काही ठिकाणी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे करण्यात आली असली, तरी कामाच्या ठिकाणी खड्ड्यातील खडी बाहेर आली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा, मलनिस्सारण तसेच मेट्रो विभागाची कामे सुरू असून, कामाचा राडारोडा रस्त्यावर पडलेला आहे. हा राडारोडा तातडीने उचलून घेण्याबाबत तसेच त्या ठिकाणी चांगल्या गुणवत्तेचे रस्ते तातडीने तयार करण्याबाबत संबंधित विभागांना कळविण्यात आल्याचेही पावसकर यांनी सांगितले.
संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुढील महिन्यात पुणे शहरात येणार आहे. या दोन्ही पालख्या शहरात मुक्कामी असणार आहेत. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पालखी मार्गावरील सर्व कामे तातडीने पूर्ण केली जाणार आहेत. पावसाळ्याच्या कालावधीत अत्यावश्यक कारण वगळता कोणत्याही अभियंता संवर्गातील सेवकांच्या रजा मंजूर करण्यात येणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
रस्ता तयार करताना कोठेही पाणी साचून राहणार नाही, अशा पद्धतीने डांबरीकरणाची कामे पूर्ण करावीत. रस्त्यांवर खड्डे पडले आहेत का, याची पाहणी जबाबदारी असलेल्या संबंधित अभियंत्यांनी दररोज करावी. तक्रारीची वाट न पाहता रस्त्यांची दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत. – अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग प्रमुख