पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील महत्त्वाचे असलेले पानशेत धरण ७५ टक्के भरले आहे. इतर तिन्ही धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा जमा होत आहे. चारही धरणांच्या परिसरात सोमवारी दिवसभरात तुरळक पावसाने हजेरी लावली. सध्या चारही धरणांमधील पाणीसाठा ७२ टक्क्यांवर पोहोचला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून पाऊस ओसरला आहे. मात्र, पावसाने विश्रांती घेतलेली नाही. तुरळक पाऊस दररोज हजेरी लावत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाणी येण्याचे प्रमाण कमी-अधिक प्रमाणात सुरूच आहे. सध्या पानशेत धरण ७५ टक्के, वरसगाव धरण ७० टक्के, टेमघर धरण ६० टक्के भरले असून खडकवासला हे धरण यापूर्वीच पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. चारही धरणांमध्ये २१.०३ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी चारही धरणांत २५ जुलैपर्यंत २१.३६ टीएमसी म्हणजेच ७३.२८ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ ०.३३ टीएमसीने पाणीसाठा कमी आहे. दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात १३ मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात अनुक्रमे तीन मि.मी. आणि दोन मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात अवघ्या एक मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. धरणांच्या परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने सध्या खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात दिवसभरात २७ मि.मी. पाऊस पडला. या धरणात सध्या ६.६९ टीएमसी म्हणजेच ७८.६१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. जिल्ह्यातील इतर धरणांपैकी येडगाव, कळमोडी, चासकमान ही धरणे १०० टक्के भरलेली आहेत, तर भामा आसखेड, वडीवळे, वीर ही धरणे १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्याच्या सीमेवरील उजनी धरणात ३५.७५ टीएमसी म्हणजेच ६६.७४ टक्के पाणीसाठा जमा झाला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, कंसात टक्क्यांत

टेमघर २.२० (५९.२८), वरसगाव ८.९६ (६९.९३), पानशेत ८.०७ (७५.७६), खडकवासला १.८० (९१.०६), भामा आसखेड ६.९८ (९१), पवना ६.६९ (७८.६१), गुंजवणी ३.०८ (८३.३८), निरा देवघर ७.४१ (६३.१७), भाटघर १६.४१ (६९.८२), वीर ९.२० (९७.८५) आणि उजनी ३५.७५ (६६.७४)