पुणे : राज्यातील करोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच असून, गेल्या २४ तासांत ८९ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यात मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यातील करोना विषाणूचा संसर्ग हा सौम्य उपप्रकारांमुळे होत असल्याचे जनुकीय क्रमनिर्धारणातून समोर आले आहेसार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ८९ रुग्ण आढळले. त्यात मुंबई ३२, पुणे महापालिका २३, पिंपरी-चिंचवड महापालिका ९, पुणे ग्रामीण १, कल्याण महापालिका व छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रत्येकी ४, ठाणे महापालिका, नागपूर महापालिका, सातारा प्रत्येकी ३, चंद्रपूर नवी मुंबई, मीरा भायंदर, रायगड, सांगली, गोंदिया प्रत्येकी १ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात १ जानेवारी ते १० जूनपर्यंत १८ हजार १०३ संशयित करोना रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात १ हजार ५९३ रुग्णांना करोनाचे निदान झाले. त्यात मुंबईत सर्वाधिक ७१९ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील करोनाची सक्रिय रुग्णसंख्या ६१५ असून, ९५९ रुग्ण बरे झाले आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील करोना रुग्णसंख्येतील वाढीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. सध्या करोना रुग्णांमध्ये ओमिक्रॉन प्रकारातील जेएन १, एक्सएफजी आणि एलएफ ७.९ या उपप्रकारांचा संसर्ग आढळून येत आहे. या उपप्रकारांची लक्षणे सौम्य असून, त्यांचा प्रसारही अधिक तीव्रपणे होत नाही, अशी माहिती या बैठकीत राज्य जनुकीय क्रमनिर्धारण समन्वयक डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी करोना संसर्गामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नसून, योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी केले आहे.
राज्यात वर्षभरात १९ रुग्णांचा मृत्यू
राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत करोनाच्या १९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील १८ रुग्ण सहव्याधीग्रस्त होते. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये मूत्रपिंडविकार, कर्करोग, ब्रेन स्ट्रोक, फुफ्फुस विकार, श्वसनविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, क्षयाचा आजार होता. राज्यात श्वसनविकाराच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू असून, त्यांची करोना चाचणी केली जात आहे. याचबरोबर सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये करोना चाचणी आणि उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
काळजी काय घ्यावी?
सर्दी, खोकला असल्यास वैद्यकीय मास्क वापरावा.
खोकताना अथवा शिंकताना रुमालाचा वापर करावा.
श्वसनविकाराच्या रुग्णांनी त्रास जाणवल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवावे.
नियमितपणे हात साबण व पाण्याने अथवा सॅनिटायझरने स्वच्छ करावेत.
हात न धुता डोळे, नाक व तोंडाला स्पर्श करणे टाळावे.