राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा.या मागणीसाठी पुण्यातील अलका टॉकीज चौकात स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांच मागील दहा तासापासून ठिय्या आंदोलन सुरू आहे.या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. तर यामध्ये विशेषत काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि काँग्रेस पक्षाचे सहकार प्रदेश सरचिटणीस बळीराम डोळे हे सकाळपासून विद्यार्थ्यां सोबत ठाण मांडून आहेत. आंदोलनात सहभागी झालेला विद्यार्थी सुहास पाटील म्हणाला की,राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा. ही राज्यातील स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थी वर्गाची भावना आहे.पण याकडे राज्य सरकार आणि आयोग दुर्लक्ष करीत आहे.त्यामुळे आज आम्ही सकाळपासून ठिय्या आंदोलनास बसलो आहे.त्याच दरम्यान आज पुण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते.आंदोलनाच्या ठिकाणाहून केवळ १२ किलोमीटर अंतर होते.देवेंद्र फडणवीस हे काही मिनिटात आंदोलनाच्या ठिकाणी आले असते.मात्र त्यांनी येणे टाळले.मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुस्तीचा फड पाहण्यास वेळ आहे.तर विद्यार्थ्यांचा फड सकाळी १० वाजल्यापासून ७ पर्यन्त सुरू आहे.तो पाहण्यास किंवा विचारपूस करण्यास वेळ नाही.ही दुर्दैवाची गोष्ट असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आयोगाकडून निर्णय घेऊ शकतात.पण का निर्णय घेतला जात नाही.असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.