परीक्षा ऑनलाइन घ्यावी, या मागणीसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाल्याचं आज पाहायला मिळालं. पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद येथे विद्यार्थी या मागणीसाठी रस्त्यावर उतरले. करोना विषाणूच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे मागील दोन वर्षापासून विद्याथ्यांचे शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. मात्र, परीक्षा ऑफलाईन होणार असल्याने विद्यार्थ्यांनी राज्यातील अनेक भागात रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील दहावी बारावीच्या परीक्षा कार्यालयाजवळ ऑफलाईन परीक्षा रद्द करा, असा बोर्ड घेऊन विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.
“आम्हाला वर्षभर ऑनलाइन शिकविण्यात आले असून आता परीक्षाही ऑनलाईन घेणार आहे. तुम्ही वर्षभर ऑनलाइन शिकवता आणि ऑफलाइन परीक्षा घेता, हे योग्य नाही. त्यामुळे ऑफलाइन परीक्षा रद्द करा आणि ऑनलाइन परीक्षा घ्या,” अशी मागणी आंदोलनकर्त्या विद्यार्थिनी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचंही पाहायला मिळालं.
आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, संघटनांनी मुलांना रस्त्यावर आणू नये – वर्षा गायकवाड
”परीक्षा घेत असताना आम्ही सर्व बाबींचा विचार करत आहोत. संघटनांनी मुलांना रस्त्यावर आणणं योग्य नाही. काही गोष्टी बोलायच्या असतील तर ते आमच्याशी चर्चा करू शकतात. आम्ही चर्चा करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. त्यानुसार आम्ही शिक्षण तज्ज्ञांशी देखील चर्चा करू. विद्यार्थ्यांच्या काही सूचना असतील तर त्या ऐकण्यासाठी सरकार व शिक्षण विभाग तयार आहे.” अशी प्रतिक्रिया शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.