scorecardresearch

खत खरेदी- जात प्रकरणावर संसदेत आवाज उठवणार- सुप्रिया सुळे

नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं.

supriya sule pune
(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

पुणे प्रतिनिधी: बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रश्नांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांची पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या सोबत आज बैठक पार पडली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. शेतकऱ्यांना त्यांची जात विचारली जाते ही धक्कादायक बाब असल्याचं त्यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

शेतकर्‍यांना जात विचारली जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजी आहे. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “ही बाब धक्कादायक असून देशातील कोणत्याही शेतकर्‍याला आजपर्यंत कधीही जात विचारली गेली नाही. तसेच मी या निर्णयाचा जाहीर निषेध व्यक्त करते आणि तो निर्णय मागे घेतला पाहिजे. यामागे नक्कीच काही तरी कटकारस्थान असण्याची शक्यता आहे. त्या प्रश्नावर संसदेत आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.”

“शेतकर्‍याच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्याचे पंचनामे झाले नाही. त्यात अधिकार्‍याच्या बदल्या केल्या. यातून या सरकारची मानसिकता दिसून येत आहे. तसेच सर्व मोठे नेते होळी खेळण्यात व्यस्त होते. थोडा वेळ होळी खेळले असते आणि मंत्रालयात जाऊन यंत्रणा हलवली असती. तर पंचनामे रखडले नसते.” अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली.

आणखी वाचा- बारामती लोकसभा मतदारसंघातील समस्या न सुटल्यास आंदोलन करणार: खासदार सुप्रिया सुळे

पुण्यातील मासिक पाळीदरम्यानच्या अघोरी कृत्यावर प्रतिक्रिया

पुण्यातील एका महिले सोबत मासिक पाळीत अघोरी कृत्य केल्याची घटना घडली आहे.त्याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मागील सहा महिन्यात गुन्हेगारीच प्रमाण अधिक प्रमाणात वाढलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कोयता गँग सारख्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर आल्या.त्यामुळे सर्व घटना लक्षात घेता गृह मंत्रालयाच अपयश आहे. असं म्हणत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली.

हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियांवरील कारवाईवर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबीय आणि अन्य सदस्यवर पुन्हा ईडी मार्फत कारवाई सुरू आहे. त्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मला त्या गोष्टी बाबत काहीच आश्चर्य वाटत नाही. मागील अनेक वर्षांत ईडी, सीबीआयकडून विरोधकांना नोटिसा पाठविणे हे काही नवीन नाही. तसेच विरोधकांना प्रलोभन किंवा भीती दाखवून पक्षामध्ये प्रवेश दिला जात आहे.” आजवर 90 ते 95 टक्के केसेस ईडी, सीबीआय मार्फत विरोधकांवर झाल्याचं त्यांनी सांगितले.

आणखी वाचा- २०२४ मध्ये चिंचवडला राष्ट्रवादीचा आमदार असणार; आभार मेळाव्यात कार्यकर्त्यांचा निर्धार

नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा नाही

नागालँड येथे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “याबाबत शरद पवार यांनी भूमिका मांडली आहे. तसेच भाजपाला पाठिंबा दिला नाही. राज्यात १०५ आमदार भाजपाचे असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फायनल सही असते. त्यामुळे यावर देवेंद्र फडणवीस यांना अधिक विचारू शकता. या सरकारमध्ये १०५ आमदाराचं चालतं की एकनाथ शिंदे यांचं चालतं?” अशा शब्दात भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी टोला लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज होतील: सुप्रिया सुळे

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका केली आहे. त्या प्रश्नावर आज खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमी सांगितले आहे. कोणाच्याही नावावर योजना आणू नका आणि त्यांच्या नावावर तर करूच नका असा आग्रह आहे. तसेच काही कुटुंबाची नाव देण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला विरोध दर्शविला होता. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री या पदाच्या नावाने योजना तयार करा. मी ‘नामो’ नावाची योजना वाचल्यानंतर एक चिंता वाटते. ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या सर्व गोष्टी आवडत नाही. तर ‘नामो’ नावाची योजना कशी काढली. याबाबत काहीच समजलं नसून त्याबद्दल आश्चर्य वाटत आहे. काही योजनाबद्दल सरकाराचं अभिनंदन, पण तुमच्याकडे तेवढा निधी आहे का?” असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केला.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-03-2023 at 16:05 IST