गोखले राज्यशास्त्र, अर्थशास्त्र संस्थेत शाश्वत विकास केंद्र भावी पिढ्यांच्या वाढ आणि समृद्धीची गुरुकिल्ली म्हणून शाश्वत विकासाचा मार्ग अवलंबणे आवश्यक आहे. देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठीही शाश्वत विकासाचे धोरण अवलंबणे उपयुक्त ठरणार आहे, असे मत गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतर्फे सुरु करण्यात आलेल्या शाश्वत विकास केंद्राच्या (सस्टेनेबल डेव्हलपमेंट सेंटर) उद्घाटनानिमित्त उपस्थित तज्ज्ञांनी व्यक्त केले. हेही वाचा >>> पुणे : ‘थर्टी फर्स्ट’ला १२१ मद्यपी वाहनचालक पोलिसांच्या जाळ्यात गोखले संस्थेच्या आवारात शनिवारी या केंद्राची सुरुवात झाली. यावेळी इन्स्टिट्यूटचे कुलगुरु डॉ. अजित रानडे, केपीआयटी टेक्नॉलॉजीचे संस्थापक डॉ. रवी पंडित, प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे सचिव मिलिंद देशमुख आणि कर्नल कपिल जोध उपस्थित होते. केपीआयटी टेक्नॉलॉजी आणि प्राज इंडस्ट्रीजचे मोठे सहकार्य या केंद्राच्या उभारणीसाठी लाभले आहे. गोखले इन्स्टिट्यूट आणि केपीआयटी टेक्नॉलॉजी तसेच प्राज इंडस्ट्रीज यांच्यातील सामंजस्य करारावर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली. डॉ. रवी पंडित म्हणाले, शाश्वत विकासाबाबत जाण वाढत असताना देश पातळीवर विशिष्ट धोरणे आणि उपाय विकसित करण्यासाठी भरीव कामाची गरज आहे. हेही वाचा >>> पुणे : विमानतळावरील प्रवासी सर्वेक्षणात रविवारी शून्य करोना रुग्ण; २८७५ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी; अवघे सहा रुग्ण आढळले शाश्वत विकासाचे पर्याय हे केवळ पर्यावरण दृष्टीने नाही तर दीर्घकालीन तसेच आर्थिक निकषावर व्यवहार्य असणेही आवश्यक आहे. डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, कार्बन उत्सर्जन रोखण्याच्या प्रवासात तंत्रज्ञानाची साथ मिळणे महत्त्वाचे आहे. दळणवळण क्षेत्रातील कार्बन उत्सर्जन नियंत्रणात आणण्यासाठी रस्ते, हवाई आणि जलवाहतुकीच्या क्षेत्रात शाश्वत पर्याय देणे गरजेचे आहे. त्याद्वारे देशाला ऊर्जा क्षेत्रात संपूर्ण स्वावलंबी होणे शक्य आहे, असेही डॉ. चौधरी म्हणाले. पुणे शहराजवळील एक गाव शून्य कार्बन उत्सर्जनाचे उदाहरण म्हणून विकसित करण्यात येणार असल्याचे डॉ. चौधरी यांनी यावेळी स्पष्ट केले. डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना परवडेल असे शाश्वत ऊर्जेचे पर्याय विकसित करणे हे प्रभावी संशोधनासाठी महत्त्वाचे आहे. प्रचंड लोकसंख्येला पुरेशी उत्पादने कमी संसाधनांसह निर्माण करण्याची गरजही डॉ. माशेलकर यांनी यावेळी व्यक्त केली.