पुणे : ‘देशाला संस्कृती आणि इतिहासाचा प्रदीर्घ वारसा आहे. मात्र, आपल्या देशाचे सत्व आणि स्वत्व हिरावून घेण्याचा डाव दोनशे वर्षांपासून आखला जातो आहे. त्याविरोधात लवकर जागरूक न झाल्यास देश पुन्हा गुलाम होण्याची शंका निर्माण झाली आहे,’ असे मत गोविंददेव गिरी यांनी व्यक्त केले.
दिलीपराज प्रकाशनाच्या वतीने गोविंददेव गिरी यांच्या हस्ते ‘भारत : सत्य. सत्व. स्वत्व’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला इतिहास अभ्यासक नीलेश ओक, भारतीय जनता पक्षाचे नेते श्याम जाजू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शरद ढोले, प्रकाशक मधुर बर्वे, लेखक अभिजित जोग उपस्थित होते.
गोविंददेव गिरी म्हणाले, ‘देशाचा जाज्वल्य इतिहास विसरण्यास भाग पाडले जात आहे. या देशावर पुन्हा एकदा राज्य करण्यासाठी शिक्षणपद्धतीद्वारे इथल्या नागरिकांचे सत्व आणि स्वत्व संभ्रमित करण्याचा आंतरराष्ट्रीय डाव आहे. कोणतेही राष्ट्र निर्माण होण्यासाठी भूमी आणि परंपरा असणे गरजेचे असते. त्यातूनच राष्ट्र उभे राहते. भारत या राष्ट्राची निर्मिती अनादी काळापासून झाली असून, वैदिक संस्कृती हे भारताच्या उगमाचे मूळ आहे. आपल्यालाच आपली ओळख आहे का आणि आपण आपल्या संचिताविषयी ज्ञात आहोत का, हे तपासून पाहण्याची आवश्यकता आहे.’
जाजू म्हणाले, ‘केवळ योग, आयुर्वेद, धर्म एवढ्यापुरताच भारत मर्यादित नव्हता, तर भारत उद्यमशीलता आणि आर्थिक केंद्रासाठीही ओळखला जात होता. भारतातून अनेक संत आणि विद्वान परदेशात गेले. मात्र, तिथे जाऊन एक इंच जागादेखील बळकावण्याची मनीषा त्यांनी बाळगली नाही. सर्वसमावेशकता आणि सहिष्णुता हाच या देशाचा मूळ स्वभाव आहे.’
मधुर बर्वे यांनी प्रास्ताविक तर, मधुमिता बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.