पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी माउलींचे मानाचे अश्व ८ जून रोजी कर्नाटकातील अंकली (ता. चिकोडी, जि. बेळगाव) येथून प्रस्थान ठेवणार आहेत. अंकली ते आळंदी हा ३१५ किलोमीटरचा प्रवास करून मानाचे अश्व पालखी प्रस्थानाच्या एक दिवस आधी म्हणजे १८ जून रोजी आळंदीमध्ये पोहोचणार आहेत.
‘माउलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचा बहुमान अंकलीकर सरकार यांच्याकडे आहे. आषाढी पायी वारीचे यंदा १९३ वे वर्ष असून, अकरा दिवसांचा प्रवास करून माउलींच्या पालखीपुढे आणि जरीपटक्याचा अश्व असे मानाचे अश्व माउलींच्या चरणी सेवा रूजू करतील,’ अशी माहिती श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांनी दिली.
शिताेळे सरकार यांच्या राजवाड्यातील अंबाबाई मातेच्या मंदिरामध्ये विधीवत पूजन झाल्यानंतर मानाचे अश्व ८ जून रोजी पालखी सोहळ्यासाठी प्रस्थान ठेवणार आहेत. पहिल्या दिवशीचा मुक्काम मिरज येथे असेल. १७ जून रोजी अश्व पुण्यात येणार असून, १८ जून रोजी आळंदीमध्ये पोहोचणार आहेत. त्यानंतर १९ जून रोजी माउलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मानाचे अश्व आळंदीतील संत ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी मंदिरामध्ये दाखल होणार आहेत, असे शितोळे यांनी सांगितले.