पुणे : विदर्भातील काही ठिकाणी मंगळवारपासून (२ एप्रिल) पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याबरोबरच मराठवाड्यात रात्री उकाडा वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य भारतात कोरडे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील चार-पाच दिवस हे वातावरण कोरडे राहण्याचा अंदाज आहे. विदर्भात मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. या काळात मराठवाड्यात रात्रीच्या उष्णतेत वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हेही वाचा >>>निनावी पत्राद्वारे शिवतारेंच्या माघारीवर टीका; पवारांच्या विरोधातील ५ लाख ८० हजार मतदारांनी करायचे काय? गेल्या चार-पाच दिवसांपासून ४३ अंश सेल्सिअसवर गेलेले राज्याचे तापमान रविवारी काहीसे कमी होऊन ४० अंशांवर आले आहे. रविवारी सोलापुरात राज्यात सर्वाधिक ४१.० अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. सोलापूरसह जळगाव, बीड, अकोला, चंद्रपूरमध्ये पारा चाळीशी पार गेला होता. राज्याच्या बहुतेक भागांत कमाल तापमानात घट झाली असली तरीही किमान तापमान २५.० अंश सेल्सिअवर कायम आहे. विदर्भात सर्वत्र किमान तापमान २५ अंशांहून जास्त होते. किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातही किमान तापमान सरासरी २४ अंश सेल्सिअस राहिले.