पुणे : शहर स्वच्छ ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी कचरा उचलण्याचा आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला असून, त्याची अंमलबजावणी करत घनकचरा विभागाने मंगळवारी (८ जुलै) रात्री शहरातील विविध भागांतून १३६ टन कचरा गोळा केला. यासाठी १ हजार ४७२ कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. २१३ वाहनांच्या मदतीने हा कचरा गोळा करण्यात आला. दररोज रात्री कचरा गोळा करण्याचे काम सुरू राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर रस्त्यांवरील स्वच्छतेला प्राधान्य देण्याचा निर्णय नवल किशोर राम यांनी घेतला आहे. आयुक्त गेल्या काही दिवसांपासून सकाळी अनेक भागांत जाऊन कचरा उचलला जात आहे की नाही, याची पाहणी करत आहेत. त्या वेळी सकाळी दहा-अकरा वाजताही रस्त्यावरील कचरा उचलला जात नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर घनकचरा विभागाची कानउघाडणी करत रात्रीच्या वेळी कचरा उचलण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
कचरा उचलण्यासाठी महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, ८ जुलैला रात्री कचरा उचलण्यास सुुरुवात करण्यात आली. या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी महापालिकेने १३६ टन कचरा गोळा केल्याचे घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले. शहरातील अनेक भागांमध्ये सकाळ, संध्याकाळ, तसेच रात्रीच्या वेळी गर्दी असते. यामध्ये गुलटेकडी, मार्केटयार्ड, टिंबर मार्केट, महात्मा फुले मंडई, तुळशीबाग, शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता, तसेच डेक्कन जिमखाना येथील खाऊगल्लीसह इतर भागांतील खाऊगल्ली असलेल्या भागांचा समावेश होतो.
शहरातील ज्या भागात बाजारपेठ आणि वर्दळ असते त्या रस्त्यांवर सर्रासपणे कचरा पडलेला असतो. रात्री आणि पहाटेच्या वेळीदेखील अनेक नागरिक उघड्यावर कचरा टाकून शहर घाण करतात. अंधाराचा फायदा घेत कचरा उघड्यावर टाकण्याचे प्रमाण मोठे असल्याने रस्त्यांच्या कडेने ठिकठिकाणी उकिरडे झाल्याचे चित्र शहरात दिसते. रस्त्यावर कचरा टाकणारे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेचा घनकचरा विभाग त्यांच्यावर कारवाई करते. मात्र, त्यानंतही उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही.
रात्री रस्त्यावर टाकलेला कचरा उचलण्यासाठी उशीर होत असल्याने रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साठल्याचे दिसत होते. महापालिका आयुक्तांनी केलेल्या पाहणीनंतर ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी रात्रीच्या वेळी कचरा उचलण्याची मोहीम राबविण्याचा आदेश महापालिकेच्या घनकचरा विभागाला दिला होता. त्यानंतर उपायुक्त संदीप कदम यांनी परिमंडळ एक ते पाचचे उपायुक्त, सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे सहायक आयुक्त, मुख्य आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक यांची बैठक घेऊन रात्रीच्या वेळी कचरा संकलन करण्याचे नियोजन केले. यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये १ हजार ४७२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
रस्त्यावर कचरा टाकू नये असे आवाहन वारंवार करूनही नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात. सकाळी कचरा उचलण्यासाठी उशीर झाल्यास नागरिकांना कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. ही स्थिती बदलण्यासाठी महापालिका आयुक्तांनी आदेश दिला. त्याची अंमलबजावणी करत रात्रीच्या वेळी कचरा गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा विभाग