जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर देवदर्शनासठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे कमालीची घटझाली आहे. जेजुरीच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे.

यंदा राज्यात तीव्र उन्हाळा असून, जेजुरी परिसरातील तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे सकाळी लवकर खंडोबा गडावर जाण्याकडे भाविकांचा कल आहे. दरवर्षी चैत्र आणि वैशाख महिन्यामध्ये खंडोबा गडावर देवदर्शनासाठी मोठी गर्दी असते. यंदा मात्र लग्नसराई असूनही चैत्र महिन्यात भाविकांची संख्या अत्यंत कमी होती. उन्हाच्या झळा तीव्र असल्याने खंडोबा गड चढताना भाविक घामाघूम होत आहेत. काहींना चक्कर येणे, दम लागणे असा त्रास होत आहे. श्री मार्तंड देवसंस्थानने भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी गडावर सावलीची व्यवस्था केली आहे. पिण्यासाठी पाण्याची सुविधा केली आहे. मात्र, तुलनेने भाविक कमी येत असल्याचे दिसून येत आहे.

बाजारपेठेत शुकशुकाट

गर्दी कमी असल्याने बाजारपेठेत दुपारी शुकशुकाट असतो. सकाळी आणि सायंकाळी भंडार खोबऱ्याची विक्री काही प्रमाणात होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. नेहमीपेक्षा यंदा निम्मीच गर्दी असल्याचे पुजाऱ्यांचे म्हणणे आहे. लॉज, पुजाऱ्यांची निवासस्थाने, धर्मशाळा येथे मुक्कामी येणाऱ्या भाविकांची संख्या अत्यंत कमी असल्याने खोल्या मोकळ्या रहात आहेत.

चिंचेची बाग रिकामी

होळकरांच्या ऐतिहासिक चिंच बागेमध्ये झाडाखाली दररोज शेकडो कुटुंबे कुलधर्म कुलाचारासाठी उतरतात. या ठिकाणी प्रामुख्याने चुली घालून भात, मटन, भाकरीचा नैवेद्य बानू देवीला दाखवण्यासाठी तयार केला जातो. बोकड, कोंबडा यांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. जेवणासाठी आमंत्रित केलेले पाहुणे आवर्जून चिंच बनात येतात. परंतु यंदा कडक उन्हाळ्यामुळे पाहुण्यांनीही जेवणाकडे पाठ फिरवली आहे. कायम गजबजलेली चिंचेची बाग रिकामी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कडेपठार डोंगरावर गर्दी कमी

जेजुरी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या कडेपठारच्या डोंगरात दररोज हजारो भाविक व पर्यटकांची गर्दी असते. पण यंदा कडक उन्हामुळे येथे गर्दी कमी जाणवत आहे. कडेपठारचे प्राचिन मंदिर उंच डोंगरावर निसर्गाच्या सानिध्यात असून डोंगर चढण्यासाठी एक तास वेळ लागतो. या ठिकाणी सुंदर वनराई आहे. भाविकांबरोबर पर्यटकही मोठ्या संख्येने येत असतात. वाढत्या तापमानाचा येथे येणारे भाविक आणि पर्यटकांवर परिणाम झाला असल्याचे कडेपठार लिंगदेवता ट्रस्टचे विश्वस्त म्हाळसाकांत जेजुरीकर यांनी सांगितले.