पुणे : नाटक सुरू होणार असल्याची नांदी घंटा वाजवून केली जाते. त्यानुसार मंगळवारी दुपारी बारा वाजता नाटकाची घंटा वाजली खरी. पण, ती रंगमंदिरात नव्हे तर नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारातच. निमित्त होते पुणे महापालिकेने सुरू केलेल्या रंगयात्री ॲपला विरोध करण्यासाठी. महापालिका प्रशासनाविरोधात बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात घोषणा देत नाट्यनिर्माते आणि व्यवस्थापकांनी निषेध केला.

महापालिकेच्या प्रस्तावित ‌‘रंगयात्री‌’ या नाट्यगृहांच्या तारखांचे ऑनलाईन आरक्षण करण्याचा सुविधेमध्ये त्रुटी जाणवत असल्याने नाट्य निर्माते, नाट्य व्यवस्थापक व संयोजकांनी ‌‘रंगयात्री‌’ ॲपला विरोध दर्शविला. बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात घंटानाद करून, घोषणा देत प्रशासनाचा निषेध केला. नाट्य निर्माते, नाट्य व्यवस्थापकांच्या वतीने महापालिका प्रशासनास मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

नाट्यगृहांच्या आरक्षणाची सुविधा ‌‘रंगयात्री‌’ ॲपद्वारे उपलब्ध करून दिल्यास नाट्यगृहांचे आरक्षण कोणत्या कारणासाठी होईल यावर प्रशासनाचे नियंत्रण राहणार नाही. राजकीय संस्था किंवा राजकीय वर्चस्व असलेल्या सामाजिक संस्थांमुळे कलावंत, नाट्य व्यावसायिकांना नाटकांच्या तारखा मिळणे अवघड होईल. ‌‘रंगयात्री‌’ ॲप रंगकर्मी, नाट्य निर्माते, नाट्य व्यावसायिक यांच्या दृष्टीने जसे त्रासदायक ठरणार आहे त्याप्रमाणे महापालिकेला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

या विषयी बोलताना नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन म्हणाले, ‘सध्या चौमाही तारखा वाटपाची पद्धत आहे. नाट्य व इतर संस्थांना त्यांचे झालेले कार्यक्रम बघून पुढील तारखा दिल्या जातात. प्रसिद्ध कलाकारांच्या तारखा ऐनवेळी मिळतात त्यामुळे संयोजकांना धावपळ करावी लागते. ऑनलाईन सुविधेमुळे तारखा निश्चित होण्यावर परिणाम होईल आणि नाट्यप्रयोगांची संख्या कमी होईल. महापालिकेने रंगयात्री ॲपचा निर्णय रद्द न केल्यास कलावंत आंदोलन करतील.’

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले, ‘नाट्य निर्माते, नाट्य व्यवस्थापकांच्या प्रश्नासंदर्भात पालकमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात येत आहे. ही बैठक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महापालिका प्रशासनाने कुठलाही निर्णय घेऊ नये.’

या आंदोलनात सत्यजीत धांडेकर, समीर हंपी, प्रमोद ननावरे, प्रवीण बर्वे, शशी कोठावळे, मोहन कुलकर्णी, शिरीष रायरीकर, शिरीष कुलकर्णी, वरुण कांबळे, रणजीत सोनावळे, दीपक पवार, राजन भुवड, प्रमोद रणनवरे, अतुल वायचळ, शिरीष गोडबोले, अक्षय जगताप, जतिन पांडे, अशोक जाधव, स्वाती शहा, उमेश बेहरे, गणेश भोसले, मुकेश देठीया, बाळकृष्ण कलाल यांनी सहभाग घेतला.