पुणे : राज्यातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांतील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्यात ६ ते ८ ऑगस्ट या कालावधीत पायाभूत चाचणी घेतली जाणार असून, एकूण दहा माध्यमांतील विद्यार्थ्यांची प्रथम भाषा गणित, तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची चाचणी घेतली जाणार आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक राहुल रेखावार यांनी या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे की नाही याची पडताळणी करून अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे मदत होईल. या चाचण्या दहावी, बारावीच्या परीक्षांप्रमाणे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षांचा अतिरिक्त ताण देऊ नये. विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केली हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मुलभूत सुधारणा, कृती कार्यक्रम राबवणे हा उद्देश आहे.
तीन नियतकालिक मूल्यांकन चाचणीमध्ये ६ ते ८ ऑगस्ट या कालावधीत पायाभूत चाचणी, ऑक्टोबर शेवटचा आठवडा ते नोव्हेंबर पहिला आठवडा या दरम्यान संकलित मूल्यमापन चाचणी १, तर एप्रिल २०२६मध्ये संकलित मूल्यमापन चाचणी २ घेतली जाणार आहे. मागील इयत्तेचा अभ्यासक्रम, मुलभूत क्षमतांवर चाचणी आधारित असणार आहे.
पायाभूत चाचणीच्या वेळापत्रकानुसार दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची ६ ऑगस्ट रोजी प्रथम भाषा, ७ ऑगस्ट रोजी गणित, ८ ऑगस्ट रोजी तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. शालेय वेळापत्रकानुसार सकाळ किंवा दुपारच्या सत्रात परीक्षेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. स्थानिक परिस्थितीनुसार काही तारखांमध्ये बदल करायचा झाल्यास संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी एससीईआरटीची पूर्वपरवानगी घेऊन बदल करावा. लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात तोंडी परीक्षा घ्यावी. विद्यार्थी संख्या जास्त असल्यास दुसऱ्या दिवशी उपलब्ध वेळेनुसार घ्यावी. चाचणीसाठीच्या प्रश्नपत्रिका एससीईआरटीकडून विद्यार्थिनिहाय १४ ते २८ जुलै या कालावधीत पुरवल्या जाणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रश्नपत्रिकांची गोपनीयता पाळणे आवश्यक
प्रश्नपत्रिकांची गोपनीयता काटेकोरपणे पाळण्यात यावी. प्रश्नपत्रिका फाटणार नाहीत, पावसाने भिजणार नाहीत, सुरक्षित राहतील, तालुका समन्वयकांनी प्रश्नपत्रिका छायांकित प्रती काढण्यासाठी बाहेर जाणार नाहीत, प्रश्नपत्रिकांचा मोबाइलमध्ये फोटो काढणे, समाजमाध्यमांद्वारे इतरांना पाठवणे असे गैरप्रकार होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.