पुणे : भारताच्या ऑलम्पिक सहभागाच्या प्रवासाला आज १०५ वर्षे पूर्ण होत असून, या ऑलिम्पिकसाठी पाठविल्या गेलेल्या भारतीय संघाला लोकमान्य टिळकांनी आर्थिक मदत केल्याचा उल्लेख एका अभ्यासादरम्यान प्रकाशात आला आहे. या संघाची निवड पुण्यातील डेक्कन जिमखाना येथे झाली होती. १९२० मध्ये ॲंटवर्प ऑलिम्पिकसाठी भारताचा पाच सदस्यीय संघ गेला होता. त्या घटनेच्या पुण्याशी असलेल्या अनोख्या नात्यासंदर्भातील रोचक माहिती बडोद्याचे सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या चरित्राचे लेखन करताना अभ्यासक आणि लेखिका मनीषा बाठे यांना मिळाली. बडोद्याचे सचिन मुजुमदार यांच्या संग्रहातून बाठे यांना ही माहिती उपलब्ध झाली. ‘द. बा. कोठीवाले, मोरेश्वर ना. नातू आणि सरदार आबासाहेब मुजुमदार यांनी अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण परिषदेसाठी तयार केलेला दस्तावेज प्रकाशित झाला आहे. त्यामध्ये लोकमान्यांनी ऑलिम्पिकला गेलेल्या पहिल्या भारतीय संघाला मदत केल्याचा उल्लेख सापडतो,’ असे बाठे यांनी सांगितले.
‘सुदृढ पिढी घडण्यासाठी खेळ आवश्यक आहे, असा विचार लोकमान्यांनी त्या वेळी मांडला होता. सन १९०६ मध्ये डेक्कन जिमखान्याची स्थापना झाली, तेव्हा लोकमान्यांनी शंभर रुपयांची देणगी दिली होती. नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे डेक्कन जिमखान्याचे पहिले अध्यक्ष होते. न. चिं. केळकर आणि भाजेकर बंधू हे चिटणीस म्हणून निवडले गेले होते. तेव्हा सर्वप्रथम, लोकमान्यांनी अन्य देशांच्या बरोबरीने भारतीय खेळाडूंनीदेखील ऑलिम्पिकमध्ये सहभागी व्हावे ही भूमिका मांडली होती. त्यांचे स्वप्न त्यानंतर १४ वर्षांनी प्रत्यक्षात आले,’ असे या प्रकाशित दस्तावेजात म्हटले आहे.
‘डेक्कन जिमखाना येथे तत्कालीन चिटणीस शंकर रामचंद्र भागवत यांनी ८ नोव्हेंबर १९१९ ला भारत स्पोर्ट्स संघटना अर्थात भारतीय ऑलिम्पिक संघटनेची स्थापन केली. त्यानंतर एक वर्षाने अँटवर्प येथील ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागासाठी प्रयत्न केले गेले. दोराबाजी टाटा, खंबायचे नवाब, नवनगरचे जामसाहेब, धांग्राध्राचे महाराज, जमखिंडीचे राजे, फलटणचे राजे मालोजीराव नाईक निंबाळकर अशा अनेक संस्थानिकांनी मदतीचा हात पुढे केला. तेव्हाही लोकमान्य टिळक मागे राहिले नाहीत. त्यांनी १०१ रुपयांची देणगी दिली,’ असाही उल्लेख या दस्तावेजात आहे.
‘पुण्यातच २३ आणि २५ एप्रिल १९२० रोजी दोन दिवस निवड चाचणी होऊन भारताचा पाच सदस्यीय संघ निवडला गेला. यात पूर्मा बॅनर्जी (१०० मीटर, ४०० मीटर धावणे), फाडेप्पा चौगुले (१० हजार मीटर, मॅरेथॉन), सदाशिव दातार (मॅरेथॉन), कुमार नवले, दिनकरराव शिंदे (कुस्ती) यांची निवड झाली. उद्घाटन सोहळ्यासाठी पूर्मा बॅनर्जी हे भारताचे ध्वजवाहक होते. भारतीय संघ ५ जून १९२० रोजी ऑलिम्पिकसाठी मुंबईहून जहाजाने रवाना झाला. तेव्हा या सर्व खेळाडूंनी लोकमान्यांचा आशीर्वाद घेऊनच जहाजात पाऊल ठेवले होते,’ अशी माहिती बाठे यांनी या दस्तावेजाच्या आधारे दिली.
अशी होती संघाची कामगिरी
‘या स्पर्धेत भारताचा पहिला विजय दिनकारराव शिंदे यांनी ५४ किलो वजनी गटात मिळवताना ग्रेट ब्रिटनच्या हेन्री इन्मान यांच्यावर विजय मिळविला. शिंदे तेव्हा चौथ्या स्थानावर राहिले. भारताच्या या पहिल्या ऑलिम्पिक सहभागात ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. पूर्मा बॅनर्जी पात्रता फेरीचा अडथळा पूर्ण करू शकले नाहीत. चौगुले १० हजार मीटर शर्यतीची अंतिम फेरी गाठू शकले नाहीत. पण, मॅरेथॉन शर्यतीत ते १९व्या स्थानावर आले. दातार यांना मॅरेथॉन शर्यत पूर्ण करण्यात अपयश आले,’ अशी माहिती ऑलिम्पिक समितीच्या संकेतस्थळावर आहे.
लोकमान्य टिळक यांची दूरदृष्टी यातून दिसते. भारतीयांनी ऑलिम्पिकमध्ये खेळायला हवे हा तेव्हा मांडलेला विचार किती महत्त्वाचा होता, हे आज जाणवते.- मनीषा बाठे, अभ्यासक आणि चरित्रकार