लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कौटुंबिक वादातून सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन महिलांना फरासखाना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी मुलाची सुखरुप सुटका केली. नझमा बिलाल शेख (वय ४१), रेणू दिलीप राठोड (वय ४१, दोघे रा. ढमढेरे बोळ, बुधवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

चार एप्रिल रोजी बुधवार पेठ परिसरातून सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलीस कर्मचारी वैभव स्वामी, प्रवीण पासलकर, सुमीत खु्ट्टे, संदीप कांबळे, राकेश क्षीरसागर यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले. चित्रीकरणात दोन महिला एका मुलाला रिक्षातून घेऊन निघाल्याचे दिसून आले.

आणखी वाचा-रेल्वे प्रवाशांचा मतदानावर बहिष्कार! पुणे-दौंड उपनगरी सेवा सुरू होत नसल्याने पाऊल

पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेतला. त्याची चौकशी केली. तेव्हा दोन महिलांनी मुलाला स्वारगेट परिसरात नेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी महिलांचा शोध घेतला. तेव्हा महिला बुधवार पेठेत राहायला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी नझमा शेखला ताब्यात घेतले. चौकशीत तिने साथीदार रेणू राठोडकडे मुलाला ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी दोघींना ताब्यात घेऊन मुलाची सुटका केली. कौटुंबिक वादातून दोघींनी मुलाचे अपहरण केल्याची कबुली दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, सहायक निरीक्षक वैभव गायकवाड, उपनिरीक्षक जयसिंग दाढे, निलेश मोकाशी, मेहबूब मोकाशी, गोविंद गुरव, आशा कांबळे, जयश्री पवार, पूनम ओव्हाळ, मिनाझ शेख यांनी ही कारवाई केली.