नारायणगाव : ‘भारतीय जनता पक्षाबरोबर सोयरिक केलेला कोणताही नेता कितीही मोठा असला तरी त्याचा सरपटणारा प्राणी होणार आहे. भाजप गद्दारांसाठी घटनादुरुस्ती करून एकापेक्षा जास्त म्हणजे चार मुख्यमंत्रीसुद्धा करू शकतात,’ अशी टीका शिवसेनेचे (ठाकरे) खासदार, प्रवक्ते संजय राऊत यांनी ओझर येथे पत्रकार परिषदेत केली.

नारायणगाव येथे शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने जुन्नर तालुक्यात आले असता, त्यांची ओझर येथे पत्रकार परिषद झाली. त्या वेळी ते बोलत होते. उपनेते बबनराव थोरात, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर, शरद चौधरी, युवा नेते आदित्य शिरोडकर, संपर्कप्रमुख दिलीप बामणे, तालुकाप्रमुख माउली खंडागळे, दीपमाला बढे, मनोज पुंडे, शांताराम सावंत, मयूर गुंजाळ आदी या वेळी उपस्थित होते.

‘छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्यावर त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले. मात्र, अजितदादांचे नाव घेतले नाही. भुजबळ यांचा पक्ष अमित शहांचा पक्ष आहे. अजित पवार यांना पक्षच नाही. तसेच एकनाथ शिंदे यांनाही पक्ष नाही. त्यांनी पक्ष चोरलेला आहे, हे भुजबळ यांना माहिती आहे,’ अशी टीका राऊत यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सर्वोच्च न्यायालयाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे जाहीर केल्यामुळे ठिकठिकाणी कार्यकर्त्यांना भेटून चर्चा करण्यासाठी दौरे सुरू झाले आहेत. लोकसभा, विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित मिळून लढण्याचा आमचा प्रयत्न असेल. निवडणुकीपूर्वी स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकले जाईल,’ असेही त्यांनी सांगितले. राऊत म्हणाले, ‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र यावेत ही आमची सर्वांची इच्छा आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील समस्त मराठी माणूस गट-तट विसरून गुजराती व्यापाऱ्यांच्या छातीवर बसला, तर ती बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना असेल.’