केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रसिद्ध उद्योगपती दिवंगत धीरुभाई अंबानी यांच्याबद्दलची एक आठवण सांगितली आहे. नितीन गडकरी यांनी धीरुभाई अंबानी यांच्याबरोबर एक पैज लावली होती. “ती पैज हरलो तर मी माझ्या मिशा काढून टाकेन”, असा शब्द गडकरींनी अंबांनींना दिला होता. पिंपरी चिंचवडमध्ये एका खासगी विद्यापीठाच्या कार्यक्रमात गडकरींनी सांगितलेला हा किस्सा चांगलाच चर्चेत आला आहे.
काय आहे किस्सा?
पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गाच्या निविदे प्रक्रियेमुळे धीरूभाई अंबानी हे नितीन गडकरी यांच्यावर नाराज झाले होते. ३६०० करोड रुपयांची निविदा असताना गडकरी यांनी ती निविदा प्रक्रिया रद्द केली होती. यामुळे नाराज झालेल्या अंबानी यांनी १८०० करोड रुपयांमध्ये तुम्ही महामार्ग बनवू शकत नाही असे म्हणत सुनावले होते. नितीन गडकरींनी देखील मी हा रोड तेवढ्यात पैशांमध्ये बनवून दाखवणारच तसे न झाल्यास मी माझ्या मिशा कापेन असे आव्हान गडकरींनी धीरूभाई यांना दिले होते. मात्र, द्रुतगती मार्ग अवघ्या दोन वर्षात तो ही अवघ्या सोळाशे करोड रुपयात बनवून दाखवला. धीरूभाई अंबानी यांनी मी हरलो तुम्ही जिंकलात असे मान्य केले होते.
हेही वाचा- ‘आयसर पुणे’तील डॉ. दीपक धर यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान
गडकरी म्हणाले की, मला पुणे शहराने खूप काही शिकवले. मी महाराष्ट्रात मंत्री होतो. पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग बनवण्याचे सौभाग्य मला मिळाले. धीरूभाई अंबानींनी द्रुतगती मार्गाचे काम मिळावे म्हणून सगळ्यात कमी ३६०० करोड ची निविदा काढली होती. नियमानुसार ते निविदा त्यांना मिळायला हवी होती. १८०० करोडमध्ये होणारे काम आहे ३६०० करोड जास्त होतात. असे मला वाटत होते. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन तेव्हा मला म्हणाले होते. त्यांना नियमानुसार काम द्यायला हवं. धीरूभाई यांच्या त्या निविदेवर मी सही न केल्याने ती रद्द झाली. यामुळे धीरूभाई अंबानी नाराज झाले होते. निविदा कमी असताना नियमानुसार आम्हाला काम मिळायला हवे होते. तरीही तुम्ही आमचे टेंडर रद्द केले. अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. ते मला बरेच काही बोलले. ते म्हणाले की तुम्ही हा रोड कमी पैशांमध्ये बनवू शकत नाहीत. मी ही म्हणालो जर मी रोड बनवला नाही तर मिशा कापेल. तो रोड दोन वर्षात बनवला तर तुम्ही काय कराल. असे मी म्हणालो पण ते तिथून निघून गेले. पुढे मी MSRDC ची स्थापना केली आणि रोड च काम सुरू केले. दोन वर्षात द्रुतगती मार्ग बनवला. तो ही १६०० करोड रुपयात झाला. कालांतराने धीरूभाई यांनी मला बोलवून घेतले आणि मी हरलो तू तुम्ही जिंकलात असे धीरूभाई यांनी मान्य केले होते. अशी आठवण नितिन गडकरी यांनी सांगितली.