Vaishnavi Hagawane Death पुण्यातील विवाहीत तरुणी वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली, या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनं पुन्हा एकदा महिलांचा हुंड्यासाठी सुरू असलेल्या छळाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवीनं आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, दीर, सासू, सासरा आणि नणंद यांना अटक केली आहे.
वैष्णवीच्या वडिलांचा आरोप काय?
वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. “हगवणेंनी वैष्णवीचं दोनदा लग्न मोडलं, हगवणे कुटुंबात मला माझ्या मुलीचं लग्न नाईलाजानं करावं लागलं. दोनदा लग्न का मोडलं? काय घडलं होतं त्याबाबत मला फार काही बोलता येणार नाही कारण प्रकरण न्यायलयात आहे. हळूहळू गोष्टी समोर येतील. हुंड्यासाठी छळ केला नाही, गाडी मागितली नाही असं आता हगवणे कुटुंबाकडून सांगितलं जातं आहे. पण मी तुम्हाला सांगतो, वैष्णवीच्या लग्नात मी एमजी हॅक्टर गाडी बुक केली होती. ती मी रद्द केली कारण त्यांनी वाद घालून फॉर्च्युनर मागून घेतली. असा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला.
लग्न ठरवण्यासाठीच्या बैठकीत वादावादी-अनिल कस्पटे
बैठकीत वादावादी झाली होती फॉर्च्युनरच हवी असा हट्ट धरला होता. त्यांच्याकडे ही एकच कार आहे. जी काही ९० लाखांची गाडी आहे सांगत आहेत ती चंद्रकांत हुचडे नावाने आहे. हगवणे कुटुंबाकडे कुठलीही गाडी नाही. माझ्याकडे कार मागितली, लग्नाला उभं राहणार नाही, लग्नातून निघून जाईन अशा धमक्या देऊन माझ्याकडून सगळा हुंडा घेतला आहे. अधिक महिन्यात जावयाला चांदीचं ताटच पाहिजे असाही हट्ट धरला होता तो पण मी पूर्ण केला.” असंही अनिल कस्पटे म्हणाले.

१६ मेच्या दिवशी वैष्णवीची आत्महत्या
पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम या १६ मे २०२५ रोजी वैष्णवी शशांक हगवणे या २३ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवीच्या मृत्यूमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. वैष्णवीच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. लग्नाच्या वेळी ५१ तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या. पण नंतरही वैष्णवीकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आली आणि तिला घरातूनही बाहेर काढण्यात आलं होतं. वारंवार होणारा छळ सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली. आता या प्रकरणात जी सुनावणी सुरु आहे त्या दरम्यान हगवणेंच्या वकिलांनी वैष्णवीचं चारित्र्यहनन करणारे काही दावे केले आहेत. तसंच हगवणे कुटुंबाने हुंडा मागितला नव्हताच असाही दावा केला आहे. या सगळ्या आरोपांना अनिल कस्पटेंनी उत्तरं दिली आहेत.