पुणे : ‘स्वातंत्र्यानंतर देशाने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती केली, हे खरे असले, तरी अपेक्षित गतीने प्रगतीचे उद्दिष्ट साध्य होऊ शकले नाही, हेदेखील वास्तव आहे. त्यामागे धोरण दिरंगाईचा अडथळा असून, देशापुढचा हा महत्त्वाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा लागेल,’ असे मत प्रसिद्ध लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते विनय हर्डीकर यांनी रविवारी व्यक्त केले.

विनय हर्डीकर यांच्या अमृतमहोत्सव पूर्तीनिमित्त देशमुख आणि कंपनीच्या वतीने प्रकाशित ‘नव्या युगाचे पाईक’ या स्वतंत्र भारताच्या पहिल्या पिढीची कामगिरी सांगणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन निवृत्त परराष्ट्र सचिव सुधीर देवरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी हर्डीकर बोलत होते. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, ‘विनय हर्डीकर ७५ संयोजन समिती’चे डाॅ. राजीव बसर्गेकर, अनंत अभंग आणि प्रसिद्ध चित्रकार रविमुकुल या वेळी व्यासपीठावर होते. मित्रांच्या वतीने ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी मनोगत व्यक्त केले. पं. सत्यशील देशपांडे यांनी बंदिश गायनातून हर्डीकर यांना शुभेच्छा दिल्या. सध्याच्या राजकारणामध्ये हिंदुत्ववादी आणि त्यांचे प्रतिवाद करू पाहणारे आततायीपणा करत आहेत, असे वाटू लागले आहे, याकडे लक्ष वेधून राजकारणामध्ये आमच्या पिढीची कामगिरी सुमार आहे, अशी कबुली हर्डीकर यांनी दिली.

शिंदे म्हणाले, ‘देशाने प्रगती केली असली आणि दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येत घट झाली असली तरी आर्थिक विषमता, जातीयता, धार्मिकता हे प्रश्न कायम आहेत. शरद जोशी यांनी केलेल्या मांडणीनुसार ग्रामीण देश स्वतंत्र आहे की काय, असे वाटू लागले आहे.’ शेतीच्या अर्थव्यवस्थेवर मार्ग काढायला हवा. स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात हे चित्र बदललेले असेल, यासाठी मार्गक्रमण करायचे आहे. देवरे म्हणाले, ‘विविध क्षेत्रांतील मुशाफिरीतून हर्डीकर यांनी संचय केलेले ज्ञान म्हणजे मधाचे पोळे आहे. हे काम त्यांनी असेच सुरू ठेवावे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईतून आलेल्या विनय यांना पुणे ब्राह्मणी तोंडावळ्याचे वाटत असले, तरी ब्राह्मणेतर चळवळीने त्या भिंतींना चिरे पडू लागले होते. त्याविषयी एखादा लेख या पुस्तकामध्ये असायला हवा होता. मात्र, २०१४ नंतर उदारमतवाद आक्रसत गेला असून, भावी पिढीच्या हाती आम्ही कोणता देश देणार आहोत, हा प्रश्न आहे. सतीश आळेकर, ज्येष्ठ नाटककार