‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचे मत पुणे : ‘नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे देश सधन होत नाही, तर त्यासाठी देशाच्या शाश्वत विकासाचे प्रारूप तयार असायला हवे. आपल्या देशाने त्याचा विचारही केलेला नाही. मात्र, नैसर्गिक साधनसंपत्तीच्या प्रश्नाची देशाकडून हेळसांड झाली आहे. शाश्वत विकासाच्या गोष्टी करण्यापूर्वी विकास म्हणजे काय हे नीट समजून घेण्याची गरज आहे,’ असे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी मंगळवारी मांडले. फग्र्युसन महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या ‘कोरम’ महोत्सवात पर्यावरण या विषयावर कुबेर बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी, उपप्राचार्य आणि विभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार या वेळी उपस्थित होते. पर्यावरण या विषयाच्या अनुषंगाने कुबेर यांनी व्याख्यानामध्ये औद्योगिक क्रांतीपासून इंजिनाची निर्मिती, तेलाचा वापर, तेलामागील आंतरराष्ट्रीय राजकारण, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास असे अनेक कंगोरे उलगडून दाखवले. कुबेर म्हणाले की, १९६० पर्यंत पर्यावरण हा प्रश्नच नव्हता. तेलाचा शोध लागल्यानंतरच अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. जग असमानतेवरच आधारित आहे. त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचे समान वाटप होणे शक्यच नाही. नैसर्गिक स्रोत असलेले देश आणि नैसर्गिक स्रोत नसलेले देश अशीच जगाची विभागणी आहे. अमेरिकेने ९/११च्या हल्ल्यानंतर पुढील वीस वर्षांत तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचे धोरण ठरवले होते. मात्र, त्यासाठी वीस वर्षे न लागता त्यांनी ते २०१८ मध्येच पूर्ण केले. आज अमेरिका तेल निर्यातदार देश झाला आहे. आपल्याकडे पंचवार्षिक योजना आखल्या जातात, पण त्यांचे काहीच होत नाही. रोजगार, शिक्षण असे मूलभूत प्रश्न सुटलेले नसताना नैसर्गिक साधनसंपत्तीचा विचार फार दूर आहे. विकासाचे किमान ठोकताळे आपण करत नाही, तोपर्यंत साधनसंपत्तीच्या वाटपात आपल्याला बघ्याचीच भूमिका घ्यावी लागणार आहे. डोंगर, झाडे, नद्या, प्राणी यांना देव मानून त्यांचे रक्षण करण्याऐवजी आपण त्यांचा ऱ्हास केला. त्यामुळे पर्यावरणाचे अनन्वित नुकसान झाले आहे. या प्रश्नांना भिडण्याची आर्थिक आणि बौद्धिक कुवतच आपल्याकडे नाही, असेही कुबेर म्हणाले.