ज्या  शेतकऱ्याने पिकवलेले धान्य काही पैसे देऊन आपणास सहज उपलब्ध होते, ज्यावर आपण सधन लोक पिढय़ान्पिढय़ा वर्षांनुवर्ष आपल्या पोटाची भूक भागवतो अशा समस्त शेतकऱ्यांची व्यथा लेखक रुद्राक्ष कदम यांनी ‘महापूर’ या कादंबरीतून आपल्यासमोर मांडली आहे. सदा नावाच्या गोदावरी नदी किनारी ‘आडवळणी’ नावाच्या गावात राहणाऱ्या शेतकऱ्याची ही कथा आहे.

शेतात पिकणारे धान्य हे एकच एक शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे साधन असते. त्याचे भवितव्य हे पूर्णत: निसर्गाच्या लहरी स्वभावावर अवलंबून असते. पुरेशा पावसाअभावी शेतकरी पेरण्या करू शकत नाहीत. रोज दिवस उगवला की मावळेपर्यंत बळीराजा पावसाची अक्षरश: चातकासारखी वाट पाहात असतो. एकावर एक दिवस कोरडे जाऊ लागले की शेतकऱ्याचे उसने अवसान व मनोधैर्य खचू लागते.

महाराष्ट्रात सर्वाधिक शेतक-यांच्या आत्महत्या
husband wife video viral
बायकोच्या बाजुला बसून नवरा बघतोय इतर मुलींचे फोटो, Video पाहून म्हणाल बायको बायकोच असते…
vina vijayan ed case
मुख्यमंत्र्यांच्या मुलीवर ईडीची कारवाई; केरळमध्ये काय घडतंय?
Shahpurkandi
यूपीएससी सूत्र : जम्मू काश्मीरच्या सीमेवरील शहापूरकंडी धरण अन् राजकीय पक्षांना असलेली आयकरातील सूट, वाचा सविस्तर…

पावसाविना धंदा नाही, पीक नाही आणि कुठल्याही व्यवसायाला चालना नाही. मग उपजीविकेच्या शोधात तरुण वर्ग शहराकडे धाव घेतो. भूमिहीन लोकांवर उपासमारीची वेळ येते. उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे व उपासमारीला कंटाळल्यामुळे ग्रामीण भागातील लोक डाके, चोरी, खिसे कापू, भुरटय़ा चोऱ्या असे प्रकार करण्यास सुरुवात करतात. चोरी-लूटमारीच्या भीतीमुळे एकटी बाई शेतावर जायला घाबरते. सर्वत्र अफवा पसरतात. त्यामुळे जिवाच्या आकांताने जरी कोणी ओरडले तरी कोणीही मदतीसाठी धावून येत नाही. उसनवारी बंद पडल्यामुळे घरातील सोनेनाणे विकायची वेळ येते. गावातील सर्व जनजीवन विस्कळीत होऊन जाते. सर्वात जास्त हाल मुक्या जनावरांचे होतात. हिरव्या चाऱ्यावाचून दुभती जनावरे दूध देईनाशी होतात.

शेतीमालाला कधीही मूलभूत हमीभाव नसतो. एकूण उत्पादनावर शेतीमालाचा भाव ठरवला जातो. जर शेतीमाल सरासरीपेक्षा जास्त झाला तर भाव कमी होतो. उत्पादन कमी झाले तर स्थिर राहतो. त्यामुळे गरीब बिचाऱ्या शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कसा व कुठून काढायचा हा कायमस्वरूपी प्रश्न दुर्लक्षित राहतो. राजकीय नेते आणि सरकार या दोघांच्या जाळ्यात शेतकरी नेहमी भरडला जातो. बी, बियाणे, खते मुबलक प्रमाणात असतानादेखील त्याची कृत्रिम टंचाई करून वाजवीपेक्षा जास्त दरात विकली जातात. हे सर्व करण्यात राजकारणी लोकांचा हात असतो.

पावसाच्या अभावामुळे शेताला पाणी तरी द्यायचे कुठून? या प्रश्नाने शेतकरी हैराण असतो. बरं साठवलेलं पाणी शेतासाठी वापरले तर पिण्यासाठी पाणी आणायचे कुठून? सलग काही दिवस पाऊस पडला नाही तर सरकारने दुष्काळग्रस्त गाव जाहीर केल्यास काही विशेष सवलती मिळू शकतील एवढी एकच आशा उरते. जसे की अन्नधान्य, रॉकेल कमी दराने मिळेल. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे होऊन नुकसानभरपाई मिळेल इत्यादी. प्रत्येकाची समस्या निराळी, त्या सर्वाचे निवारण सरकार वैयक्तिक पातळीवर करू शकत नाही.

गावची समस्या, गावकऱ्यांच्या व्यथा सरकापर्यंत पोचवण्यासाठी सरपंचाच्या आमंत्रणावरून पत्रकार गावात येतात. जिल्ह्य़ाचे खासदार दुष्काळ जाहीर करून घेण्यासाठी रात्रंदिवस झगडतात. अनुदान मिळेपर्यंत निदान वर्तमानपत्रात बातमी छापून आली एवढाच दिलासा असतो. आतातरी दुष्काळ जाहीर होईल ही आशा त्यामुळे बळावते. अशा दुष्काळग्रस्त परिस्थितीत वीज वितरण कंपनीचे लोक गावात येऊन त्वरित वीजबील भरा नाहीतर कनेक्शन कापू अशी धमकी देतात. पाण्याचा तुटवडा किंवा पाणीच नाही तर वॉटरपंप वापरलेच जात नाहीत. मग त्यावर वीजबील कुठले आकारले जाते हा प्रश्न तसाच उरतो. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सरकार फक्त एखाद्या बहिऱ्या व्यक्तीप्रमाणे ऐकून घेते. कधीही न पुसल्या जाणाऱ्या आसवांचे डाग देत शेतकरी मात्र सतत रडत असतो. गावातील काही शेतकऱ्यांनी आपली जमीन सावकाराला लिहून दिलेली असते. काही शेतकरी कर्जबाजारी असतात. केवळ पावसाअभावी सर्व प्रगती खुंटल्यामुळे त्यांच्यावर माती खायची वेळ येते. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोणीही आपलेपणाने व बारकाईने लक्ष पुरवत नाही. त्यामुळे काबाडकष्ट करूनही हाती काहीच लागत नाही त्यातून व्यसनाधीनता व आत्महत्या या दुष्ट चक्रात शेतकरी अडकतो. घरातील मुलीचे लग्न करताना शहरातील नोकरदाराला भले मागेल तो हुंडा देऊन करू, पण गावातील शेतकऱ्याला मुलगी देणार नाही अशीही मानसिकता तयार होते.

शेतकरी मागून मागून काय मागतात तर शेतीसाठी पाणी, शेतीसाठी खते, शेतीसाठी कर्ज आणि उत्पादनाला परवडेल असा मालाला भाव. या सर्व मागण्यांसाठी शेतकरी कधीच रस्त्यावर उतरत नाही. आंदोलन करत नाही. ज्यामुळे सरकारी व्यवस्था कोलमडेल. जर तसा प्रयत्न झालाच कधी तर पोलिसांचा लाठीमार त्यांना सहन करावा लागतो. आमच्या जनावरांसाठी चारा द्या आणि आमच्या लोखंडाच्या हाताला निदान काही काम द्या. एवढेच मागणे असते त्यांचे. पण सरकार तेही देऊ शकत नाही. शेती म्हणजे उदरनिर्वाहाचे निव्वळ साधन नाही तर ती राष्ट्राची सेवा आहे.

‘महापूर’ मधून शेतकऱ्यांच्या समस्या शहरी माणसांपर्यंत पोचवण्याचे एक मोठे काम लेखक रुद्राक्ष कदम यांनी केले आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळो, ही सदिच्छा!

महापूर, लेखक : रुद्राक्ष कदम, प्रकाशक : जनशक्ती वाचक चळवळ, पृष्ठ संख्या : १५२, मूल्य : १६०/- रु.

रश्मी गोळे – response.lokprabha@expressindia.com