|| जयश्री हरि जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाबरीपतनाचा फाळ भारतीय मनात आज २५ वर्ष उलटल्यानंतरही खोलवर रुतलेला आहे आणि त्यातून उद्भवलेल्या संघर्षांची नवनवी रूपं सातत्यानं समोर येत आहेत. देशाच्या इतिहासातील या अंधाऱ्या वळणावर काय घडवून आणलं गेलं, काय घडून गेलं आणि त्यानंतर काय घडत राहिलं, याचा लेखाजोखा मांडणाऱ्या स्मृतिग्रंथाचा हा परिचय..

६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत एक वादग्रस्त इमारत जमीनदोस्त झाली आणि भारताच्या संस्कृतीचा पाया असलेल्या एकात्मतेवर, सहिष्णू समाजरचनेवर, भारतीय प्रजासत्ताकाच्या लोकशाहीवर निर्णायक आणि मर्मभेदी आघात झाला. स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातला हा एक काळा अध्याय. बाबरीपतनाला गतवर्षी २५ वर्षे पूर्ण झाली. आज २६ वर्षांनंतरही बाबरीपतनाचा फाळ प्रत्येक संवेदनशील भारतीय मनात खोलवर रुतलेला आहे. परिणामी दोन समाजांत निर्माण झालेली दुही आजतागायत संघर्षांची नवनवी रूपे घेऊन भारताला भेडसावत राहिली. या घटनेचे सामाजिक पडसाद देशभरात उमटले, सर्वसामान्यांची हत्यासत्रे घडत राहिली, आर्थिक व आंतरराष्ट्रीय धोरणांवर हानीकारक परिणाम होत राहिला आणि त्यातून देशाचा व पर्यायाने प्रत्येक भारतीयाचा तोटाच होत गेला. बाबरीपतनानंतर देशभर हिंदू-मुस्लीम दंगली धुमसत राहिल्या आणि १९९३ च्या बॉम्बस्फोटांनी मुंबई शहर बेचिराख करून टाकले. या दंगली राजकीय कृती होत्या. धर्माध शक्तींच्या कट-कारस्थानाला सहज बळी पडण्याइतका भारतीय समाज निर्बुद्ध नाही, एव्हाना त्याला हवी तेवढी राजकीय समज आलेली आहे. परंतु धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या व ‘सेक्युलर’ म्हणवणाऱ्या कथित राजकीय पक्षांच्या बुद्धिबळाचा पट कसा फिरवला जातो, हे समजण्याइतका आपला समाज अजून प्रगल्भ झालेला नाही.

‘सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अ‍ॅण्ड सेक्युलॅरिझम (सीएसएसएस)’ने प्रसिद्ध केलेल्या ‘बाबरी मस्जिद, २५ इयर्स ऑन..’ या विशेष पुस्तकात या विषयाला वेगळ्या पद्धतीने संकलित करण्यात आले आहे. समीना दलवाई, रामू रामनाथन आणि इरफान इंजिनीअर यांनी संपादित केलेल्या या पुस्तकाने बाबरी प्रकरणाचा विविध अंगांनी आढावा घेतलेला आहे. उपेंद्र बक्षी यांनी लिहिलेल्या विवेचक प्रस्तावनेत पुस्तकातल्या लेखांचे बहुआयामी स्वरूप रेखाटले आहे. या पुस्तकात एकूण १५ स्मरणवृत्तांत आहेत. त्यांत ही घटना प्रत्यक्ष पाहिलेल्या पत्रकारांचा समावेश आहे, विचारवंत-सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला बाबरीसंदर्भातील राजकीय घटनांचा ऊहापोह आहे आणि नामवंत रंगकर्मीनी त्यांचे अनुभव विशद केले आहेत. हे सर्व लेखक एक समाजभान असलेले जागरूक नागरिक आहेत आणि सकारात्मक ऊर्जेने भारलेले आहेत. ही वैयक्तिक कथने आणि स्मरणवृत्तांत समकालीन समाजमानसाचे कवडसे आहेत. सामाजिक संभाषिते आणि अल्पसंख्याकांची दु:स्थिती यावर या पुस्तकातून प्रकाशझोत पडतो.

बाबरीपतनानंतर घडत गेलेल्या हिंसक आणि विध्वंसक हल्ल्यांनी समाजाच्या विविध स्तरांतल्या नागरिकांचे दैनंदिन आयुष्य अवघड होत गेले आणि वावटळीत सापडल्यासारखे हे सर्वसामान्य नागरिक भोवंडून गेले. त्यांच्या व्यक्तिगत अनुभवकथा या पुस्तकात मांडल्या आहेत. काही वृत्तांत मराठीतून इंग्रजीत अनुवादित केलेले आहेत.

मुळात, २५ वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेबद्दल आणि त्यानंतर भारतभर उसळलेल्या अभूतपूर्व हिंसाचाराबद्दल आजच्या तरुण पिढीला- अगदी ३५ वर्षांच्या नागरिकालाही- व्यक्तिगत पातळीवर कोणतीही उजळ स्मृती नाही. या घटनेबद्दल त्यांच्या जाणिवा घडत गेल्या आहेत त्या समाजमाध्यमे, अभ्यासक्रमातली पुस्तके आणि त्यांच्या भवतालातून. या इतिहासाच्या अध्यायाचा दुसरा चेहरा समोर आणावा यासाठी या पुस्तकाची निर्मिती करण्याचा विचार आकार घेऊ  लागला. दिल्लीस्थित अभ्यासक व सामाजिक कार्यकर्त्यां समीना दलवाई आणि मुंबईस्थित पत्रकार, नाटककार, लेखक व कवी रामू रामनाथन यांना कळकळीने वाटते की, मानव-अधिकारांची सजग परिपूर्ती करायला तयार असणारी सज्ञान सामाजिक मानसिकता आणि एक मजबूत, पारदर्शक व नि:पक्षपाती न्यायव्यवस्था या दोन्ही गोष्टी लोकशाहीची दोन प्रमुख अंगे आहेत, ही जाणीव या देशातील युवा पिढीला करून द्यायला हवी.

या पुस्तकाविषयी समीना दलवाई सांगतात- ‘मागे वळून पाहताना असं लक्षात आलं की, या घटनेबद्दल वाटणारी हताशा, वैफल्य आणि तीव्र संताप यांची जागा हळूहळू एका तटस्थ वैचारिक अभ्यासू नजरेनं घेतली आहे. काय घडवून आणलं गेलं, काय घडून गेलं आणि त्यानंतर काय घडत राहिलं याचा एक विशुद्ध लेखाजोखा मांडण्याचा हा प्रयत्न आहे. भीषण, आघातजन्य घटनांचा अनुभव घेतलेल्या बिगरराजकीय लोकांच्या स्मृतींचा हा प्रवाह आहे. या आठवणी, स्मृती आणि स्मरणकथने यांचं संकलन करणं, कालक्रमानुसार या इतिवृत्तांची मांडणी करणं हे ऐतिहासिकदृष्टय़ा आवश्यक होतं. युवा पिढीपर्यंत निष्पक्षपणे हा अनेकवचनी भूतकाळ पोहोचवण्याची आपली जबाबदारी आहे.’ तर पुस्तकाचे दुसरे संपादक रामू रामनाथन म्हणतात- ‘या घटनाक्रमाचे पुन:परीक्षण व्हावे म्हणून लोकांना लेखनाला उद्युक्त करणं हेच फार मोठं आव्हान होतं. अनेक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या वेदनादायी भूतकाळाची स्पंदनं स्मरणातही पुन्हा अनुभवायचं नाकारलं, इतका तो अनुभव विदारक होता.’

धार्मिक दुराग्रहाच्या आणि धर्माधतेच्या उसळत्या ज्वलंत लाटांनी वर्तमानकाळ सातत्याने होरपळून निघत असताना हे पुस्तक एक महत्त्वाचा थांबा आहे. त्यात तुम्हा-आम्हासारखी माणसे, शेजारीपाजारी, मित्रगण, नातेवाईक आणि त्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार अशा नानाविध लोकांनी त्यांचे विचार मांडले आहेत.

आता या पुस्तकाच्या अंतरंगाकडे वळू या.

सुरुवातीलाच पत्रकार अनंत बागाईतकरांच्या ‘काऊंटडाऊन टू अयोध्या’ या लेखातील मजकूर संस्थात्मक कार्यप्रणालीच्या पडझडीवर बोट ठेवतो. जात, धर्म आणि समुदाय यांचा वापर करून जेव्हा बुद्धय़ाच तेढ वाढवली जाते, तेव्हा सर्वसामान्य नागरिक आणि प्रतिष्ठित संस्था घटनेतल्या तत्त्वांची आणि नियमांची बेधुंद निर्गल पायमल्ली करतात- अशा अनुभवाचे हे चित्रण.

बाबरीपतनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनापासून प्रत्यक्ष कृती आणि नंतरचे रक्तरंजित वास्तव हे सर्व प्रताप आसबे यांनी पत्रकार म्हणून प्रत्यक्ष अनुभवले आहे. ‘विटनेस नंबर- २१३’ या लेखात त्यांनी बाबरीपतनाचे प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून यांसदर्भात लखनौ येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयात चाललेल्या खटल्यात दिलेल्या साक्षीच्या अनुषंगाने हा अनुभव मांडला आहे. अयोध्येत बाबरीपतनाच्या आधी आणि नंतर काय घडलं, त्याची सुनियोजित आखणी कशी करण्यात आली, हिंसाचाराची बीजं कशी पेरली गेली आणि त्यामागच्या राजकीय खेळीची सूत्रे कशी हलवली जात होती, याचा हा साद्यंत वृत्तांत आहे.

नाटय़कर्मी सुधन्वा देशपांडे यांच्या लेखाचा इथे खास उल्लेख करायला हवा. सुधन्वा ‘जन नाटय़ मंच’ ही नाटय़संस्था दिल्लीत चालवतात. ते सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासकही आहेत. १९८४ मधील शिखांच्या विरोधातील दंगलीपासून त्यांचा लेख सुरू होतो आणि पुढे धार्मिक राजकारणाची अभद्र पायाभरणी, भोपाळ वायुगळती दुर्घटना, शाहबानो खटला, राजस्थानच्या देवरालातील रूपकंवर सती प्रकरण, पथनाटय़कार सफदर हाश्मी यांची हत्या.. या सर्व घटनाक्रमांतून त्यांची सामाजिक आणि राजकीय समज कशी विकसित होत गेली, हे सांगत त्या पार्श्वभूमीवर त्यांनी बाबरीपतनाचे विश्लेषण केले आहे. त्यामुळे या लेखाचे प्रतल विस्तृत झाले आहे.

नाटककार शफाअत खान यांनी मोठय़ा संयतपणे, पण निर्भीडपणे भारतात मुस्लीम म्हणून जगण्याची परिमाणे सुस्पष्ट मांडली आहेत. भारतीय मुस्लीम नागरिकाला वाटणारी निर्वासिताची भावना त्यांनी प्रखरपणे समोर ठेवली आहे. तर मनस्विनी लता रवींद्र यांनी ‘व्हाय आय नेव्हर विश टू फरगेट द व्हायलन्स’ या शीर्षकाच्या लेखात विचार करायला लावणारे मुद्दे मांडले आहेत. कपाळावर कुंकू किंवा टिकली लावून एखाद्या धर्माशी आपले नाते अधोरेखित करताना ‘आत्मसंरक्षण’ आणि ‘वैयक्तिक पातळीवरची मूल्यप्रणाली’ यांतली रस्सीखेच त्यांनी शब्दबद्ध केली आहे.

याशिवाय जॉय सेनगुप्ता यांनी ‘बॅटलिंग द गॉड्स इन अ लॉस्ट कॉज’ हा सडेतोड लेख लिहिला आहे. त्यात बाबरीपतनाच्या आधीचा आणि नंतरचा भारत अशी दोन चित्रे ते उभी करतात. समाजमानसात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कटिबद्ध असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचे आजचे नेमके स्थान काय, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न शमा दलवाई यांनी केला आहे. जर प्रत्येकाने आपापल्या वस्ती आणि मोहल्ल्यात हिंसाचार रोखण्यासाठी प्रयत्न केले तर दंगलींना सहज अटकाव करता येईल, या महात्मा गांधीजींच्या फाळणीच्या काळातील दृष्टिकोनाचा त्यांनी या संदर्भात कसा वापर केला, हा अनुभव बरेच काही शिकवून जातो.

हेलन भारदे यांनी निर्वासितांसाठी छावणी चालवतानाच्या विषण्ण करून टाकणाऱ्या आठवणींचा पट उलगडला आहे. फ्लाविया अ‍ॅग्नस या स्त्रीविषयक व महिलाकल्याण कायदेतज्ज्ञ आहेत. त्यांनी ‘वॉकिंग द टाइट्रोप : बॅलन्सिंग जेण्डर अ‍ॅण्ड कम्युनिटी’ या लेखात स्त्रीवादी चळवळीबद्दल महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. १९९३ च्या पार्श्वभूमीवर स्त्रीमुक्तीची चळवळ मागे पडली, तिची पीछेहाट झाली. अ‍ॅग्नस यांच्या मते, कुठल्याही हिंसाचारात, दंगलीत स्त्रियांना नेहमी दुहेरी झळ पोहोचते. स्त्रीवाद आणि अल्पसंख्याकांचे हक्क यांची एकमेकांशी असलेली पक्की वीण समजून येणे ही अभ्यासकाच्या आयुष्यातली महत्त्वाची पायरी आहे, असे त्यांना वाटते.

रेखा ठाकूर यांनी ‘डय़ुअल अजेण्डा : मॅसकर ऑफ मुस्लिम्स अ‍ॅण्ड क्रिमिनलायझेशन ऑफ बहुजन’ या लेखात राजकीय षड्यंत्रावर ताशेरे ओढले आहेत. एम. हसन हे मानववंशशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि नागरी हक्कांचे पुरस्कर्ते. त्यांनी बाबरीपतनाच्या काळात ‘पिंक सिटी’ अर्थात जयपूरमध्ये वाढलेली धार्मिक तेढ, भडकलेल्या दंगली आणि सैतानी प्रवृत्तींशी दोन हात करताना सामाजिक विणीच्या कशा चिरफळ्या उडतात, या साऱ्याचे विश्लेषण केले आहे.

शैला सातपुते यांनी जखमी राष्ट्राची व्याख्या केली आहे  आणि १९९३ च्या दरम्यान आणि नंतरही मुंबईतल्या धर्माध वादळाशी दोन हात करताना झालेली ससेहोलपट वृत्तांकित केली आहे. बाबरीपतनाच्या काळात पेरला गेलेला विषवृक्ष आता कसा फोफावला आहे, हे त्या नोंदवतात. संजीवनी जैन यांनी त्यांच्या लेखात बाबरी-अनुभवाशी दोन हात करताना शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र येऊन लोकांच्या मानसिकतेत सकारात्मक ऊर्जेची निर्मिती कशी करू शकतात, याचा अनुभव मांडला आहे. या पुस्तकाचे तिसरे संपादक इरफान इंजिनीअर यांनी समारोपाच्या लेखात कायद्याच्या अनुषंगाने बाबरीचे ऐतिहासिकदृष्टय़ा असलेले महत्त्व विशद केले आहे.

सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील संघर्षांशी राजकारण आणि कायदेशीर लढाई या दोन बाबींचा दुवा जोडून देणारे हे पुस्तक एक स्मृतिग्रंथ आहे, आणि संस्मरणीयही! भारतीय इतिहासातील या अंधाऱ्या वळणावरही या लेखकांची प्रतिभा मात्र लखलखीत आहे. उपरोध, नर्मविनोद, भाव-संवेदना आणि उत्तरगर्भ प्रश्नांनी त्यांचे लेखन परिपूर्ण उजळलेले आहे.

या पुस्तकातले अनुभवकथन सर्वसामान्यांच्या वतीने लिहिले गेले आहे, त्यांच्या मुखातून उमटलेले आहे. दंगलीकडे बघण्याचा सर्वसामान्य परिप्रेक्ष्य काय असतो, हे या पुस्तकाने कसलाही अभिनिवेश न ठेवता, ठामपणे आणि निर्भीडपणे समोर आणले आहे. अजूनही अनेक आवाज असेच काही सांगू इच्छित असतील. समीना दलवाईंसारख्या समर्थ व्यक्तीने या पुस्तकाचा पुढचा भाग काढायचे ठरवले असेलही!

वैयक्तिक अथवा सामूहिक स्मरणांचे अचूक प्रतिबिंब इतिहासात खरोखर असते असे म्हणता येणार नाही. पण अशा सामूहिक स्मरणातून परंपरेची जडणघडण मात्र होत जाते. अशा वेळी या पुस्तकासारखे तटस्थ, प्रस्थापित इतिहासाला आणि आभासी राष्ट्रीय मिथकांना आव्हान देऊन आपल्याला लोकजाणिवेकडे घेऊन जाणारे काही हाती येणे ही काळाची गरज आहे.

इतिहास आणि स्मृती यांतील दरी सांधण्याचा प्रयत्न हे पुस्तक करते. ही भावना आगा शाहीद अली यांच्या कवितेत सुयोग्यरीत्या सामोरी येते. ते म्हणतात- ‘तुमचा इतिहास माझ्या स्मृतींच्या वाटेत आडवा येतो’ आणि ‘तुमच्या स्मृती माझ्या स्मृतींची वाट अडवतात.’!

पुस्तकाचे मुखपृष्ठही विषयाला पूर्णत: न्याय देणारे आणि अर्थपूर्ण झाले आहे. पूर्ण काळी पार्श्वभूमी, त्यावर शुभ्र अक्षरात शीर्षक- बाबरी मस्जिद, (हा स्वल्पविरामही चिन्ह म्हणून बोलका आहे) २५ इयर्स ऑन.. आणि शब्दलोपाची तीन रक्तवर्णी पारदर्शक टिंबे.. किंवा थेंब!

  • ‘बाबरी मस्जिद, २५ इयर्स ऑन..’
  • संपादन : समीना दलवाई, रामू रामनाथन, इरफान इंजिनीअर
  • प्रकाशक : ग्यान-सीएसएसएस
  • पृष्ठे : २३४, किंमत : २९५ रुपये

(((एक्स्प्रेस वृत्तसमूहाच्या संग्रहातील छायाचित्र)

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Babri masjid 25 years on
First published on: 08-12-2018 at 00:13 IST