तेव्हा आजच्यासारखे संगीताच्या स्पर्धाचे पेव फुटलेले नव्हते. अभिजात संगीतात काही हालचाल करणाऱ्यांएवढीही प्रतिष्ठा चित्रपट गीतांची नक्कल करणाऱ्यांना नव्हती. सत्तरच्या दशकातील ही सांस्कृतिक स्थिती बदलण्यास जे अनेक जण कारणीभूत झाले, त्यात चंद्रशेखर गाडगीळ यांचे नाव अपरिहार्य आहे. गणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमात भावगीते स्थिरस्थावर झाल्यानंतर लोकप्रिय ठरत चाललेल्या चित्रपट संगीतानेही प्रवेश केला. हुबेहूब गाणी सादर करणाऱ्या कलावंतांना त्या वेळी कडक भाव असे. चंद्रशेखर गाडगीळ यांनी बरोबर याच पद्धतीने आपले गाणे विकसित केले आणि त्या वेळच्या रसिकांना आपल्या प्रेमात पाडले.
ऑर्केस्ट्रा ही कल्पना तेव्हा नुकतीच उदयाला येत होती. चित्रपटाच्या रुपेरी दुनियेत थेट प्रवेश मिळवणे जेवढे दुरापास्त होते, तेवढेच त्यावर आपले जगणे अवलंबून ठेवणेही. गाडगीळ यांनी त्यासाठी अपार कष्ट घेतले आणि आपले गाणे कसदार करण्यासाठी शक्य ते सर्व केले. किराणा घराण्याचे गायक पं. सदाशिवराव जाधव यांच्याकडे त्यांनी शास्त्रशुद्ध गायकी समजावून घेतली. मन्ना डे किंवा महमद रफी यांच्या गायनातील सुरांची सर्फा आपल्याही गळ्यात यावी, यासाठी अभिजात संगीताबरोबरच उच्चार आणि शब्दफेक यांचाही त्यांनी अभ्यास केला. त्यामुळेच अल्पावधीत पुण्यासारख्या शहरात त्यांना लोकप्रियता मिळाली. ही पसंतीची पावती घेऊन चंद्रशेखर गाडगीळ यांनी महाराष्ट्र गाजवला. स्वत:चा ऑर्केस्ट्रा निर्माण केला आणि मग त्यांच्या पायाला भिंगरी लागली. पण तेवढय़ाने त्यांचे समाधान होणारे नव्हते. स्वत:चे गाणे त्यांना गायचे होते. लोकप्रिय गीतांची नक्कल करणे हे अवघड असले, तरी अस्सल नसते, याची जाणीव असल्याने गाडगीळ यांनी वेगवेगळ्या प्रयोगांना सुरुवात केली. त्यातच त्यांचे गाणे ऐकून राम कदम यांनी त्यांना पाश्र्वगायनाची संधी दिली. अनेक गाजलेली गीते त्यांच्या नावावर जमा होऊ लागली आणि मग थेट आर. डी. बर्मन यांचाच बुलावा आला.   
स्वत:मधील सर्जनशीलता शोधता शोधता त्यांनी     बा. भ. बोरकर यांच्या कवितांना संगीत देऊन त्याचा एक स्वतंत्र कार्यक्रमच तयार केला. कालौघात ऑर्केस्ट्रा हा प्रकार मागे पडू लागला. संगणकावरच सगळे उपलब्ध होत असताना अशा कार्यक्रमांना ओहोटी लागणे स्वाभाविक होते. मेलडी मेकर्ससारख्या त्या काळातील ऑर्केस्ट्रामध्ये गायनाची संधी मिळणे हेच प्रतिष्ठेचे होते. गाडगीळ यांनी त्या संधीचे सोने केले. अंगी उत्तम कलागुण असतानाही अपेक्षेएवढे यश न मिळण्याने कलावंतावर आत्ममग्न होण्याची वेळ येते. गाडगीळ यांनी त्यावरही मात करत आपले कलाजीवन समृद्ध करण्याचाच प्रयत्न केला. त्यांच्या निधनाने ऑर्केस्ट्राच्या जमान्यातील एक सुंदर आठवण पुसली गेली आहे.