युद्ध हा कोणत्याही समस्येवरचा अंतिम उपाय नसतो. त्यामुळे युद्धाची वेळ आलीच तर त्याला मुत्सद्देगिरीची जोड देत कुठे थांबायचे, कितपत ताणायचे यावर विचार करून निर्णय घ्यावा लागतो. सरकार कोणतेही असो, त्याचा प्राधान्यक्रम असाच असतो. गेल्या दहा वर्षांपासून देशभर सुळसुळाट झालेल्या नव-राष्ट्रवाद्यांना हे कदाचित ठाऊक नसावे. म्हणूनच त्यांनी शस्त्रसंधी जाहीर होताच काहीही कारण नसताना देशाचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांना लक्ष्य केले. त्यांचा दोष काय तर, कर्तव्य म्हणून हा निर्णय त्यांनी जाहीर केला. या मोठ्या निर्णयाशी अतिउच्चपदस्थ सत्ताधारी नेत्यांचाही संबंध असणारच आणि मिस्री केवळ तो जाहीर करण्याचे काम करताहेत, हा विचार अतिउत्साही भक्तमंडळींनी केला नाही. मिस्रींना, त्यांच्या मुलीला वाईट भाषेत ‘ट्रोल’ करण्याचे प्रमाण रविवारी इतके वाढले की अखेर मिस्रींना त्यांचे ‘एक्स’वरील खाते ‘पोस्ट प्रोटेक्ट’ करावे लागले. मूळचे काश्मिरी असलेले मिस्री हे परराष्ट्र सेवेतील अतिशय उमदे व निष्कलंक अधिकारी म्हणून ओळखले जातात. तणावाच्या चार दिवसांत त्यांनी माध्यमांसमोर सरकारची बाजू संयत व प्रभावीपणे मांडली. विचारीजनांच्या वर्तुळात त्यासाठी त्यांचे कौतुक होत असताना जल्पकांनी त्यांना लक्ष्य करून आपला ‘खरा’ चेहरा दाखवून दिला.
मुळात या टोळांची निर्मिती सत्ताधाऱ्यांकडून झाली ती विरोधकांवर आभासी धाडी टाकण्यासाठी. मागचा पुढचा कसलाही विचार न करता तुटून पडायचे एवढेच त्यांना ठाऊक. सारासार विचार करणारा मेंदू गहाण ठेवत ‘वरून’ आलेल्या आदेशाचा आपापल्या कुवतीने अर्थ लावायचा नि सुरू व्हायचे, हेच त्यांचे काम. कमालीचा धार्मिक द्वेष यांच्यात ठासून भरवला गेलेला. पक्षपुरस्कृत ‘उच्छादा’मुळे आपण म्हणू तेच अंतिम सत्य अशी यांची भावना झालेली. हे असे जल्पक आपल्यावरच उलटू शकतात याची जाणीव या निमित्ताने सत्ताधाऱ्यांना झालेली बरी. युद्धातून मिळणारे तत्कालिक यश संपूर्ण देशात राष्ट्रभक्तीची भावना चेतवण्यासाठी कामी येत असले तरी याचे दीर्घकालीन परिणाम हे विकासात बाधा निर्माण करणारे असतात याची जाणीव कदाचित या जल्पकांना नसावी. कुठलाही जहाल विचार हा युद्धाची खुमखुमी जागवणारा असतो. त्यातून तयार होणारी वीरश्री एकदा अंगात संचारली की संपूर्ण जगाला अक्कल शिकवण्याचा मक्ता आपल्याकडेच अशी भावना तयार होते. त्यामुळे या जल्पकांनी मिस्रींना त्रास दिलाच पण परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनाही ‘ट्रोल’ करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. अमेरिकन नागरिक असलेल्या त्यांच्या मुलाला या वादात नाहक ओढले गेले तर पॅलेस्टाइनवर अभ्यास करणाऱ्या व त्यावर आधारित एक लेख ‘द वायर’मध्ये लिहिणाऱ्या मिस्रींच्या मुलीवरसुद्धा आरोपाचे शिंतोडे उडवले गेले. याआधी याच जल्पकांनी पहलगामच्या हल्ल्यात पती गमावणाऱ्या हिमांशी नरवालवरही असाच असभ्य भाषेचा मारा केला होता. तिचा दोष एवढाच की तिने या हत्याकांडाकडे धार्मिक दृष्टिकोनातून बघू नका असे जाहीर आवाहन केले होते.
केंद्र सरकारने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करण्याचा निर्णय सामूहिक जबाबदारीतून घेतला होता. यासाठी विरोधी पक्षांनाही विश्वासात घेतले होते. या निर्णयाची माहिती देण्याचे काम परराष्ट्र खात्याचे सचिव म्हणून मिस्रींनी केले असेल तर नंतर झालेल्या शस्त्रविरामासाठी नेमके तेच दोषी कसे, हा साधा प्रश्न ज्या जल्पकांना पडत नाही, त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच! लष्करी कारवाई सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे तीन दिवस लष्करासोबतच मोदी सरकारचे गुणगान गाणारे हे उचापती लोक माघारीसाठी मोदींना जबाबदार धरण्याची हिंमत दाखवू शकले नाहीत. असा पेचप्रसंग जेव्हा असल्या अविचारी लोकांसमोर उभा ठाकतो तेव्हा ते संताप व्यक्त करण्यासाठी नेहमी ‘सॉफ्ट टार्गेट’ निवडतात. त्यामुळेच मिस्री या झुंडीच्या रोषाचे बळी ठरले. अशा झुंडी तयार करणे सोपे. मात्र त्यांना हाताळणे किती कठीण असते याचा परिचय अलीकडे वारंवार सत्ताधाऱ्यांना येऊ लागला आहे. अयोध्येचा मुद्दा मार्गी लागल्यावर कायम उन्मादी अवस्थेत जगणाऱ्या या जल्पकांनी नंतर प्रत्येक मशिदीखाली मंदिर शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. अखेर सरसंघचालक मोहन भागवतांनीच शोध थांबवा असे आवाहन केले. तरी अजूनही या उचापतखोरांची शोधमोहीम पूर्णपणे थांबलेली नाही. पाकिस्तानविरुद्ध केलेली कारवाई ही धार्मिक उन्मादाला जन्म देणारी ठरू शकते एवढेच या जल्पकांना ठाऊक आहे. हाच उन्माद प्रत्येक निवडणुकीत यश मिळवून देण्यासाठी कामात येतो याच भूमिकेत हे लोक वावरत असतात. पाकिस्तानला बेचिराख करून टाका ही भाषा येते ती यातून. असे करून निवडणुकीत यश संपादन करता येईल पण सरकार चालवण्याचे काय? त्या पातळीवर हा उन्माद कामाचा नसतो. तिथे कामी येतो तो मुत्सद्दीपणा. त्याचे दर्शन सरकारने या निर्णयातून घडवले. पण या जल्पकांना हे कोण समजावून सांगणार?