दिल्लीत सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक विजय रमण यांना श्रीनगरमधून फोन आला, ‘सर, गाझीबाबा इथे आला आहे’. गाझीबाबा हा दहशवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’चा कमांडर इन चीफ होता. २००१मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्याचा हाच सूत्रधार होता. विजय रमण यांना जम्मू-काश्मीर माहीत होते. त्यांनी गाझीबाबाला पकडण्याची जबाबदारी स्वत:हून घेतली. रमण यांच्या नेतृत्वाखाली गाझीबाबाच्या मुसक्या आवळण्याची गुप्त मोहीम हाती घेतली गेली. गाझीबाबाचा ठावठिकाणा सापडला. निमलष्करी दलाने कारवाई करून गाझीबाबाचा खात्मा केला. विजय रमण यांनी गाझीबाबाला भारताचा ओसामा बिन लादेन म्हटले. ओसामासारखा तोही क्रूर होता हे खरेच, दोघांतील आणखी एक साम्य असे की, दोघांनाही एकाच पद्धतीने मारले गेले. अमेरिकन कमांडोजनी ओसामाच्या तीन मजली इमारतीमध्ये घुसून गोळ्या घातल्या तशाच आपल्या जवानांनी तीन मजली इमारतीत घुसून छुप्या कोनाड्यात लपलेल्या गाझीबाबाला हेरले. मग, ही इमारत उद्ध्वस्त केली गेली. आयपीएस अधिकारी विजय रमण यांची ही जम्मू-काश्मीरमधील तिसरी आणि सर्वांत यशस्वी कामगिरी होती. गाझीबाबा, त्याची पत्नी, त्यांची छोटी मुलगी, गाझीबाबाला पकडण्यासाठी राबवलेली मोहीम, एका सुतारामार्फत गाझीबाबापर्यंत पोहोचण्याचा प्लॅन असे अनेक गुंगवून टाकणारे तपशील ‘डिड आय रिअली डू ऑल धिस?’ या पुस्तकात वाचायला मिळतील.

ज्येष्ठ पोलीस अधिकारी विजय रमण यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीतील गाझीबाबाचा खात्मा ही एक घटना झाली. अनेक धाडसी घटनांच्या धाडसी कथा पुस्तकात आहेत. भारतीय पोलीस सेवेतले (आयपीएस) अधिकारी म्हणून कर्तव्य बजावताना केलेल्या कामगिरीच्या कहाण्या त्यांच्या आत्मकथेमध्ये आहेत. पोलिसी कारवायांच्या या घटनांची वर्णने सुरस, उत्सुकता वाढवणारी आहेत. वाचताना त्या रम्यही वाटू शकतात. पण प्रत्येक घटनेमध्ये स्वत:चीच नव्हे तर पोलीस सहकाऱ्यांच्या जिवाची बाजी लागलेली होती, हे जेव्हा वाचकाला जाणवते तेव्हा या कथांमागील वास्तव प्रकर्षाने समोर येते. मग, या पुस्तकाकडे वेगळ्या नजरेने पाहाता येऊ शकते.

लोकांना पटकन लक्षात यावे म्हणून विजय रमण यांची आणखी एक ओळख सांगता येईल. चंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोर पानसिंह तोमर याला ठार मारणारे पोलीस अधिकारी म्हणजे विजय रमण. डाकू पानसिंह तोमरवर हिंदी चित्रपट आहे, पानसिंहची भूमिका इरफान खानने केली होती. पानसिंह डाकू का बनला याची कहाणी सिनेमात पाहायला मिळते, त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण होते. पण कायद्याच्या नजरेत तो डाकूच होता, त्याला पकडणे पोलिसांचे कर्तव्य होते. मध्य प्रदेशातील भिंड जिल्हा पोलीस प्रमुख असताना रमण यांना खबऱ्याकडून पानसिंह आणि त्याच्या टोळीचा पत्ता लागला. कुठलीही मोठी मोहीम आखायची असेल तर शत्रूच्या ताकदीपेक्षा पोलिसांची ताकद किमान १० पटीने जास्त असली पाहिजे. इथे पानसिंहच्या टोळीत १४ दरोडेखोर होते पण, रमण यांच्या पथकात पोलीस ३० आणि रायफलीही तितक्याच. इतक्या कमी ताकदीनिशी रमण यांनी पानसिंह वास्तव्याला असलेल्या गावाची नाकाबंदी केली आणि चंबळच्या खोऱ्यातील कुख्यात डाकूला ठार मारले. पानसिंहविरोधात कारवाई सुरू होती तेव्हा सुरुवातीला शेजारच्या जिल्ह्यातील पोलिसांची मदत मिळाली नव्हती पण, कारवाई संपता संपता गावाभोवती तीनशेहून अधिक पोलिसांचा फौजफाटा गोळा झाला होता, हेच पोलीस सहकारी विजय रमण यांच्या नावे जल्लोष करत होते!

पानसिंह तोमरचा खात्मा हा देशातील दरोडेखोरांविरोधातील मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्याकाळात उत्तरेकडे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या मोठ्या राज्यांमध्ये दरोडखोरांनी स्थानिकांना आणि पोलिसांना सळो की पळो करून सोडले होते. पानसिंह तोमरला ठार मारल्यानंतर उत्तेरेतील अनेक दरोडेखोरांनी आत्मसमर्पण केले. त्यामध्ये मालखनसिंह, फुलन देवी अशा अनेक डाकूंचा समावेश होता. पानसिंहला मारणारा निडर अधिकारी ही प्रतिमा विजय रमण यांना मोठ-मोठ्या सुरक्षेविषयक जबाबदाऱ्या देऊन गेली आणि त्यांनी प्रत्येक जबाबदारी फक्त एक अपवाद वगळता यशस्वी करून दाखवली. मध्य प्रदेशमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून काम करताना त्यांना चंबळच्या खोऱ्यातील एकेका दरोडेखोराची वैशिष्ट्ये पाहायला मिळाली. मालखनसिंह तर आत्मसमर्पण केल्यानंतर एकदा दिल्लीत विजय रमण यांच्या घरी भेटण्यासाठी आला होता. दरोडेखोरालाही पोलीस अधिकाऱ्यावर विश्वास वाटावा हे भलतेच! पण, तसे घडले हे खरे.

विजय रमण पोलीस दलातून निवृत्त झाल्यावर पुण्यात स्थायिक झाले. रमण महाराष्ट्राचे जावई होते. त्यांची पत्नी वीणा रमण मराठी. रमण प्रशासकीय सेवेत जाऊ शकले नाहीत, ते संरक्षण मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय आयुध निर्माण सेवेमध्ये गेले. या सेवेत ते रुजू झाले चंद्रपूरच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये. या फॅक्टरीचे महाव्यवस्थापक होते आर. जी. देवळालीकर. त्यांची मुलगी वीणा. केरळमधील मल्याळी मुलाला मराठमोळी वीणा आवडली. रमण थेट देवळालीकरांकडे गेले आणि त्यांनी वीणाशी लग्न करण्याची परवानगी मागितली. देवळालीकर म्हणाले, ‘‘तरुण मुला, तिला तुझ्याशी लग्न करायचे आहे का हे तरी तिला विचार…’’ ही जोडी जमली. वीणा रमण यांनी पुस्तकात बहुमोल भर घातलेली आहे. रमण यांच्या निधनानंतर सुमारे वर्षभरानंतर या पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन झाले. काही महिन्यांपूर्वी दिल्लीच्या इंटरनॅशनल सेंटरमध्ये झालेल्या या सोहळ्याला रमण यांचे माजी सहकारी, मित्र कुठून कुठून आले होते. रमण यांनी आजारपणातदेखील पुस्तकाचा खर्डा लिहिण्याच्या कामात खंड पडू दिला नव्हता. त्यात पत्नी वीणा यांनी भर घातली आहे. पुस्तकामध्ये अधूनमधून वीणांनी अनुभवांची जोड दिली आहे. वीणांनी लिहिले आहे की, रमण इतके सभ्य पोलीस अधिकारी होते की, खूप संतापले तर त्यांच्या तोंडून ‘साला’ एवढाच काय तो अपशब्द बाहेर पडे. करिअर घडवायचे असेल तर वरिष्ठांची हांजी हांजी करावी लागते. ल्युटन्स दिल्लीतील दरबारी वर्तुळात शिरकाव करून घ्यावा लागतोच, तिथे रमावेही लागते. पण, रमण यांनी तसे काहीही न करता विविध निमलष्करी दलांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केले. दिल्लीच्या दरबारी राजकारणात ते रमणारे नसल्यानेच बहुधा निवृत्त झाल्यावर विजय रमण पुण्यात स्थायिक झाले असावेत. आयपीएस झाल्यावर ते मध्य प्रदेशातील पोलीस दलात रुजू झाले. जिल्हाप्रमुख, महानिरीक्षक, सीआयडी अधिकारी या पदांवर काम केले. दरम्यान, निमलष्करी दलांमध्ये सीमा सुरक्षा दल, केंद्रीय पोलीस राखीव दल, इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अशा वेगवेगळ्या सुरक्षा दलांमध्ये वरिष्ठ पदांचाही रमण यांनी अनुभव घेतला. त्यांनी हे पुस्तक या सर्व दलांतील सहकाऱ्यांना अर्पण केलेले आहे. रमण २०११ मध्ये निवृत्त झाले त्याआधी केंद्रीय राखील पोलीस दलाच्या नक्षलवाद्यांविरोधी मोहिमेचे ते प्रमुख होते. विशेष महासंचालक म्हणून सर्व नक्षली राज्ये त्यांच्या आधिपत्याखाली होती. दंतेवाडा जिल्ह्यात २०१०मध्ये नक्षली हल्ल्यामध्ये ‘सीआरपीएफ’चे ७० जवान शहीद झाले. या घटनेने रमण यांच्या मनावर आणि प्रकृतीवर खोलवर परिणाम केला.

भोपाळमध्ये वायुगळती होऊन अनेकांचा मृत्यू झाला, त्या काळात रमण भोपाळमध्ये कार्यरत होते. वायुगळती झाली त्या रात्री रमण आई-वडिलांना आणायला रेल्वेस्थानकात गेले. तिथे त्यांना वायुगळती झाल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने ही खबर तत्कालीन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली होती. रेल्वेस्थानकावरील अधिकाऱ्याला एकही रेल्वे इथे थांबवायची नाही, असे सांगून रमण परतले. त्यांचे आई-वडील सुरक्षित होते. त्या रात्री रेल्वेस्थानकावर फक्त एक गाडी थांबली, तेवढ्याने हाहाकार झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी रमण पुन्हा रेल्वेस्थानकावर गेले, तिथे प्रवाशांचे मृतदेह पडले होते. देशाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेचे रमण प्रत्यक्ष साक्षीदार होते.

ते नंतर दिल्लीला आले. त्यांच्या देखरेखीखाली पंतप्रधानांना सुरक्षा देणाऱ्या विशेष सुरक्षा पथकाची स्थापना झाली, असे म्हणता येईल. विशेष सुरक्षा कवच (एसपीजी) दिले गेलेले राजीव गांधी हे पहिले पंतप्रधान होते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर लष्करातील जवानांची सुरक्षा पंतप्रधानांना देणे बंद केले गेले. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा यंत्रणा राजीव गांधींनी अस्तित्वात आणली. या ‘एसपीजी’चे पहिले प्रमुख होते विजय रमण. रमण यांच्या ‘एसपीजी’ने राजीव गांधी, व्ही. पी. सिंह, चंद्रशेखर आणि पी. व्ही. नरसिंहराव या चार पंतप्रधानांची सुरक्षा केली. प्रत्येक पंतप्रधानाचे व्यक्तिमत्त्व वेगळे. रमण यांचा या चारही पंतप्रधानांशी दैनंदिन संबंध येत असल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधील अनेक कंगोरेही त्यांनी टिपले. तत्कालीन पंतप्रधानांबद्दल रमण यांची छोटी-छोटी निरीक्षणे वाचण्याजोगी आहेत. एसपीजीच्या अनुभवामुळे रमण यांना जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेची विशेष जबाबदारी देण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनाच नव्हे तर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून मारले जाण्याचा धोका असलेल्या प्रत्येकाला सरकारी सुरक्षा पुरवली गेली होती. या संपूर्ण यंत्रणेचे रमण प्रमुख होते. अशा सर्व चतुरस्रा अनुभवांवर आधारलेले विजय रमण या प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याने लिहिलेले हे पुस्तक वाचकांना गुंतवून टाकणारे आहे.

डिड आय रिअली डू ऑल धिस?’

लेखक : विजय रमण

प्रकाशक : रुपा पब्लिकेशन्स

पृष्ठे : २५१ ; किंमत : ६९५ रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

mahesh.sarlashkar@expressindia.com