डॉ. कमल राजे
‘हे एवढे मोठमोठे विद्वान लोक- जे स्त्रियांसाठी कायदे करतात- ते आता का गप्प आहेत? स्त्रियांना काय सहन करावं लागतं, हे त्यांना समजत नाही? आता जग बदललेलं आहे, असं मला वाटतं. स्त्रियांचं थोडं तरी भलं व्हावं, असं जगाला निदान आता वाटू लागलेलं आहे. हे जे लोक, कुराणावर त्यांची मालकी आहे, असं समजतात, त्यांनी त्यात जे लिहिलं आहे त्याचं आचरण करावं. मुलींना शिक्षण द्यावं. नुसतंच मदरशामधील धार्मिक शिक्षण नव्हे, तर तिला नेहमीच्या शाळा-कॉलेजात पाठवावं. स्वत:चा नवरा स्वत: निवडण्याचा हक्क द्यावा. हे- हे षंढ पुरुष. हुंड्यावर जगण्यापेक्षा तिला ‘मेहर’ द्यावा आणि लग्न करावं. आईबापांनीही तिला मालमत्तेतील योग्य वाटा द्यावा. जर पती-पत्नी एकमेकांना पूरक नसतील तर पतीला घटस्फोट देण्याचा अधिकार तिलाही असावा. घटस्फोटित स्त्रीशी, विधवेशी लग्न करायला इतर पुरुष तयार असले पाहिजेत.’ ‘हार्ट लॅम्प’ संग्रहातील ‘ब्लॅक कोब्रा’ कथेतील जुलेखा बेगमचे हे स्वगत.

कर्नाटकमधील ‘बंडखोर साहित्य’ चळवळीला आकार देणाऱ्या बानू मुश्ताक यांच्या कथासंग्रहाला यंदाचे इंटरनॅशनल बुकर पारितोषिक या आठवड्यात जाहीर झाल्यानंतर आता उतावळ्या स्त्रीवादी समीक्षक आणि स्त्रीदु:खाच्या प्रेमातील ‘कढ’कढीत विशेषणी लेखन याला पुढल्या काही दिवसांत पूर येण्याआधी त्या कथांचे वाचन करणे अनिवार्य आहे. वरील परिच्छेद असलेली कहाणी मराठीत याच नावाने अत्यंत ताजेपणाने आलेल्या कथासंग्रहामध्येदेखील वाचता येईल. मार्च २०१०च्या ‘अंतर्नाद’ मासिकाच्या अंकात सविता दामले यांनी ‘कृष्णसर्प’ या शीर्षकाने ती अनुवादित केली आहे.

‘कृष्णसर्प’ या कथेवर गिरीश कासारवल्ली यांनी ‘हसीना’ नावाचा चित्रपट केला, त्याला राष्ट्रपती पुरस्कारदेखील मिळाला. (उत्सुकांना तो एक तास ५८ मिनिटांचा चित्रपट यूट्यूबवर पाहायला मिळेल.) या एकट्या कथेमध्ये बहुपत्नीत्व, स्थानिक मशीद कमिटीच्या मौलवीचा मनमानी न्यायनिवाडा यांची खिल्ली उडविली आहे. सुखवस्तू घरातील जुलेखा बेगम हे यातील शिकलेले, वाचणारे आणि सजग विचार करणारे पात्र. अश्रफ या महिलेची मालकीण. संपूर्ण कथा अश्रफच्या न्यायनिवाड्याभोवती फिरणारी. तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतर अश्रफला टाकून देणाऱ्या नवऱ्याविरोधात लावलेला न्यायनिवाड्याचा हा खेळ कथेच्या आरंभापासून विचित्रपणे सुरू राहतो. यातील संवाद आणि घटनांमधून बानू मुश्ताक जुन्या चालत आलेल्या धार्मिक रूढी-परंपरांबद्दल संताप व्यक्त करतात. नऊ पोरांची लेंढारं घरात असलेल्या मुथवल्लीकडून अश्रफला मशीद कमिटीकडून न्याय मिळणार असतो. त्यातही दुुसरी बायको केलेल्या आपल्या नवऱ्याकडून अश्रफला पत्नीहक्क नको असतो. तिसऱ्या आजारी मुलीच्या खर्चासाठी औषध-पाण्याची तजवीज त्याने करून द्यावी, ही तिची न्यायाची व्याख्या. या अश्रफचा नवरा न्यायनिवाडाकार मुथवल्लीसमोर त्या आजारी मुलीला आदळतो. ठारच करतो. आता या आघाताने तिथे उपस्थित सारेच अवाक् होतात. पण वाचकाचे अवाक् होणे पुढल्या क्षणात असते. आजारी मुलीच्या महाकठीण ओझ्यातून सुटल्याची अश्रफची भावना ही पारंपरिक ‘ती आई आहे म्हणूनी’ प्रतिमेला तडा देणारी निघते.

मग तुलनात्मकदृष्या विचारायचे झाले तर बानू मुश्ताक यांची लेखनातील बंडखोरी ही इस्मत चुगताई यांच्या कथेसारखी दिसते काय? हे ज्याने त्याने आपापले वाचून ठरवायचे आहे. चुुगताई यांच्या काळातील भारतीय मुस्लीम समाज अंमळ अधिक मागास होता. भारतीय शहरगावांत आणि खेड्या-खेड्यांत शिक्षण आणि सुधारणा पोहोचल्यानंतर यांत बदल नक्कीच झाले. या बदलकाळात पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये संघर्षाचे कोणते प्रकार घडत गेले, त्याची कथा मुश्ताक यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्याला एकट्या स्त्रीवादाच्या कोंदणात बसविण्याची गरज बिलकूल नाही. परंपरा आणि आधुनिक जगण्याच्या दरम्यान धार्मिक पाखंडात अडकलेल्या समाजाचे चित्रण हा या कथांचा गाभा आहे. ‘हाय- हील्ड शूज’, ‘ द अरेबिक टीचर अॅण्ड गोबी मन्चुरी’ ही शीर्षके त्याची पुरेपूर उदाहरणे म्हणून पाहता येऊ शकतील.

गेल्या वर्षी पॅरिस रिव्ह्यूच्या समर विशेषांकात मुश्ताक यांची ‘रेड लुंगी’ ही कथा प्रकाशित झाली, तेव्हा ‘हार्ट लॅम्प’ हा संग्रह प्रकाशित व्हायचा होता. या रेड लुंगी कथेत सुरुवातीला कर्नाटकमधील एका मुस्लीमबहुल गावात चालणारा ७ ते १२ वर्षे वयातील मुलांच्या सामूहिक सुंता कार्यक्रमाचा तपशील आहे. ज्या श्रीमंत घरात हा सोहळा आयोजित केलेला असतो त्या घरातील मुलांवर अत्याधुनिक लेझर यंत्रणेने डॉक्टरच्या सहकार्याने सुंता केली जाणार असते. इतर सामान्य घरातील मुलांना मात्र वस्तऱ्याच्या वेदनादाहाला अनुभवण्यासाठी सोडले जाते. वस्तरा घासण्याच्या वर्णनापासून सुंतानिष्णात उस्तादाकडून अल्पकालीन दु:खाचे पाट वाहतानाची बानू यांच्या शब्दनोंदी प्रचंड दृश्यिक आहेत.

गेल्या वर्षभरापासून या संग्रहाचे एकमेव मुखपृष्ठ होते. त्या मुखपृष्ठावर कलाकुसर नाही. चित्र नाही किंवा नक्षीदेखील नाही. तर एका कथेतील उताराच उतरवला आहे. उच्चरक्तदाबामुळे पहाटेची नमाज न अदा करू शकणाऱ्या शाझियाविषयीचा. तिच्या आईने तिच्या शरीरात सैतान घुसल्यामुळे वाईट सवयी तिच्यात भिनल्या असल्याच्या निष्कर्षाचा. या पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या लघुयादीतील सर्व पुस्तकांत सगळ्यात साधे आणि कुठलाही प्रयोग नसलेले हे मुखपृष्ठ होते. (सत्यकथेत बाळ ठाकुरांनी केलेल्या प्रयोगांपेक्षादेखील किंंवा किरण नगरकरांच्या ‘सात सकं त्रेचाळीस’च्या पहिल्या आवृत्तीच्या कव्हरपेक्षादेखील साधे.) या पुस्तकाच्या भारतीय आवृत्तीमध्ये आता (आणि मराठी अनुवादामध्येही) डाळिंबाचे चित्र असलेले मुखपृष्ठ आहे. बुकर पुरस्कार स्वीकारताना लेखिका आणि अनुवादिकेच्या हाती जुने जाणीवपूर्वक अनाकर्षक केलेल्या कव्हरचेच पुस्तक होते.

बाकी या कथांमध्ये आपल्या पारंपरिक वातावरणात वाढूनही आधुनिक जगण्याशी लढणाऱ्या बायकांची फौज अनुभवायला मिळेल. काही कथांमुळे त्यांच्यावर प्राणघातक हल्लेदेखील का झाले, याची कारणे उमजतील. नेहमीच्या आकलनाच्या जगापलीकडले काही कथन साहित्यातून आणल्याबद्दल बुकर इंटरनॅशनलची समिती पारितोषिकासाठी पुस्तक निवडते. त्या समितीच्या लेखी बानू मुश्ताक यांचे कथनात्मक जग नवे आहे. भारतीय त्यातले स्त्रीत्व शोधणार, लेखन बंडखोरी शोधणार की प्रत्येक धर्मात असलेली हेतुपुरस्सर पाखंडी वृत्ती हे प्रत्येकाच्या वाचन वकुबावर ठरणारे.

‘बुकर इंटरनॅशनल’च्या स्पर्धेत तीनच वर्षांत दुसरे पारितोषिक भारताला मिळाले. मुश्ताक बानू यांच्या रूपाने कन्नड भाषक भारतीय लेखिकेला पहिल्यांदा, तर दीपा बास्थी यांच्या रूपाने भारतीय अनुवादिकेला पहिल्यांदा हा पुरस्कार मिळाला. गीतांजली श्री यांच्या पुरस्कारानंतर भारतीय भाषांमधून इंग्रजीत जाण्यासाठी भरपूर साहित्य सज्ज झाले आहे. त्यामुळे पुढल्या तीन-पाच वर्षांत कुठल्या भाषेतील कुणाला बुकर इंटरनॅशनल पारितोषिक मिळेल याकडे आता पाहावे लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सौजन्य : thebookerprizes.com