अतिशय घाईगर्दीत सदस्य नेमण्याची प्रक्रिया पार पाडल्यावर तातडीने नोबेल समितीची बैठक स्टॉकहोमला बोलावण्यात आल्याचे कळताच साऱ्या जगाचे लक्ष त्याकडे वेधले गेले. शांततेसाठी युद्ध की युद्धाविना शांतता असा वाद पेटल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत नेमके काय घडते याकडे सारेच मोठे देश डोळे लावून बसले होते. एका ज्येष्ठाने सुरुवात केली. ‘संपूर्ण जगाकडे लक्ष ठेवून असलेले आपण युरोपीय तसे शांततावादीच. मात्र अलीकडे या शब्दाची व्याख्या बदलण्याचा विडा काही देशांनी उचलला आहे.

‘मला नोबेल का नाही’ इथपासून सुरू झालेला ‘यांना नोबेल द्या’ इथपर्यंतचा हा प्रवास घसरणीचा वाटत असला तरी जग कोणत्या दिशेने चालले हे दाखवणारा आहे. अशा काळात स्थितप्रज्ञ राहून आपण जोपासलेल्या उच्च मूल्यांशी तडजोड न करता तग धरणे कठीण होत चालले आहे. पुरस्कारासाठी दबाव टाकणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांसमोर या मूल्यांची गोष्ट काढली की बराक ओबामा, यासिर अराफात यांना कसे काय गौरवले, असा प्रश्न उपस्थित करून आपली कोंडी केली जात आहे. त्यामुळे नाइलाजाने आपल्याला पुरस्कार निवडीचे निकष बदलावे लागत आहेत.

नवे निकष कसे असावेत यासाठी मी आपणा सर्वांशी आधीच अनौपचारिक चर्चा केली आहे. त्यातल्या बहुतेकांनी अतिशय जड अंत:करणाने हा बदल स्वीकारण्यास मान्यता दिली आहे.

आता मी सर्वांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा हे नवे निकष वाचून दाखवतो. १) जो शांतता हवी म्हणून युद्ध करेल त्यालाही शांततावादी गणले जाईल. २) अणुऊर्जासंपन्न देशाने इतर देशांनी असे संपन्न होऊ नये म्हणून केलेले युद्ध शांततावादी प्रयत्न म्हणून ओळखले जाईल. ३) ‘ही युद्धाची वेळ नाही’ असे जगभर सांगत फिरणाऱ्या पण युद्ध टाळण्यासाठी अजिबात प्रयत्न न करणाऱ्या नेत्यालासुद्धा शांततावादी म्हणून ग्राह्य धरले जाईल. ४) ज्यांच्या देशात कायम अशांतता नांदत आहे अशा देशाच्या प्रमुखाने ती अशांतता मिटवण्यासाठी केलेले प्रयत्न (?) शांततेसाठीचे म्हणून गृहीत धरले जातील. ५) जगभरातील युद्धे थांबवण्यासाठी प्रयत्न केले असा दावा एखाद्या राष्ट्रप्रमुखाने केलाच तर त्याची पडताळणी न करता तो खरा असे समजले जाईल. ६) मला नोबेल का नाही असे वारंवार म्हणणाऱ्या नेत्याला हसण्यावारी न नेता गंभीरपणे त्याची दखल घेतली जाईल.

७) दहशतवादी हल्ल्याचा सूड युद्ध करून उगवण्याचे प्रयत्न शांततेच्या व्याख्येत समाविष्ट केले जातील. ८) युद्धग्रस्त भागातून आपल्या देशाच्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याची कामगिरी बजावणाऱ्या नेत्याचासुद्धा या पुरस्कारासाठी विचार केला जाईल. ९) योग, विपश्यना हाच युद्धावरचा अंतिम उपाय आहे, असे प्रमेय मांडणाऱ्यांनासुद्धा शांततावादी म्हणून ओळखले जाईल. १०) जे लहान देश आहेत वा मुस्लीमबहुल आहेत त्यांनाच युद्धखोर समजले जाईल, इतरांना नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

११) हा पुरस्कार यांनाच द्या अशा सर्वाधिक शिफारशी ज्या नेत्यांच्या बाबतीत येतील त्यांचा प्राधान्याने विचार करण्यात येईल.’ हे ऐकताच बैठकीत स्मशानशांतता पसरली. शेवटी टाळ्या न वाजताच बैठक संपली. मग निकषाची घोषणा करणारे ज्येष्ठ प्रत्येकाच्या कानाजवळ जाऊन कुजबुजले. ‘कुणाला सांगू नका पण जुनेही निकष कायम असतील.’ बैठकीचे वृत्त वाऱ्यासारखे जगभर पसरताच अमेरिकेतील व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी झाली. भारतात या पुरस्कारासाठी विश्वगुरूंची शिफारस करण्यासाठी चक्क एक समिती स्थापन करण्यात आली. तिकडे बंगळूरुच्या श्रीश्रींनी युरोपात दहा नवीन योग केंद्रे सुरू करू असे जाहीर केले. इस्रायलने हे युद्ध नाही असे म्हणत इराणवरील हल्ले तीव्र केले…