हे चरित्र तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘महात्मा फुले स्मृतिशताब्दी वर्ष’ (१९९०) आणि ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्ष’ (१९९१) असे दुहेरी औचित्य साधून लिहिले. ते ‘भारतीय पुस्तक न्यास’, नवी दिल्ली (एनबीटी) यांनी १९९२ मध्ये प्रसिद्ध केले. यात ‘ज्योतिनिबंध’ही अंतर्भूत आहे. ‘ज्योतिचरित्र’ची इंग्रजी व हिंदी भाषांतरे झाली आहेत. पैकी इंग्रजी भाषांतर दया अग्रवाल यांनी १९९६मध्ये केले आहे, तर हिंदी प्रशांत पांडे यांनी २००६मध्ये केले आहे. दोन्ही भाषांतरे भारतीय पुस्तक न्यासाने प्रकाशित केली आहेत. ‘ज्योतिचरित्र’ ८० पृष्ठांचे संक्षिप्त चरित्र होय. डॉ. धनंजय कीरकृत ‘महात्मा जोतिराव फुले’ (चरित्र) आणि ‘महात्मा फुले : समग्र वाङ्मय’ (संशोधित आवृत्ती – संपा. य. दि. फडके) या दोन ग्रंथांवर हे चरित्र आधारित असल्याचे तर्कतीर्थांनी या चरित्राच्या प्रास्ताविक निवेदनात स्पष्ट केले आहे.

जोतिराव फुले भारतीय आधुनिक मानवतावादी संस्कृतीचे आद्या प्रवर्तक होते. शेटीबा फुले हे या घराण्याचे मूळ ज्ञात पुरुष. पेशवाईत ते भाजीपाल्याचा व्यवसाय करीत. त्यांना राणोजी, गोविंद व कृष्णा अशी तीन मुले होती. यातील गोविंद हे महात्मा फुले यांचे वडील. त्यांचा विवाह चिमणाबाईंशी झाला होता. गोविंदरावांनी पेशवाईचा उत्कर्ष व लय पाहिला होता. गोविंदरावांनी चिरंजीव जोतिरावांचा सांभाळ केला. कारण, आई चिमणाबाईंचे जोतीच्या जन्मानंतर (१८२७) लवकर निधन झाले होते. या चरित्रात तर्कतीर्थांनी जोतिरावांच्या जन्माच्या वेळच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक वातावरणाचे विस्तृत वर्णन केले आहे. त्यावरून बहुजन कुटुंबे व त्यांच्यापुढील आव्हानांची कल्पना येते. प्राथमिक शिक्षण उत्तम झाल्याने जोतिरावांना वाचनाचा नाद लागला. मित्रांच्या संगतीने ते मर्दानी खेळातही भाग घेऊ लागले. ख्रिास्ती मिशनरींची समाज विकास धडपड ते न्याहाळत. जोतिरावांनी १८४७ मध्ये इंग्रजी शाळेचा अभ्यास पूर्ण केला. त्यांनी वंशपरंपरागत फुलमाळ्याचा व्यवसाय सुरू केला.

प्रारंभी राजकीय क्षेत्राची ओढ एका विवाह प्रसंगाने बदलून सामाजिक झाली. ते जातीय विषमता व अन्यायाबद्दल विचार करते झाले. स्त्रिया व शूद्रांच्या शिक्षणविषयक प्रश्नांनी त्यांना अस्वस्थ केले. त्यावेळेचा प्रगत ब्राह्मण समाजही स्त्री शिक्षणविरोधी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. १८४८ मध्ये हे लक्षात घेऊन त्यांनी मुलींची शाळा सुरू केली. मग त्यांनी तत्कालीन अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या. दोन-तीन वर्षांतच त्यांच्या शाळांचा लौकिक समाजात पसरला व विरोधकच त्यांचे खंदे पाठीराखे बनले. स्त्री शिक्षण चळवळीने नंतर प्रसाराचे रूप धारण केले. यात पत्नी सावित्रीबाई फुले यांचा वाटा तितकाच मोठा आहे. तत्कालीन ब्राह्मण समाज वर्चस्वाच्या भ्रमातून जागा झाला, तो बहुजन समाजातील आणि स्त्री, शूद्रांच्या शिक्षण प्रसारमुळे. अस्पृश्यता, धर्मांतर, शुद्धी, प्रायश्चित्त इ. प्रश्नांवर महात्मा फुले यांनी जातीय व धार्मिक सलोख्याचा उतारा दिला. पतीत परिवर्तन भावनेपासून जोतिराव फुले यांनी स्वत:स दूर ठेवले. एकाच कुटुंबात हिंदू, ख्रिाश्चन, मुस्लीम, यहुदी धर्मधारी असले तरी काही बिघडत नाही, असा आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विचार महात्मा फुले यांनी समाजाच्या गळी उतरविला.

नंतरच्या काळात महात्मा फुले यांनी आपला मोर्चा शिक्षणाकडून समाजसुधारणा, लेखन, प्रबोधन, जागृतीकडे वळविला. विधवा विवाह, पुनर्विवाहाचे ते समर्थक झाले, १८६५ ला त्यांनी ‘जातिभेद विवेकसार’ लिहिले. १८७३ ला बालहत्या प्रतिबंधकगृहातील ब्राह्मण विधवेच्या मुलास आपला मुलगा मानले. त्यांचे कार्य पाहून लालशंकर उमियाशंकर त्रिवेदी यांनी १८७५ ला पंढरपूर येथे बालहत्याप्रतिबंध गृह सुरू केले. पुढे ते प्रार्थना समाजाने चालविले. अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी घराजवळील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. महात्मा फुले ख्रिास्ती झाले, अशी अफवा पसरवूनही ते आपल्या समाजसुधारणा कार्यापासून तसूभरही ढळले नाहीत. त्यांनी ब्राह्मण्याविरोधी जागृती केली. शेती व कामगारांसाठी लढे उभारले. हंटर कमिशनला निवेदन दिले. ‘शेतकऱ्यांचा असूड’, ‘सार्वजनिक सत्यधर्म’ ग्रंथ रचले. सत्यशोधक समाज स्थापून पुरोहितशाही, कर्मकांड इत्यादींना फाटा दिला. ‘निर्मिक’ संकल्पना रुजविली. २८ नोव्हेंबर १८९० रोजी त्यांचे अर्धांगवायूने निधन झाले.

डॉ. सुनीलकुमार लवटे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

drsklawate@gmail.com