क्रिकेटचे कर्कश व्यावसायिकीकरण होण्याच्या आधीच्या काळात फारुख इंजिनीयर यांची कारकीर्द फुलली आणि खुलली. हल्लीच्या प्राधान्याने फ्रँचायझी क्रिकेटच्या जमान्यात फलंदाज-यष्टिरक्षक या जमातीला बरकत आलेली दिसते. पण फारुख इंजिनीयर यांच्यासारख्यांनी त्या स्वरूपाचा खेळ १९६०-१९७०च्या दशकात  करून दाखवला. एका अर्थी गिलख्रिस्ट-धोनी यांच्यासारख्यांचे ते पूर्वज. उत्तम यष्टिरक्षक होते आणि आक्रमक फलंदाजीही करायचे. १९६७मध्ये त्यावेळच्या मद्रासमधील कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी उपाहारापर्यंत पहिल्याच सत्रात नाबाद ९४ धावा चोपल्या. ‘बॅझबॉल’ वगैरे खूळ मूळ धरू लागल्याच्या काही दशके आधीचा तो काळ. तेही हॉल, ग्रिफिथ, सोबर्स आणि गिब्ज यांच्या माऱ्यासमोर. त्या डावात त्यांनी शतकही पूर्ण केले. जिंकण्यापेक्षाही क्रिकेट आस्वादणे हे त्यावेळी अधिक महत्त्वाचे मानले जात असे.

तेव्हाच्या भारतीय संघाचे वर्णन प्रसिद्ध इटालियन दिग्दर्शक फेदरिकोने ‘फेलिनीच्या सिनेमातील नायकांचा’ संघ, असे केले होते. देखणे, नजाकती शैलीचे, बिनधास्त मनोवृत्तीचे क्रिकेटपटू त्यावेळी भारतीय संघात होते. टायगर पतौडी, फारुख इंजिनीयर, एम. एल. जयसिंहा, सलीम दुर्राणी, पॉली उम्रीगर, अजित वाडेकर, दिलीप सरदेसाई अशी अनेक नावे घेता येतील. इंजिनीयर सर्वाधिक चपळ. थोडी स्थूल शरीरकाठी असूनही यष्टींमागे त्यांचा वावर वाघासारखा असे. बेदी, प्रसन्ना, चंद्रा, वेंकट या फिरकी चौकडीसमोर त्यांनी चापल्याने यष्टिरक्षण केले. बऱ्याचदा सलामीला येऊन ते आक्रमक फलंदाजीही करत. १९७१मधील इंग्लंडविरुद्धच्या विजयी मालिकेत दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा केल्या होत्या. ३१ धावांची त्यांची कसोटी सरासरी रॉड मार्श, वासिम बारी, डेरिक मरे या समकालिनांपेक्षा अधिक होतीच. इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेष विश्व संघाचा सामना असला, की यष्टिरक्षक म्हणून इंजिनीयर यांचीच निवड होत असे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक प्रसन्न माणूस म्हणून इंजिनीयर आजही ओळखले जातात. ते अस्सल मुंबईकर! पुढे इंग्लंडला लँकेशायरमध्ये स्थिरावले आणि कौंटी क्रिकेटमध्ये चमकले. ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात त्यांच्या नावे स्टँड आहे. ब्रिलक्रीमच्या जाहिरातीसाठी कीथ मिलर आणि डेनिस कॉम्प्टन यांच्यानंतर मॉडेल म्हणून झालेली निवड ही इंजिनीयर यांच्या देखणेपणाला मिळालेली दादच. आजही मुंबईत कार्यक्रमानिमित्त आले, की त्यांचे हेलातले मराठी ऐकणे म्हणजे पर्वणी असते. बिनधास्त बोलण्याने त्यांना काही वेळा अडचणीतही आणले. मात्र त्यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांना प्रत्येक वेळी माफही केले. त्यांना अलीकडेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.