‘घर घर सिंदूर’ या कथित मोहिमेमुळे भाजपची पळता भुई थोडी झालेली आहे. या मोहिमेची कल्पना कोणाच्या डोक्यातून आली माहीत नाही आणि ही कल्पना प्रसारमाध्यमांमध्ये पसरवण्याचे काम कोणी केले हे देखील माहीत नाही. पण भाजपच्या नेत्यांना डोक्याला हात लावून घेण्याची वेळ आली हे मात्र नक्की. जगभरात चाललेली भारताची राजनैतिक मुत्सद्देगिरी समजा फोल ठरली तरी, ‘ऑपरेशन सिंदूर’चा देशांतर्गत राजकारणासाठी वापर करता येऊ शकतो हे भाजपच्या निर्णयप्रक्रियेतील नेत्यांनी अचूक ओळखले होते. बिहार व त्यानंतर पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक लवकरच होणार आहे. भाजपला ही राज्ये जिंकण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’मधील फक्त ‘सिंदूर’ची गरज भासू लागल्याचे दिसू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या राज्यांत जाहीर सभा घेऊन फक्त ‘सिंदूर’वर बोलताना दिसले. मोदी म्हणाले की, त्यांच्या नसा-नसांत सिंदूर वाहात आहे! ‘सिंदूर’मधून नारीशक्ती दिसते, हीच भारताची ताकद आहे. वगैरे… ‘सिंदूर’च्या नाऱ्याला धरून भाजपकडून काहीतरी केले जाईल असा कयास कोणी केला तर वावगे ठरले नसते. पण, नुसता कयास करणे वेगळे, तसे वृत्त प्रसिद्ध होणे ही वेगळी बाब ठरते. या वृत्तावर देशभरातून आलेल्या संतप्त प्रतिक्रियेमुळे भाजपला कथित ‘सिंदूर’ मोहिमेचा गाशा गुंडाळावा लागला असा आरोप विरोधकांकडून केला जाऊ लागला आहे. पण इथे मुद्दा असा की, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या मुत्सद्देगिरीत केंद्र सरकार व भाजपने सपाटून मार खाल्ला असताना आणि भाजपची राजकीय कोंडी करण्यासाठी रान मोकळे असताना काँग्रेस मात्र फक्त शशी थरूर यांच्याभोवती का फिरत आहे, हे न सुटणारे कोडे म्हणता येईल.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पुरुष पर्यटकांची हत्या करून त्यांच्या बायकांचे कुंकू पुसले. म्हणून पाकिस्तानविरोधातील लष्करी मोहिमेचे नाव मोदी सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ ठेवले. शस्त्रसंधी मान्य केला तरी, ही मोहीम यशस्वी झाल्याचे भाजपचे म्हणणे होते. हे यश घरा-घरांत पोहोचवण्याचा भाजपचा विचार होता. त्यासाठी ९ जून ही तारीख निश्चित केली गेली होती. ‘एनडीए’च्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ‘मोदी ३.०’ची वर्षपूर्ती आणि ‘ऑपरेशन सिंदूर’चे यश यासंदर्भात देशव्यापी मोहीम राबवली जाईल, असे सांगितले होते. नड्डा यांनी या मोहिमांचा तपशील दिला नव्हता, तो हिंदी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाला. या वृत्तानुसार ‘मोदी ३.०’च्या वर्षपूर्तीचे निमित्त करून घरा-घरात सिंदूर म्हणजे कुंकवाची डबी महिलांना पोहोचवली जाणार होती. हे कुंकू इतर कोणी नाही तर थेट मोदी सरकारकडून दिले जाणार होते. हे वृत्त आता भाजपने ‘फेक न्यूज’ म्हणून फेटाळले आहे. इतकेच नव्हे तर, भाजपने या वृत्ताची सर्व जबाबदारी काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीतील विरोधकांवर टाकली आहे! ‘घरा-घरात सिंदूर’ मोहिमेचा राग महिलांनी मोदींवर काढायला सुरुवात केल्यावर भाजपला धक्का बसला हे खरेच.
सारे राजकीय हितासाठी…
‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाच्या गौरवीकरणासाठी भाजप कुंकू देणार, ही कल्पना महिलांना कशी रुचेल, याचा विचार बहुधा भाजपमधील कोणी वृत्त प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवण्याआधी केला नसावा असे दिसते. कुंकू लावणाऱ्या विवाहित महिला नवऱ्याच्या नावाने कुंकू लावत आहोत अशी भावना जपतात. त्यामुळे ‘भाजपचे कुंकू महिलांनी कशासाठी लावायचे,’ हा महिलांचा प्रश्न योग्य होता. संतापलेल्या महिला बघून बिहार, पश्चिम बंगाल हातातून निसटेल ही भीती भाजपला अस्वस्थ करून गेली असावी. म्हणून तर ‘घर-घर सिंदूर’ अशी मोहीम आखलेलीच नव्हती असा दावा भाजपला करावा लागला. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून भाजपने महिला मतदारांकडे लक्ष पुरवले. मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र या राज्यांतील निवडणुकांमध्ये ‘लाडकी बहीण’सारख्या योजना राबवल्या गेल्या. पण कुंकू हा प्रकार संवेदनशील ठरतो. महिलांच्या भावनेशी खेळ करून भाजपने स्वत:ची कोंडी करून घेतली असे म्हणता येईल. अर्थात, एक मोहीम फसली म्हणून भाजप दुसरी राबवणार नाही असे नव्हे. भाजप कधीही राजकीय हित दृष्टिआड होऊ देत नाही, हे लक्षात घेऊन भाजपला उघडे पाडण्याची जी संधी मिळेल, तिच्याकडे विरोधकांचे- मुख्यत: काँग्रेसचे- लक्ष असायला हवे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने काँग्रेसला ही संधी मिळू शकली असती पण ती कदाचित वाया घालवली असे दिसते.
काँग्रेसची तऱ्हा…
भाजपवर प्रहार करण्यापेक्षा पक्षांतर्गत मतभेदांमध्ये काँग्रेसचे नेते अधिक अडकल्याचे पाहायला मिळाले. केंद्र सरकारच्या वतीने परदेशात राजनैतिक मुत्सद्देगिरी करायला गेलेल्या शिष्टमंडळांमध्ये शशी थरूर, सलमान खुर्शीद असे अनुभवी काँग्रेस नेते आहेत. या नेत्यांनी काँग्रेसविरोधात बेधडक विधाने केली. थरूर म्हणाले की, २०१६ मध्ये पहिल्यांदाच भारताने पाकिस्तानविरोधात लक्ष्यभेदी हल्ला केला. खुर्शीद म्हणाले की, अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा मोदी सरकारचा निर्णय योग्य होता. वगैरे. या नेत्यांच्या भूमिकांमुळे काँग्रेसमध्ये प्रचंड धुसफूस सुरू आहे. काँग्रेसनेते भाजपविरोधापेक्षा थरूर वा खुर्शीद यांच्याविरोधात आक्रमक झालेले दिसतात. देशांतर्गत राजकारणामध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’चा लाभ मिळवण्यासाठी भाजप वेगवेगळ्या क्लृप्त्या करत असताना काँग्रेसचे अधिक लक्ष थरूर यांच्या विधानांवर केंद्रित झाले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या राजनैतिकच नव्हे, लष्करी मुद्द्यांवर देखील मोदी सरकार अडचणीत आले आहे. ‘सीआयआय’च्या जाहीर कार्यक्रमात हवाईदलाचे प्रमुख, एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी, देशी बनावटीचे एकही लढाऊ विमान वेळेवर मिळाले नसल्याचे धक्कादायक विधान केले. सिंगापूरला जाऊन संरक्षण दलाचे प्रमुख (सीडीएस) अनिल चौहान यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताची लढाऊ विमाने पाकिस्तानने सुरुवातीला पाडल्याची कबुली दिली. ‘ऑपरेशन सिंदूर’मधील वेगवेगळ्या आघाड्यांवर सर्व काही आलबेल नाही हे संरक्षण दलातील अधिकारी उघडपणे सांगत आहेत. तरीही भाजप ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा डांगोरा पिटत आहे.
मते भाजपलाच!
पंतप्रधान मोदी जाहीरसभांमधून पाकिस्तानला उघडपणे धमकी देत असताना, भारताचा मित्र असलेल्या रशियाने पाकिस्तानशी कोट्यवधी डॉलरचा करार करून मोदी सरकारलाच चपराक दिली. ‘भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये व्यापारी मुद्द्यांवर आम्ही मध्यस्थी केल्यानंतर शस्त्रसंधी झाला,’ असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने अमेरिकेच्या न्यायालयात सांगितले आहे. ट्रम्प तर शस्त्रसंधी त्यांच्यामुळेच झाल्याचा दावा वारंवार करत आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे जगभरात मोदी सरकारची नाचक्की झाली असा आरोप विरोधक करू लागले आहेत. हे राजनैतिक वास्तव विरोधकांना प्रामुख्याने काँग्रेसला लोकांपर्यंत पोहोचवावे लागेल. पण काँग्रेसला फक्त शशी थरूर यांच्याशिवाय कोणीही दिसलेले नाही. खरेतर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या राजनैतिक अपयशाचा मुद्दा हाती घेऊन राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांनी देशभर सभा घेऊन भाजपविरोधात रान उठवायला हवे होते. पण यातील काहीच काँग्रेसने केले नाही. काँग्रेसनेते फक्त ‘एक्स’वर मत व्यक्त करत आहेत. मोदींना दररोज तीन प्रश्न विचारणे इतकेच देशातील प्रमुख विरोधी पक्षाचे कर्तव्य असेल तर मोदी आणि भाजप ‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकीय लाभ उठवण्यात यशस्वी झाले तर दोष कोणाचा म्हणावा?
भाजप व संघ निष्ठावानांतील काही मोदींवर नाराज असतील. पण, ते निवडणुकीमध्ये भाजपलाच मत देतील. त्यांच्या नाराजीचा विरोधकांना लाभ होणार नाही. जे भाजपचे भक्त नाहीत, ज्यांना मोदी-भाजपच्या चुका दिसू शकतात, ज्यांच्यामध्ये केंद्रातील सरकार बदलण्याची खरोखर ताकद आहे, अशा २०-३० टक्के कुंपणावर बसलेल्या मतदारांपर्यंत काँग्रेस वा विरोधकांना पोहोचावे लागणार आहे. तसे झाले नाही तर हे कुंपणावरील मतदारही पुन्हा भाजपच्या झोळीत मते टाकण्याचा धोका असू शकतो. म्हणूनच ‘सिंदूर’ प्रकरणात भाजपने हाराकिरी केली असताना काँग्रेस काय करत होता, असे सुजाण लोक विचारू शकतील.
mahesh.sarlashkar@expressindia.com