‘‘परकीय सत्तेचा द्वेष करण्याइतकेच आपली सत्ता शिरसावंद्या मानण्याचे शिक्षणही पहिल्यापासून लोकांना दिले गेले पाहिजे. बाहेर जरी क्रांतीची धामधूम असली, तरी आतून व्यवस्थित राज्यतंत्र काम करीत असावे. बाहेर तलवार अन् आत न्याय हेच पथ्य सदैव पाळले पाहिजे.’’ ‘१८५७ चे स्वातंत्र्य समर’मधील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे उद्गार आजही प्रस्तुत ठरतात, हीच खरी त्यांच्या जाज्वल्य राष्ट्रनिष्ठेची निशाणी ठरते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी १९२० ते १९३६ पर्यंतच्या काळात भारतीय स्वातंत्र्यलढ्यात प्रबोधन व लोक संघटनेचे कार्य करीत होते. या काळात ते सशस्त्र क्रांतीचे समर्थक होते. ते शस्त्रपुरवठा करीत. अनेक भूमिगत सशस्त्र क्रांतिकारकांना तर्कतीर्थांनी आश्रय दिलेला होता. त्यांचे बिऱ्हाड पुणे मुक्कामी असताना ब्रिटिश पोलिसांनी वहिमावरून, क्रांतिकारकांच्या गुप्त नोंदींवरून छापा टाकल्याची बातमी तत्कालीन वृत्तपत्रांमध्ये ठळक मथळ्यात प्रसिद्ध झाली होती.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे सर्व जाणून होते. म्हणून १९३१ मध्ये सावरकर रत्नागिरी येथे स्वगृही स्थानबद्ध असतानाच्या काळात तर्कतीर्थ आणि सावरकरांची पहिली भेट घडून आली. ही भेट रत्नागिरीच्या सड्यावर (माळावर) झाली. सोबत ग. वा. तथा दादासाहेब मावळणकर (जे पुढे स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेचे सभापती झाले.) होते. ते त्यावेळी वाईतील प्राज्ञपाठशाळेच्या धर्मकोश प्रकल्पाचे प्रमुख होते. तर्कतीर्थांचा रत्नागिरीत तीन दिवस मुक्काम होता. हे तिघेही रोज सकाळी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यास जात. तर्कतीर्थांची माहिती असल्याने पहिल्या भेटीतच त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समादेश (अनिवार्य आदेश) देत सांगितले होते की, ‘‘तो सोलापूरचा कलेक्टर नाईट आता नाशिकला गेला आहे. त्याला सोलापूरच्या हुतात्म्यांबरोबर स्वर्गाला पाठविण्याची योजना आखा.’’ त्यावेळी दादासाहेब मावळणकर हा समादेश ऐकून चकित झाले होते. (१२ जानेवारी, १९३१ रोजी सर्वश्री मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, श्रीकिसन सारडा व अब्दुलकुर्बान हुसैन यांना कायदेभंग चळवळीत माफी मागितली नाही म्हणून फासावर चढविण्यात आले होते.
पहिल्या भेटीच्या दिवशी दुपारी तर्कतीर्थ हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निवासस्थानी गेले होते. चर्चेत तर्कतीर्थांचे सायंकाळी पतितपावन मंदिरात ‘धर्मशास्त्र व अस्पृश्यता निवारण’ या विषयावर भाषण ठरले. सावरकरांनी रत्नागिरीत ग्वाही (दवंडी) फिरविली. सायंकाळी ठरल्याप्रमाणे भाषण झाले. स्वातंत्र्यवीरांनी या भाषणाचे अध्यक्षपद भूषविले होते.
१९५१ मध्ये सोरटी सोमनाथ मंदिराचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. हे जीर्णोद्धारित मंदिर सर्व जाती-धर्मांस खुले होणार म्हणून सर्व शंकराचार्यांनी प्राणप्रतिष्ठा करण्यास नकार दिला होता. या महोत्सवाची तत्कालीन वृत्तपत्रांनी मोठी दखल घेतली होती. महोत्सव आटोपून परतीच्या प्रवासात तर्कतीर्थांचा मुक्काम थोरले बंधू आयुर्वेदाचार्य वेणीमधाव जोशी यांच्या शिवाजी पार्क, दादरस्थित निवासी होता. जवळच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निवासस्थान होते. त्यांच्या निमंत्रणावरून तर्कतीर्थ स्वातंत्र्यवीरांच्या दर्शनार्थ गेले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केल्याची नोंद तर्कतीर्थांच्या एका लेखात आहे. हा लेख ‘मी पाहिलेले सावरकर’ या ग्रंथात समाविष्ट आहे. १६ मे, १९९० मध्ये रा. स. भट संपादित ग्रंथ वीरगौरव समिती, पुणे यांनी प्रकाशित केला आहे. तो तर्कतीर्थ समग्र वाङ्मय खंड ९ मध्ये संग्रहित आहे. त्याचे शीर्षक आहे, ‘क्रांतिकारक समादेशक : स्वातंत्र्यवीर सावरकर.’
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निधन २६ फेब्रुवारी, १९६६ मध्ये झाल्यावर तर्कतीर्थांनी ‘नवभारत’ मासिकाच्या एप्रिल, १९६६ च्या अंकात लिहिलेला ‘मृत्यू वा श्रद्धांजली’ लेख तर्कतीर्थ आणि स्वातंत्र्यवीर यांच्यामधील अनुबंधात्मक आदर व्यक्त करणारा आहे. त्यात तर्कतीर्थ म्हणतात, ‘‘लोकभ्रम, अंधश्रद्धा, संकुचित जातिभेद इत्यादी मागासलेपणाची अवलक्षणे नष्ट झाल्याशिवाय हिंदू समाज बलवान होऊ शकणार नाही, हे जाणून त्यांनी हिंदू बलवर्धनार्थ बुद्धिवादाचे प्रखर अस्त्र रूढींवर व परंपरेवर चालविले. पश्चिमी विज्ञान व तंत्र(ज्ञान) यांच्या योगाने पश्चिमी राष्ट्रे सामर्थ्यशाली बनून अत्यंत वेगाने प्रगतीचा मार्ग आक्रमित आहेत, हे पाहून सावरकरांनी सनातन पोथीनिष्ठेवर आघात करून विज्ञाननिष्ठेचा पुरस्कार केला आणि उपयुक्ततावादी नीतिशास्त्र अंगीकारले. सावरकरांनी राष्ट्रबलवर्धनार्थ विज्ञानाची व यंत्राची आराधना करण्याचा संदेश दिला.’’