उदय सामंत – उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य

कुठल्या प्रसंगी कोणते शस्त्र वापरावे याबाबत छत्रपती किती दक्ष होते, हे अफझलखान वधामुळे सिद्ध होते. त्या वेळी त्यांनी वापरलेली वाघनखे पुन्हा महाराष्ट्रभूमीत येत असल्याच्या निमित्ताने आजच्या पिढीसमोर त्या इतिहासाची उजळणी होईल, हीच आमच्या प्रयत्नांची फलश्रुती ठरेल..

Dudhganga tap water scheme,
इचलकरंजीची दूधगंगा नळपाणी योजना रखडल्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर राजू शेट्टी यांचे टीकास्त्र
Eknath Shinde in Raju Parwe Rally
राजू पारवेंच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चालवली बाईक, कडक उन्हात टपरीवर प्यायला चहा
Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!

इतिहासातील एखाद्या कालखंडावर आपले कितीही प्रेम असले, इतिहासातील एखाद्या महापुरुषाविषयी आपल्याला कितीही अभिमान असला तरी आपल्याला घडय़ाळाचे काटे उलटे फिरवून त्या इतिहासात जाता येत नाही. इतिहासातील महान घटनांचे साक्षीदार होता येत नाही. परंतु साहित्य, कला यांतून आपण त्या काळाची अनुभूती घेऊ शकतो. त्या काळाला, त्या इतिहासाला स्पर्श करण्याचे आणखी एक साधन असते, ते म्हणजे त्या काळातील उल्लेखनीय व्यक्तींच्या स्पर्शाने पावन झालेल्या वास्तू. महाराष्ट्राचे दैवत आणि मराठी माणसाचा अभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्पर्श लाभलेली वाघनखे भारतात आणण्यासंदर्भात झालेला करार हा माझ्यासाठी त्यामुळेच आयुष्यातील एक सुवर्णक्षण आहे. माझ्या स्मृतींच्या कोंदणात तो कायमचा राहणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे मला लंडनमध्ये या कराराच्या वेळी उपस्थित राहण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. या कराराच्या वेळी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित राहिले होते. व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड अल्बर्ट संग्रहालयाचे संचालक ट्रायस्टम हण्ट, भारताचे लंडनमधील उच्चायुक्त, त्यांचे सहकारीही यावेळी उपस्थित होते. ‘शिवरायांचा आठवावा प्रताप’ असे आपण म्हणतो तेव्हा त्यांच्या त्या प्रतापाची जी ऐतिहासिक साधने उपलब्ध आहेत, ती आपल्याला प्रेरणा देत असतात. वाघनखे हे त्यांपैकीच एक छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे भारतात आणण्याचा हा संकल्प राज्य सरकारने शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षांचे औचित्य साधून केला होता. राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मी लंडन येथे जाऊन ३ ऑक्टोबरला या संबंधात इग्लंडशी सामंजस्य करार केला. १७१ वर्षे जुन्या असलेल्या व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड अल्बर्ट म्युझियमशी हा करार आम्हाला करता आला याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. या करारानुसार ही वाघनखे नोव्हेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीकरिता भारतात राहतील. ती महाराष्ट्रातील विविध संग्रहालयांत शिवप्रेमी, इतिहासप्रेमी नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येतील. यात सातारा, नागपूर, कोल्हापूर येथील राज्य पुरातत्त्व विभागाच्या संग्रहालयांसह मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा (पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) समावेश असणार आहे.

हेही वाचा >>> मानसिक आरोग्य हा मानवी हक्कच!

या वाघनखांच्या अस्सलतेसंबंधी शंका उपस्थित करण्याचे प्रयत्न केले गेले. शिवाजी महाराजांचे नाव घेऊनच आयुष्यभर ज्यांनी राजकारण केले, त्यांनी शिवस्पर्श झालेल्या लढाईच्या या ऐतिहासिक साधनाबद्दल अशी वक्तव्ये करावीत यावरून त्यांचे छत्रपतींवरील प्रेम आणि इतिहासाचा अभिमान बेगडी असल्याचे सिद्ध होते.

कशाचे राजकारण करावे आणि कशाचे करू नये याचेही भान विरोधकांना नाही, हे यातून दिसून आले. माझ्या लंडन दौऱ्यावरही काही लोकांनी शंका उपस्थित केली. परंतु मी हा दौरा स्वखर्चातून केला हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. त्याचे आवश्यक ते पुरावेही माझ्याकडे आहेत. सर्वसामान्य शिवप्रेमींना शिवस्पर्श झालेल्या वाघनखांचे दर्शन घडावे म्हणून राज्य सरकार पुढाकार घेत असताना तरी किमान क्षुद्र राजकारण करू नये. आरोप आणि प्रत्यारोपांसाठी आपल्याला नेहमी संधी मिळतच असतात, आपण त्या घेतही असतो. ही वेळ आहे, इतिहासाचे स्मरण करण्याची आणि शिवप्रभूंच्या असामान्य धाडसापुढे नतमस्तक होण्याची. तमाम शिवप्रेमींसाठी, अवघ्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठीसुद्धा ही एक ऐतिहासिक बाब आहे. ही वाघनखे पाहून माझे मन ३६४ वर्षे मागे गेले आणि तो प्रसंग, तो क्षण माझ्या डोळय़ांपुढे जणू साकार झाला.

बलाढय़ आणि अजस्र अशा अफझल खानाचा महाराजांनी कसा वध केला असेल त्याचे चित्र डोळय़ांपुढे उभे राहिले. अफझल खानाने दगा केला, पाठीत सुरा खुपसला म्हणून महाराजांनी त्याचा वध केला, हा इतिहास आणि महाराजांची ‘जशास तसे’ची वृत्ती आपण ध्यानात घेतली पाहिजे. वाघनखांचा उपयोग सर्वप्रथम शिवाजी महाराजांनीच केला, असाही दावा केला जातो. या संबंधीच्या इतिहासात मी शिरणार नाही, परंतु कुठल्या प्रसंगी कोणते शस्त्र वापरावे याबाबत छत्रपती किती दक्ष आणि चाणाक्ष होते, हे मात्र अफझलखान वधामुळे सिद्ध होते. महाराजांच्या राजकीय चातुर्याचे आणि युद्धनीतीचे असे अनेक प्रसंग इतिहासात आहेत. यानिमित्ताने आजच्या पिढीसमोर त्या इतिहासाची उजळणी होईल. माझ्या मते ही या प्रयत्नांची उपयुक्त अशी फलश्रुती असेल.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : कारगिलचा भाजपविरोधी कौल

शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचा ३५०व्या वर्धापन दिनाचा सोहळा आपण मोठय़ा उत्साहात साजरा केला. याच वर्षांत आपण शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे प्रतीक असणारी ही वाघनखे शिवभूमीत आणत आहोत. शिवकालीन हत्यारांमध्ये वाघनखांना मोठे महत्त्व होते. १८१८ ते १८२४ या काळात कधीतरी ही वाघनखे महाराष्ट्रातून परदेशात गेली असावी असा इतिहासकारांचा अंदाज आहे. ‘हिस्ट्री ऑफ मराठाज’ हा ग्रंथ लिहिणारा ग्रँड डफ हा त्या काळात सातारा येथे ईस्ट इंडिया कंपनीचा राजकीय प्रतिनिधी म्हणून काम करत होता. त्याने अतिशय हुशारीने ही वाघनो मिळवून इंग्लंडमध्ये नेली असे म्हणतात. पुढे डफ यांच्या वंशजांनी ती व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड अल्बर्ट म्युझियमला दिली असावीत, असे सांगितले जाते.

दुर्दैवाने महाराजांचा पोलादी पट्टा, कटय़ार, त्यांची ढाल, हातावरचे संरक्षक दस्ते, पोलादी चिलखत, पोलादी शिरस्त्राण, कापडी चिलखत, कापडी शिरस्त्राण यातले काहीही आज उपलब्ध नाही. त्यामुळे शिवस्पर्श झालेली ही वाघनखे आपल्यासाठी अनमोल आहेत.

केवळ महाराष्ट्रच नव्हे..

शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने हा आगळा संकल्प केला आणि तो या कराराच्या माध्यमातून पूर्ण केला. या प्रयत्नांना प्रतिसाद देणाऱ्या ब्रिटिश सरकारचे, लंडनमधील व्हिक्टोरिया-अल्बर्ट संग्रहालयाचेही अभिनंदन केले पाहिजे. शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या या वाघनखांचे त्यांनी आजपर्यंत जतन केले, त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत. शिवछत्रपतींच्या शिवराज्याभिषेकाची ३५० वर्षे आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप असा योग जुळून आला आहे. शिवरायांनी या वाघनखांच्या सहायाने एका वृत्तीचा नाश केला.

रयतेचे सार्वभौमत्व, देव, धर्म आणि देवळांना उद्ध्वस्त करणारी, प्रजा या संकल्पनेची विटंबना करणारी वृत्ती राजांनी अफझल खानाचा वध करून नष्ट केली. शिवछत्रपतींची ही वाघनखे आता केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील तमाम शिवप्रेमींसाठी एक प्रकारे शिवदर्शन ठरणार आहेत. शिवप्रतापाची आठवण करून देणारे, स्मरण करून देणारे ते निमित्त ठरेल, असा मला विश्वास आहे. या शिवप्रतापाची प्रेरणा घेऊनच आपली पुढची पिढी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शावर वाटचाल करणार आहे. या दृष्टीने ही वाघनखे राष्ट्रप्रेमाचे, आपल्या राज्याच्या, देशाच्या विकासात योगदान देण्याचे स्फुल्लिंग निर्माण करेल अशी आशा आहे.