‘नवभारत’ आणि ‘साहित्य’मध्ये लिहिलेले प्रा. न. र. फाटकांवरील दोन-तीन लेख वाचत असताना त्यांच्याबद्दल तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मनात त्यांचे लेखन, शैली व सार्वजनिक समाजशीलतेबद्दल निरंतर कृतज्ञता भरल्याचे दिसून येते. या सर्व लेखनातून तर्कतीर्थ हे प्रा. न. र. फाटक ज्या संवेदनशील पद्धतीने उभे करतात, त्यामुळे फाटकांचे समकालीन नसणाऱ्यांना त्यांच्या सहवासाची आभासी प्रचीती येत राहते.
उपनिषदांमध्ये याज्ञवल्क्यमुनींनी शिक्षणाबद्दल लिहिले आहे की, मातृमान, पितृमान, आचार्यवान इत्यादींपासून मिळेल तितके शिक्षण घ्यावे, ते फाटकांनी घेतले. अशा प्रकारच्या अध्ययनातून शिस्त येते, ती त्यांच्यात होती. ते मराठी, संस्कृत, उर्दू भाषा जाणत. वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेशात शिकत ते मोठे झाल्याने उदारमतवादी समज त्यांच्यात विकसित झाली होती. ती स्वतंत्र होती. त्यामुळे प्रा. फाटक शिवाजी-रामदास, १८५७ चे बंड, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यावर नवा प्रकाश टाकू शकले. त्यामुळे वि. का. राजवाडे आणि प्रा. न. र. फाटक यांच्या लेखन पद्धतीत मूलभूत फरक दिसतो. राजवाडे यांची उपपत्ती पुराणमतवादी असते, तर फाटक यांची उदारमतवादी.
सर्वसामान्य लोकमताला न जुमानता यथातथ्य लेखन करण्याचा रिवाज प्रा. फाटक यांनी लिहिलेल्या नवग्रंथांतून दिसून येतो. परखड, तिखट, धारदार, उपरोधिक लेखक म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. वादात ते कधी कुणास हार गेलेले नाहीत. त्यामुळे हे उग्र प्रकृतीचे गृहस्थ आहेत, असा कयास करून अनेकजण त्यांच्यापासून दूर राहात. इतिहासलेखन कार्याप्रमाणे प्रा. न. र. फाटक यांनी केलेले वृत्तपत्रीय कार्य मात्र अचर्चित राहिले आहे. १९१८ ते १९२३ पर्यंत ते दैनिक ‘इंदुप्रकाश’चे संपादक होते. तसेच १९२३ ते १९३५ या काळात त्यांनी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांच्या ‘नवाकाळ’चे संपादकीय कार्य केले. प्रा. फाटक हे महाराष्ट्रातील अनेक सार्वजनिक संस्थांमध्ये सक्रिय होते. त्या अर्थाने ते ‘सार्वजनिक समाजपुरुष’ होते. भारत इतिहास संशोधक मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, प्राज्ञपाठशाळा मंडळ, मुंबई मराठी साहित्य संघ इ. संस्थांमध्ये ते पदाधिकारी म्हणून सक्रिय होते.
केवळ बी.ए. पदवीची पात्रता धारण करणाऱ्या प्रा. फाटक यांची चतुरस्रा विद्वत्ता, सूक्ष्म समीक्षकता, साहित्यिक धार्मिकता लक्षात घेऊन न्यायमूर्ती सीताराम पाटकर यांनी त्यांची नियुक्ती कुलगुरू म्हणून कार्यरत असतानाच्या काळात श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक म्हणून केली होती. ते राम नारायण रुईया महाविद्यालय, माटुंगा, मुंबई येथेही काही काळ मराठी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.
चुकीच्या इतिहास लेखनास छेद देत प्रा. फाटक यांनी केलेले विविध नियतकालिकांतील समीक्षा लेख, लेखमाला हा त्यांच्या व्यासंगी इतिहासकार व्यक्तिमत्त्वाचा अभिन्न भाग होता. न. चिं. केळकर लिखित ‘टिळक चरित्र’, वि. का. राजवाडे, ‘मुमुक्ष’कार ल. रा. पांगारकर, ‘समर्थ बाग मंदिर’चे संस्थापक शंकर श्रीकृष्ण देव प्रभृतींनी चित्रित केलेली रामदास प्रतिमा, १८५७ च्या बंडाचे पूर्वसुरी इतिहासकारांनी केलेले वर्णन कसे चुकीचे होते, हे दाखवत लिहिलेले लेख व ग्रंथ म्हणजे प्रा. फाटक रचित वस्तुनिष्ठ इतिहास लेखनशैली होय. त्याकडे इतिहासकारांची तटस्थ भूमिका व वस्तुनिष्ठ लेखनशैलीचा आदर्श वस्तुपाठ म्हणूनच पाहावे लागते. मतभेदपूर्ण मैत्रीची परंपरा आपल्या समकालीनांच्या संदर्भात पाळत. दुर्गा भागवत, कुसुमावती देशपांडे, मालती बेडेकर या समकालीन विदुषींचा ते आदर करीत. इतिहासाइतकीच गती त्यांना मराठी भाषा, साहित्य व समीक्षेत होती. एकीकडे निर्भीड, प्रखर टीकाकार, तर दुसरीकडे मर्मग्राही रसिक असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे आणि भारतमंत्री गोपाळ कृष्ण गोखले ही त्रिमूर्ती त्यांच्या ठायी राष्ट्रप्रेम, समाजसुधारणा व देश स्वातंत्र्याच्या संदर्भात प्रेरक वाटत राही. या त्रिमूर्तींची प्रा. फाटक यांनी लिहिलेली चरित्रे त्याचा आरसा होय.
भाषांतरकार, कादंबरीकार, व्याख्याते, वक्ता, समीक्षक म्हणून प्रा. न. र. फाटक यांचे कार्य मराठी साहित्य संशोधकांनी पुढे आणले, तर त्यांच्या चरित्र, जीवन, कार्य व लेखनावर नवा प्रकाश पडेल.
drsklawate@gmail.com