ब्राह्म समाज, वाईमार्फत तेथील टिळक स्मारक मंदिरात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे २५ फेब्रुवारी, १९४९ रोजी ‘गांधी आणि ख्रिस्त’ विषयावर भाषण झाले होते. त्याचे शब्दांकन सत्यशोधक कार्यकर्ते रा. ना. चव्हाण यांनी केले होते. ते साप्ताहिक ‘साधना’, पुणेच्या २८ एप्रिल, १९४९ च्या अंकात प्रसिद्ध झाले होते.
या भाषणात बुद्ध, ख्रिस्त आणि गांधी अशी तुलना आहे. हे भाषण समजून घ्यायचे, तर वि. स. खांडेकरांची रूपककथा ‘बुद्ध, ख्रिस्त आणि गांधी’ उपयोगी ठरते. बुद्धाचा अहिंसा सिद्धांत गांधींच्या योगाने आधुनिक जगात दुमदुमला. बुद्ध आणि गांधींमध्ये जे तात्त्विक साम्य आहे, ते त्यांच्या जीवनात मात्र नाही. गांधींची तुलना ख्रिस्तांशी केली जाते. या दोघांमध्ये काळाचे मोठे अंतर आहे. या उभयतांभोवतीचे वातावरण भिन्न होते, तरी गांधींमध्ये तात्त्विक अनुभूती प्रत्यक्ष जीवनात प्रगटली. ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा गांधींवर प्रभाव दिसतो.
गांधींनी ‘बायबल’चे मनन केले होते. टॉलस्टॉय, रस्किन वाचला होता. शत्रूचीही समृद्धी व्हावी, अशी ख्रिस्ताची धारणा होती. स्वजनांनी त्याला सुळावर लटकविले तेव्हा तो म्हणाला होता, ‘‘देवा, ज्यांनी मला देहान्त शासन दिले, त्यांना क्षमा कर. कारण, आपण काय करतो हे त्यांना कळत नाही.’’ इतरांच्या पापाचे प्रायश्चित्त स्वत:वर घेण्याची शिकवण गांधींनी ख्रिस्तांकडून घेतली होती. लोकांच्या पापाची जबाबदारी समाज पुरुषावर येत असते. ‘हिंदू-मुसलमानांच्या एकीकरिता मी माझे रक्तही अर्पण करीन’ म्हणणारे गांधी ख्रिस्ताचेच अनुयायी होत.

ख्रिस्ताने धर्मेतिहासातला शेवटचा आत्मयज्ञ केला होता, तोच आत्मयज्ञ गांधींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केला. मानवी पापांची मुक्ती व्हावी म्हणून ख्रिस्ताचा आत्मयज्ञ होता, तर गांधींचा हिंदीबांधव जातीय, धर्मीय द्वेषापासून मुक्त व्हावेत म्हणून. ‘गरीब, पतित हे ईश्वराचे लाडके’ हे ‘बायबल’मधील धर्मवचन गांधींनी अस्पृश्यांना दिलेल्या ‘हरिजन’ संज्ञेत प्रतिबिंबित आहे. हिंदू, ख्रिाश्चन, बौद्ध धर्म समभावाने अहिंसा, सत्य, इंद्रियनिग्रह, अपरिग्रह इत्यादी तत्त्वांचा पुरस्कार करतात. प्रेमाने क्रोधास, असत्यास सत्याने, दुष्टास साधुत्वाने जिंकावे, असा सर्वधर्मांचा समान विचार आहे.

१९३७ च्या गांधी सेवा संघ अधिवेशनात महात्मा गांधींनी म्हटले होते की, ‘‘पती-पत्नींनी फार तर एकाच संततीची कामना करावी. परंतु, संततीची (अपत्य) मुळीच इच्छा नसणे चांगले. एकाच संततीकरिता कामोपभोग करावा लागेल; पण तोही विषयप्रीतीवाचून केला पाहिजे.’’ गांधींच्या या विचारांवर ख्रिस्त प्रभाव आहे. ख्रिश्चन धर्माप्रमाणे सर्वप्रकारचा स्त्री-पुरुष संग पाप होय. म्हणून ख्रिस्ताची उत्पत्ती कुमारीपासून सांगितली जाते. वैराग्यपर संन्यासवादी नीतीशास्त्र हेच खरे !

गांधींच्या सर्व जीवनाचा अंतिम उद्देश रामराज्य स्थापना होता. रामराज्य म्हणजे ईश्वरीय राज्य (किंग्डम ऑफ गॉड). हे ख्रिश्चन धर्माचेही ध्येय आहे. हिंदू धर्मात धर्मस्थापना आहे, राज्यस्थापना नाही.

गांधी आणि ख्रिस्त दोघांची हत्या स्वजनांनी केली. ख्रिस्ता हत्येनंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा दिव्य देह धारण करून अवतरला. ख्रिाश्चन धर्माचा इतिहास पाश्चात्त्य समाजाचा इतिहास आहे. हिंदुस्थानचा इतिहास लोकांच्या सर्वोदयाचा व्हायला पाहिजे. गांधी आणि ख्रिस्ता मध्ये मूलभूत फरक आहे. ख्रिस्ता धर्मोपदेशक होते, तर गांधी राजकारणी. राजकारण विचित्र प्रकृतीच्या लोकांचे कार्यक्षेत्र आहे. राजकारण साधुतेसही प्रसंगी मलिन करते. गांधी मनुष्य होते. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर ब्रिटिशांना त्यांच्या संकटावेळी मी विरोध करणार नाही, असे लिनलिथगो यांना दिलेले आश्वासन १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात गांधी पाळू शकले नाहीत.

अहिंसेवरचा त्यांचा भरवसा का डळमळला? संस्कृत कवीने म्हटले आहे, ‘‘वनराज ऐन उमेदीत डोंगरांनाही टक्कर देतो. प्रसंगी या टकरीत त्या गजाचा दातही तुटतो. गिरी-विदारण करणाऱ्या गजाचा दात भंगला तरी त्याची प्रशंसाच केली पाहिजे.’’ राजकारणात धुरीणत्व पत्करणाऱ्या साधूला क्वचित प्रसंगी तत्त्वापासून च्युत व्हावे लागले तरी त्याबद्दल त्याला दोष न देता राजकारणाला दोष दिला पाहिजे. कारण, राजकारणात पावित्र्य राखणे हे एक अघटित शौर्य आहे !

तर्कतीर्थांचे हे भाषण म्हणजे बुद्ध, ख्रिस्ता आणि गांधी यांच्या जीवन, विचार, चिंतनाचे फलित होय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

drsklawate@gmail.com