तत्कालीन पुणे विद्यापीठामार्फत १९४९ मध्ये ‘श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे, इचलकरंजी स्मृती व्याख्यानमाला’ आयोजित केली होती. या मालेतील व्याख्याने देण्यासाठी विद्यापीठाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना आमंत्रित केले होते. व्याख्यानमालेचा विषय ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ हा होता. या विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू बॅरिस्टर डॉ. मुकुंद रामराव जयकर यांनी व्याख्यानमाला, विषय व वक्ते असे त्रिविध महत्त्व लक्षात घेऊन याचा लाभ सर्वांना घेता यावा म्हणून ही व्याख्यानमाला पुण्याच्या मध्यवर्ती लक्ष्मी रोडवरील गोखले हॉलमध्ये योजली होती. तर्कतीर्थांनी या मालेत सलग सहा दिवस व्याख्याने दिली. त्यांचे विषय होते – १) वेदकालीन संस्कृती, २) वेदांची तार्किक प्रज्ञेत परिणती, ३) वैदिकांची कुटुंबसंस्था व समाजसंस्था, ४) इतिहास-पुराणांची व रामायणाची संस्कृती, ५) बौद्ध व जैन यांचा धर्मविजय, ६) आधुनिक भारतातील सांस्कृतिक आंदोलन.
मानववंशशास्त्राच्या अंगाने अभ्यास
या सहा भाषणांचा संग्रह म्हणजे ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ हा ग्रंथ होय. त्याची पहिली आवृत्ती १९५१ मध्ये प्राज्ञपाठशाळा मंडळ, वाईने प्रकाशित केली होती. या ग्रंथास साहित्य अकादमी, नवी दिल्लीने भारतीय भाषांतील श्रेष्ठ रचनांना पुरस्कार योजना १९५५ मध्ये सुरू केली, तेव्हा पहिला मराठी पुरस्कार या ग्रंथास जाहीर झाला होता. मराठीस साहित्य अकादमी पुरस्कार मिळवून देणारे तर्कतीर्थ पहिले मराठी लेखक होत. मराठी अभिजात ग्रंथ म्हणून याकडे पाहिले जाते. या ग्रंथाचे इंग्रजी, हिंदी, संस्कृतमधील भाषांतर उपलब्ध आहे. या ग्रंथ प्रकाशनानंतर आजवर दुर्गा भागवत, म. अ. मेहेंदळे, डॉ. ग. ना. जोशी, प्रा. मे. पुं. रेगे, डॉ. स्वाती भोंगळे, डॉ. अरुंधती खंडकर यांनी त्याची समीक्षा केली आहे. ‘जिवंत प्रज्ञेच्या स्फुरणाचे उत्कृष्ट प्रत्यंतर’ म्हणत दुर्गा भागवत यांनी या ग्रंथाची प्रशंसा केली आहे. वैदिक संस्कृती म्हणजे केवळ प्राचीन संस्कृती नाही, तर वेदांपासून महात्मा गांधींपर्यंतच्या भारतीय संस्कृती विकासाचा आढावा घेणारा ग्रंथ म्हणून याचे असाधारण महत्त्व आहे.
‘वैदिक संस्कृतीचा विकास’ ग्रंथ तर्कतीर्थकृत एक सकारात्मक लेखन होय. संस्कृतीचा अभ्यास मानववंशशास्त्रदृष्ट्या कसा करता येतो, हे या ग्रंथामुळे लक्षात येते. भाषा, साहित्य, कला, स्थापत्य, धर्म, समाज, अर्थ इत्यादी अंगांनी या ग्रंथात भारतीय संस्कृतीवर तर्कतीर्थांनी केलेले भाष्य या संस्कृतीचे श्रेष्ठत्व अधोरेखित करते. वैदिक संस्कृती विश्व संस्कृतीचा पाया होय. बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची बहुश्रुतता आणि चिंतनाची व्यापकता अशा विविध घटकांची फलश्रुती म्हणजे हा ग्रंथ होय. संस्कृती हा त्या मानवी समाजाचा चेहरा असतो, तसेच वैशिष्ट्यही! प्रत्येक संस्कृती व्यवच्छेदक असते. तिचे स्वतंत्र अस्तित्व त्या संस्कृती समाजवर्गात अस्मिता तयार करते. कालौघात अस्मिता अहंकारात परिवर्तित होत राहते. हा अहंकार वैर निर्माण करतो. जी संस्कृती खरे तर सभ्यतेतून निर्माण होते, ती संघर्षाचे कारण बनणे, ही तिची शोकांतिका असते.
संस्कृतीतून वैश्विक ऐक्य व शांती निर्माण व्हायला हवी, या उद्देशाने तर्कतीर्थांनी केलेल्या या लेखनाचा विचार व्हायला हवा. हे या ग्रंथाचे अध्याहृत सूचन आहे. हे सूचन तर्कतीर्थांच्या प्रगल्भ चिंतनाचा प्रत्यंकारी आविष्कार होय. जगातील युद्धे, संघर्ष, हिंसा इ. गोष्टींबद्दल या ग्रंथात जे सूचन आहे, ते मौन, अव्यक्त आहे खरे, पण तेच या ग्रंथाचे अभिजात बलस्थान होय. हे वर्ष या ग्रंथाचे अमृतमहोत्सवी प्रकाशन वर्ष आहे. या ग्रंथातून तर्कतीर्थ हे महात्मा गांधींचे मौन, गौतम बुद्धाचे चिंतन आणि सॉक्रेटिसचा क्लेष समजावतात, असे वाचताना लक्षात येते. अभिव्यक्ती मौन असते, तेव्हा ती अधिक प्रभावी ठरते. ती अर्थाने उमजतेच; पण आशयघनतेतून हृदयस्पर्शी होते, हे समजून घ्यायचे तर या ग्रंथवाचनास पर्याय नाही. या ग्रंथात तर्कतीर्थांचा काया, वाचा, मने असा त्रिविध अंतःस्वर ऐकू येतो. तो मननाने आपल्या कानात गुंजारव करीत राहतो. मग लक्षात येते की, खरे संस्कृती रक्षण आक्रमण, समूह हिंसा, द्वेषांनी नाही, तर संयम, सद्भाव, सहिष्णुतेनेच होत असते. वेदांची वैदिकता म्हणूनही पौरुषेय ठरते, हेही लक्षात आल्यावाचून राहात नाही.
drsklawate@gmail.com