साहित्य अकादमीसाठी १९५८ मध्ये ‘राजवाडे लेखसंग्रह’ संपादित करून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी त्यास पंधराएक पृष्ठांची प्रस्तावना लिहिली. नंतर १९६३-६४ मध्ये इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या जन्मतिथीवरून मोठा वाद उद्भवला होता. तेव्हा तर्कतीर्थ अमेरिकेत होते. तेथून परतल्यावर त्यांनी या वादात उडी घेऊन, साने गुरुजी प्रतिपादित २४ जुलै, १८६३ ही जन्मतारीख ग्राह्य मानावी याचे समर्थन करणारा लेख ‘नवभारत’ मासिकाच्या ऑगस्ट, १९६४ च्या अंकात प्रकाशित केला. त्याचे शीर्षक आहे, ‘कै. वि. का. राजवाडे जन्मशताब्दी’. या दोन्हींतून वि. का. राजवाडे उमगतात, त्यांच्याप्रति तर्कतीर्थांच्या मनात असलेला आदर कळतो नि त्यांच्या इतिहास लेखनाचा अभ्यास आणि व्यासंगही लक्षात येतो!
वि. का. राजवाडे यांचे बालपण व प्राथमिक शिक्षण पुणे जिल्ह्यातील वडगाव येथे, तर माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले. जानेवारी, १८८२ मध्ये ते मुंबई विद्यापीठातून मॅट्रिक उत्तीर्ण झाले. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये पहिली सहामाही दिल्यानंतर आर्थिक परिस्थितीमुळे कॉलेजचे शिक्षण सोडून शिकवणी करणे पत्करावे लागले. १८८४ मध्ये त्यांचे वडील बंधू प्रा. वैजनाथ राजवाडे यांना पुण्याच्या डेक्कन कॉलेजची फेलोशिप मिळाल्यानंतर वि. का. राजवाडे यांना कॉलेजमध्ये शिकता आले. १८९० मध्ये त्यांनी डेक्कन कॉलेजातून बी.ए. पदवी संपादली.
पुढे ते आयुष्यभर ज्ञानमय साधनेत एकाग्र झाले. १८८५ मध्ये त्यांनी ‘भाषांतर’ मासिक सुरू केले. कॉलेजात असतानाच त्यांनी प्लेटोच्या ‘रिपब्लिक’चे ‘प्लेटोचे सुराज्य’ या शीर्षकाने भाषांतर केले होते. ज्या ज्ञानाच्या प्रकाशामुळे युरोप हा अंधकारमय मध्ययुगातून जागा झाला. ते ज्ञान भारतालाही प्राप्त होणे जरुरीचे आहे आणि त्यायोगेच येथील बौद्धिक व मानसिक अवनती संपून पुनरुज्जीवन (रेनेसाँ) सुरू होईल, अशी राजवाडे यांची धारणा होती. त्याकरिता त्यांनी इतिहासविद्योचा आश्रय घेतला.
वि. का. राजवाडे यांनी केलेले इतिहासलेखन व संशोधन लक्षात घेता, तर्कतीर्थांचे म्हणणे होते की, ‘‘राजवाडे यांनी आपल्या इतिहासमीमांसेत भारत पाश्चात्त्यांनी कसा जिंकला व भारत त्यांच्यापुढे का पराभूत झाला, यासंबंधी कार्यकारणभाव सांगताना पाश्चात्त्यांची संस्कृती ही भारतीय हिंदूंपेक्षा अधिक प्रगत आणि म्हणून अधिक समर्थ होती, हे सांगितले आहे. याचा अर्थ असा की, भारतीयांना स्वाभिमान व वैज्ञानिक संस्कृती या दोन्ही गोष्टींचा लाभ झाल्याशिवाय भारतात नवजीवन (रेनेसाँ) येणार नाही, असा सिद्धांत राजवाडे यांनी सूचित केला. या ऐतिहासिक चिंतनाने मराठी भाषेत नवजीवनाचे बीज रोवले.’’ मराठ्यांच्या इतिहासाची साधने त्यांनी गोळा केली, प्रसिद्ध केली किंवा मराठी वाङ्मयाची मध्ययुगीन ग्रंथसंपत्ती व अनेक ग्रंथकार शोधून प्रकाशात आणले.
इतिहास साधनसंग्रहार्थ ते चिरयात्रिक बनून भटकत राहिले. हस्तलिखिते, पोथ्या इ. संग्रहांची चौकशी करून माहिती घेत. ती मिळविण्याची खटपट करीत. ती मिळाली की बुभुक्षिताप्रमाणे त्यावर तुटून पडत. मालकाची खुशी प्रमाण मानून ती प्राप्त करीत. ती हस्तगत होत नसल्यास तिथेच बसून तर्जुमा (कित्ता) करून घेत. राजवाडे यांची मन:प्रकृती दुर्वासामुनीप्रमाणे होती. साधन मालकांशी त्यांचा व्यवहार विनयशील व संयमी असे. ते मिताहारी होते. स्वहस्ते पाकसिद्धी करून दूध-भातासारखा सात्त्विक आहार घेत. त्यांना एक लहान व्यसन होते. ते म्हणजे विडी ओढणे. कित्येकदा सलग चार-पाच विड्या शिलगावत आणि त्यांच्या धूम्रवलयात त्यांचे इतिहास चिंतन एकरूप होत राही. मिळणारी दप्तरे, हस्तलिखिते, पोथ्या बहुधा दुरवस्थेत असत. त्यांस कसर, वाळवी, उंदीर लागलेले असत. काही कागदपत्रांच्या तर विटा झालेल्या असत. त्यांचे एकेक पापुद्रे सोडवत वाचन चाले. हे सर्व ते न थकता करीत. हे तप त्यांनी सुमारे चार दशके अव्याहत केले. त्यांनी अशा कष्टातून तयार केलेला इतिहास साधनांचा पहिला खंड पुण्यातील फडकेवाड्यातील विठ्ठल छापखान्यात छापला. त्या छापखान्यास लागलेल्या आगीत तो भस्मसात झाला. राजवाडे यांनी तो परत लिहून काढला. त्यांचे म्हणणे होते की, ‘माणूस कष्टाने नाही, आळसाने मरतो.’
drsklawate@gmail.com