लोकनायक बापूजी अणे यांचे मूळ नाव डॉ. माधव श्रीहरी अणे (१८८०-१९६८). १९८० मध्ये त्यांची जन्मशताब्दी साजरी झाली. त्यानिमित्ताने ‘ओंजळ’ (१९८१) हा गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आला होता. त्यात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी एक गौरवलेख लिहिला होता. त्याचे शीर्षक होते, ‘वऱ्हाडचे टिळक : लोकनायक बापूजी अणे’. नंतर त्याच दरम्यान विदर्भ साहित्य संघ, शाखा वणी (जि. यवतमाळ)तर्फे ‘अक्षर माधव’चे अनेक खंड प्रकाशित झाले. त्यात लोकनायक अणे यांचे विखुरलेले साहित्य मिळवून प्राचार्य राम शेवाळकर यांनी संपादित केले. त्याच्या दुसऱ्या खंडाला तर्कतीर्थांची प्रस्तावना आहे. या दोन्ही संदर्भान्वये लोकनायक अणे यांचे जीवन, कार्य, विचार समजायला मोठी मदत होते.

लोकनायक अणे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. ते स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, संस्कृत कवी, चरित्रकार होते. टिळकांचे शिष्य म्हणून प्रसिद्धीस आलेले लोकनायक लोकमान्यांच्या मृत्यूनंतर महात्मा गांधींचे अनुयायी बनले. स्वातंत्र्यपूर्व काळात ते घटना मसुदा समिती, जंगल सत्याग्रह, सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती इ.द्वारे लोकनेते म्हणून विदर्भात उदयास आले. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश व्हॉइसरॉय सल्लागार मंडळ सदस्य, तत्कालीन सिलोन (श्रीलंका)चे भारतीय उच्चायुक्त, स्वातंत्र्योत्तर काळात अनेकदा खासदार, नंतर १९४८ ते १९५२ या काळात बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांनी कार्य केले. त्यांनी लिहिलेल्या ‘श्रीतिलकयशोऽर्णव:’ (१९७१) या टिळकांचे चरित्र संस्कृतमध्ये मांडणाऱ्या त्रिखंडात्मक महाकाव्यास १९७३ चा संस्कृतसाठी दिला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तर्कतीर्थांनी या ग्रंथाची समीक्षा केली होती. लोकनायक अणे नि तर्कतीर्थांच्या अनेक भेटी, चर्चा झालेल्या आहेत. दिल्ली मुक्कामात तर्कतीर्थ अणे यांच्याकडे राहिलेही होते. १९६२ च्या लोकसभा निवडणुकीत लोकनायक अणे यांनी स्वतंत्र विदर्भाचा पुरस्कार करत काँग्रेसचे तिकीट अव्हेरले आणि नागविदर्भ आंदोलन समितीतर्फे रिखबचंद शर्मा या काँग्रेस उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढविली. पंडित नेहरूंनी या निवडणुकीत लोकनायक अणे यांच्या विरोधात भाषण करणे नाकारत त्यांच्याप्रतिचा आदर व्यक्त केला होता. लोकनायक निवडणूकही जिंकले.

वैदिक कुटुंबात जन्मलेले लोकनायक अणे, त्यांचा आचार-विचार अस्सल सनातनी होता, परंतु १९३४ ला मदन मोहन मालवीयांनी प्रयागमध्ये भरवलेल्या सनातन धर्म परिषदेत धर्मशास्त्राधारे तर्कतीर्थांनी अस्पृश्यता निर्मूलनाचे केलेले समर्थन समजून घेतल्यावर मात्र ते तर्कतीर्थांना म्हणाले होते, ‘‘देशकाल परिस्थितीप्रमाणे धर्मशास्त्राचा अर्थ करण्याची तुमची ही पद्धती फार चांगली आहे. आपली श्रेष्ठ परंपरा मला मोडायची नाही, परंतु तिच्यात योग्य असा बदल करणे आवश्यक आहे’’ बापूजी अणे यांनी संस्कृतच्या पांडित्याला आधुनिक धर्ममीमांसेची जोड दिलेली होती. ‘अथर्वशीर्षा’तील गणपती कसा बनला, याची उपपत्ती मांडताना त्यांनी भारतीय समाजातील जमातींचे भिन्नत्व लक्षात घेऊन विशद केले होते की, ‘‘भारताचे एकराष्ट्रीयत्व म्हणजे केवळ हिंदूंचे एकराष्ट्रीयत्व नव्हे, तर हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या विस्तृत प्रदेशात राहणाऱ्या विविध धर्मीय जमातींचे एकराष्ट्रीयत्व होय’’.

पुण्यातल्या वेदशास्त्र परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी, ‘‘धर्मसंस्था ही लोकजीवनाची मूलभूत गरज म्हणून जिवंत राहात असते. लोकांचा पाठिंबा मिळावा म्हणून मुख्यत: राजा धर्मसंस्थेची कदर करतो. सुजाण, सुशिक्षित लोकांना जर अस्सल धर्मजीवनाची कदर राहिली नाही, तर धर्मजीवनाच्या बौद्धिक अधिष्ठानाची उपेक्षा होऊ लागते, त्यामुळे वैदिक, शास्त्री, पंडित, पुरोहित, कथा-कीर्तनकार, पुराणिक यांचा वर्ग निराधार बनून क्षीण बनतो व लांबतो (दुरावतो). या प्रकारची परिस्थिती हिंदू धर्माच्या संबंधात निर्माण झाली आहे.’’ लोकनायक अणे यांचे खासगी जीवन सनातनी असले, तरी त्यांचा सर्वधर्म समन्वयाचा सिद्धांत त्यांनी भारतीय राष्ट्रीयत्वाचे मूलभूत तत्त्व म्हणून मान्य केला होता. त्यामुळेच ते लोकमान्यांचे निष्ठावंत अनुयायी व महात्मा गांधी आंदोलनाचे पुरस्कर्ते म्हणून लोकनायक झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

drsklawate@gmail.com