‘समुद्रमंथन झाले ते अमृतासाठी’ हे आपण पूर्वापार ऐकत आलो आहोत पण आजच्या काळात असेही एक अमृत आहे ज्याने सातासमुद्रापलीकडे भारताला ओळख मिळवून दिली. श्रीराम देवता यांनी लिहिलेले ‘अमृत: द ग्रेट चर्न’ हे पुस्तक आजमितीला अतिशय महत्त्वाचे आहे. कारण आजच्या काळात पाश्चात्त्य जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन अमृत या साडेतीन अक्षरी शब्दाने बदलवला तो कसा याची ही यशोगाथा आहे.

जे. एन. राधाकृष्ण राव जगदाळे यांचा मूळ व्यवसाय होता औषधांचा- ‘अमृत लॅबोरेटरीज’. मात्र त्यातूनच त्यांनी १९४८ साली ब्रँडी आणि रम गाळायचा परवानादेखील मिळवला होता आणि या व्यवसायातील त्यांचे सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे ग्राहक होते भारतीय लष्कर. राधाकृष्ण जगदाळे यांचे ‘अमृत डिस्टिलरीज’खेरीज ‘जगत फार्मा’ आणि ‘प्रिसीजन टूल्स’ हे इतर व्यवसायदेखील होते. १९७२ साली अमृत लॅबोरेटरीजचेच नामकरण अमृत डिस्टिलरी असे केले गेले. १९९२ साली व्यवसायाच्या वाटण्या झाल्या आणि अमृत डिस्टिलरीज, नीळकंठ जगदाळे यांच्या वाट्याला आली. नीळकंठ जगदाळे यांनी वडिलांचा व्यवसाय अगदी जवळून पाहिला असल्याने, त्यासाठी काम केले असल्याने, त्यांना व्यवसायाचा विस्तार करणे अवघड गेले नाही. काळाची पावले ओळखून त्यांनी नवनवीन बदल केले. पूर्ण मालकी हक्क यायच्या आधीपासून ‘एनआरजे’, (नीळकंठ जगदाळे यांना कंपनीत सगळे याच नावाने संबोधायचे) यांनी नवीन उत्पादने आणली होती. ‘एनआरजे’ हे खरे काळाच्या पुढचा विचार करणारे होते. त्यांनी ९०च्या दशकात बेंगळूरुत ऑलिम्पिक सुविधांचा जलतरण तलाव बांधला होता, पॅकेज्ड पाण्याच्या व्यवसायात त्यांना रस होता; मात्र अमृतच्या बाकी व्यापात ते मागे पडले. कामाच्या ठिकाणचे स्त्रियांचे लक्षणीय प्रमाण यांसारख्या अनेक गोष्टींतून त्यांनी प्रागतिक उद्याोजक ही कीर्ती कायम ठेवली.

२००१ साली ‘एनआरजे’ यांनी त्यांच्या मुलाला- रक्षितला- शिक्षणासाठी यूकेमध्ये पाठवले ते मनात काही सुप्त हेतू ठेवूनच आणि त्याने देखील वडिलांचे मन ओळखून आपल्या व्यवसायाशी संबंधित विषय थिसिसला घेतला. ‘यूकेमधील भारतीय रेस्टॉरंटमध्ये आपले मद्या विकले जायला हवे’ या एका वाक्यावरून ‘अमृत’चा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला त्यामुळेच पुस्तकात याला झीरो मोमेंट्स ऑफ ट्रूथ असे म्हटले आहे. ‘आयएमएफएल’ म्हणजेच ‘इंडियन मेड फॉरेन लिकर’ विकणारी आपली कंपनी भारतात तयार होणारी उच्च प्रतीची व्हिस्की यूकेमध्ये विकू शकण्याइतकी सक्षम व्हावी, हा विचार मनात येणे तसे सोपे होते; मात्र त्यासाठी आवश्यक ती पावले उचलणे तितकेच अवघड होते. न्यूकॅसल विद्यापीठात रक्षितची ओळख झाली अशोक चोकलिंगम याच्याशी- जी दोघांचेही आयुष्य बदलवणारी ठरली. सुरुवातीची अनेक वर्षे भारताबाहेर तरी अशोक हा अमृतचा चेहरा असल्यामुळे या पुस्तकात त्यांच्याबद्दल खूप भरभरून लिहिले आहे.

२००४ मध्ये अमृत व्हिस्की भारतात लाँच करण्याऐवजी यूकेमध्ये आधी तिला प्रतिष्ठा मिळवून द्यावी आणि मग भारतात आणावे हा विचारच मुळात क्रांतिकारक होता. बाजाराचा अभ्यास करताना रक्षित आणि अशोक यांची भिस्त होती ती तिथल्या भारतीय लोकांवर. हे पुस्तक व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी केस स्टडी म्हणून अतिशय उत्तम आहे. भारतीय लोकांनी या भारतीय मद्याकडे अविश्वासाने पाहिले तर स्कॉटिश आणि इतरांनी तुच्छतेने! एकेक बाटली विकतानाचा अशोक यांचा संघर्ष खूप सुंदर पद्धतीने या पुस्तकात आला आहे. चार-पाच वर्षे खूप प्रयत्न करूनही काहीच यश मिळत नाही आता इथे सारेच थांबवावे का, अशा वळणावर नीळकंठ जगदाळे यांनी रक्षितला ‘एक शेवटचा प्रयत्न करून बघू’ म्हणून २००८ मध्ये धीर दिला.

आता सगळे संपले, काही नाही राहिले, असे वाटत असतानाच अचानक मार्ग दिसू लागतो तसेच अमृतच्या बाबतीत झाले. या पुस्तकात व्हिस्की तयार करण्याची पद्धत, त्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल, त्यावर होणारी प्रक्रिया यांबद्दल खूप खोलात जाऊन, सर्वांना समजेल अशा भाषेतली माहिती दिलेली आहे. व्हिस्कीमधील अल्कोहोलचे प्रमाण कसे ठरवले जाते, ती किती वर्षे मुरवत ठेवली जाते, कोणत्या प्रकारच्या लाकडाच्या ‘कास्क’मुळे व्हिस्कीच्या रंगात आणि चवीत काय फरक पडतो, हे सगळे रंजक पद्धतीने पानोपानी येत राहते. २००९ साली ‘एनआरजे’ यांनी ऊटीमध्ये दोन वेगळ्या प्रकारच्या अमृत सिंगल माल्ट एकत्र करून अमृत फ्यूजनचा प्रयोग केला. त्याची चव त्यांना, त्यांच्या मुलाला आणि जावयालादेखील आवडली, तेव्हा हा प्रयोग युरोपमध्येही करण्याचे ठरवले आणि एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली. हेच ते अमृत फ्यूजन ज्याने पाश्चात्त्य जगाला ‘अमृत’ची दखल घेण्यास भाग पाडले.

झाले असे की, ब्रिटनमधले जिम मरे यांनी २००३ पासून सुरू केलेल्या ‘जिम मरेज् व्हिस्की बायबल’ या उपक्रमाला व्हिस्कीप्रेमींमध्ये अल्पावधीत प्रतिष्ठा मिळाली होती आणि या ‘बायबल’चा अभिप्राय शिरसावंद्या मानला जाऊ लागला होता. या जिम मरे यांच्याकडे ‘अमृत फ्यूजन’ पाठवताना कोणीही कल्पना केली नव्हती की त्या वर्षातील उत्तम व्हिस्की म्हणून तिचा सन्मान होईल. त्याबद्दल मरे यांनी लिहिले : ‘चिकन टिक्का मसाल्याचा देश आता जगाच्या व्हिस्कीच्या नकाशावरदेखील आला!’ अर्थातच त्यानंतर अमृतला मागे वळून बघण्याची गरजच पडली नाही. फक्त फ्यूजनच नव्हे तर सिंगल माल्टच्या बाटल्यांनादेखील मागणी वाढू लागली होती.

जिम मरे यांच्या कौतुकामुळे २००९ नंतर युरोपमधला मार्ग प्रशस्त झाला असला तरी अशोकला आता अमेरिका, कॅनडादेखील खुणावत होते. २००८ मध्ये जरी कॅनडात अमृतने प्रवेश केला असला तरीही म्हणावी तशी प्रगती होत नव्हती. वास्तविक २००९ च्या यशानंतर अमृतचे नाव लोकांना माहीत झाले होते त्यामुळे थोडीफार प्रसिद्धी आधीच मिळाली होती. तरीही वाट सोपी नव्हतीच. कॅनडा, अमेरिकेत राज्यागणिक मद्यासंबंधित नियम बदलत होते होते. त्यामुळे परवाना मिळवताना द्यावी लागणारी कागदपत्रे, व्हिस्कीमधील अल्कोहोलचे प्रमाण, सगळेच बदलावे लागत होते. या सगळ्यातून अशोकने कसा मार्ग काढला, कोणाकोणाची कशी मदत झाली हे सर्व मुळातून वाचण्यासारखे आहे. अमृत डिस्टिलरीने फक्त व्हिस्कीच नव्हे तर जिन आणि रममध्येही यशस्वी प्रयोग करून बघितले.

व्हिस्कीकडे फक्त एक दारू म्हणून न बघता त्याच्या एका घोटातून जाणवणाऱ्या छोट्या छोट्या चवींचा आस्वाद घेणारा एक मोठा वर्ग आहे. उत्तम खाण्याचे शौकिन असतात तसा हा वर्ग उत्तम चवींचा चाहता असतो. दारू ही नशा म्हणून करण्यापेक्षा त्यांना ती कशी केली गेली आहे, आणि त्यामुळे चवीत काय फरक पडला आहे याच्या चर्चेत जास्त रस असतो. आणि त्यामुळेच त्यासाठी कितीही किंमत मोजायची त्यांची तयारी असते. अशा काही चाहत्यांबद्दलचे प्रकरणही पुस्तकात आहे. ‘अमृत नेटिव्हिटी’च्या फक्त बेंगळूरु विमानतळाच्या ‘टर्मिनल २’मध्ये मिळणाऱ्या बाटलीसाठी दुबईहून येणाऱ्या पुनीत-शिवानीबद्दल किंवा हातावर अमृतचा ‘टॅटू’ कोरणारा स्वीडनचा चाहता डेनिसबद्दल वाचताना आपणच अचंबित होतो.

भारतात सरकारी पातळीवर मद्या उद्याोगाकडे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असेच समजले जात असले तरी त्यांना मिळणारी वागणूक याबद्दलदेखील एका प्रकरणात माहिती दिली आहे. आणि त्यामुळेच, या मद्याची भारतातील विक्री २०१० मध्येच अधिकृतरीत्या सुरू होऊनही आज केवळ पाच-सहा राज्यांतच ही उत्पादने मिळतात.

व्हिस्कीच्या जागतिक नकाशावर भारताला मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या ‘अमृत’ची माहिती पुस्तकरूपाने येणे गरजेचे होतेच. या पुस्तकात तो पूर्ण प्रवास अगदी तपशीलवार मांडलेला आहे. व्हिस्की उत्पादनाच्या प्रक्रियेत आणि चवींच्या वर्णनासाठी वापरली जाणारी परिभाषा सामान्यजनांपर्यंत सहजपणे पोहोचवणाऱ्या या पुस्तकातून व्हिस्की तयार करण्याची, तिचे ‘वय’ ठरवण्याची पद्धत, व्हिस्की टेस्टिंग या सगळ्याची माहिती येते. पुस्तकातल्या काही प्रकरणांमध्ये अशोक चोकलिंगम यांची वैयक्तिक माहिती अगदी दाताखाली खडा यावा इतकी खटकली नसली तरीही मला ती अनावश्यक वाटली- त्याउलट रक्षित जगदाळे, त्रिविक्रम निकम यांच्याबद्दलची माहिती अत्यंत संक्षिप्त, त्रोटक आहे. अशा काही गोष्टी सोडल्यास व्यवस्थापन आणि विपणन कसे करावे, नवीन उत्पादन बाजारात आणताना कोणत्या गोष्टींचा विचार केला जातो हे खरोखरीच अभ्यासण्यासारखे आहे.

पुस्तकात एका ठिकाणी अशोक चोकलिंगम म्हणतात की कोणत्याही व्हिस्कीचे नाव देताना स्थानिक संस्कृतीशी संबंधित नाव देतात मग ते उच्चारायला इतरांना सोपे नसले तरी चालेल (उदा.- ग्लेनफिडिच) मग आपण का मागे राहायचे? मग त्यातूनच कदंबम, नारिंगी, कुरुंजी, त्रिपर्व यासारखी भारतीय नावे ‘लिमिटेड एडिशन’ला दिली गेली होती. या मातीतले मद्या नसूनही या मातीचा स्वाद घेऊन येणारी अस्सल भारतीय अमृत व्हिस्की आज जगभरात भारताची शान ठरली आहे. जग जिंकण्याचे फक्त स्वप्न बघून चालत नाही… तशी गुणवत्ता असेल तर जग आपण सांगू ती किंमत द्यायला तयार असते हे अमृतने दाखवून दिले आहे. मद्याला ‘दारू’ म्हणून हिणवणाऱ्यांनीही या वेगळ्या जगाची ओळख करून घेण्यासाठी तरी हे पुस्तक वाचले पाहिजे!

‘अमृत: द ग्रेट चर्न’

लेखक : श्रीराम देवता

प्रकाशक: वेस्टलँड बिझनेस

पृष्ठे : २३२ किंमत : ६९९ रु.

manasi.holehonnur@gmail.com