स्वतंत्र भारताची घडी बसवताना सुरुवातीच्या टप्प्यात घटना समितीत अभ्यासपूर्ण सूचना आणि सडेतोड भूमिका मांडून मोलाचे योगदान देणाऱ्या, प्रसंगी सदस्यत्वाचा त्याग करणाऱ्या स्त्रियांची ओळख करून देणारे पुस्तक.

जगातील उत्कृष्ट राज्यघटनांपैकी एक भारताची आहे. समता, मानवता, धर्मनिरपेक्षता यांसारखी मूल्ये देणारे संविधान तयार करण्यास जवळपास तीन वर्षे लागली. घटना समितीत एकूण २९९ सभासद होते. त्यात १५ महिलांचा समावेश होता. त्यांचा स्वातंत्र्य आंदोलन, सामाजिक सुधारणा आदी क्षेत्रांशी जवळचा संबंध होता. लीला रॉय आणि मालती चौधरींनी राजीनामा दिल्यानंतर महिला सभासदांची संख्या १३ झाली. अॅन्जेलिका अरिबाम आणि आकाश सत्यवाली यांच्या ‘द फिफ्टीन: द लाइव्ह्ज अॅण्ड टाइम्स ऑफ द विमेन इन इंडियाज कॉन्स्टिट्युअन्ट अॅसेम्ब्ली’ पुस्तकात या १५ महिलांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या सर्व महिला पुरोगामी विचारांच्या होत्या आणि त्यांनी डॉ. आंबेडकर, पंडित नेहरू यांच्या बाजूने त्यांनी वेळोवेळी भूमिका घेतली होती. त्यापैकी सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, सुचेता कृपलानी यांच्याविषयी नवे काय सांगणार, त्यांचे कार्य तर भारतीयांना माहीत आहेच. उर्वरित १२ महिला सदस्यांच्या योगदानाविषयी या पुस्तकात काय आहे?

● दुर्गाबाई देशमुख

१९०९ मध्ये काकीनाडाच्या ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या दुर्गाबाईंच्या लहान वयातच, वडिलांनी त्यांचे लग्न एका जमीनदाराच्या मुलाशी लावले; पण वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी नवऱ्याकडे राहायला जाण्यास नकार दिला. तोवर गांधीजींच्या प्रभावामुळे, दुर्गाबाई सामाजिक कार्यात सक्रिय झाल्या होत्या. गांधी काकीनाडा इथे आले असता दुर्गाबाईंनी महिलांची सभा आयोजित केली. त्या महिलांनी स्वातंत्र्य आंदोलनासाठी २५ हजार रुपये दिले. काकीनाडाच्या मुख्य सभेत गांधीजींच्या हिंदी भाषणाचा अनुवाद दुर्गाबाई तात्काळ करत होत्या. दक्षिण भारतात मीठ सत्याग्रहात त्यांचा पुढाकार होता.

१९४६ मध्ये त्या घटना समितीत निवडून आल्या. दुर्गाबाईंनी व्यक्तिगत स्तरावर आणि इतरांबरोबर मिळून अशा एकूण ७५० हून अधिक दुरुस्त्या सुचवल्या होत्या. राज्यसभेच्या सभासदासाठी किमान वय (३५ ऐवजी) ३० करण्याचे श्रेय दुर्गाबाईंचे. त्या स्वत: हिंदीच्या शिक्षिका होत्या तरी हिंदी नाही, हिंदुस्थानी राष्ट्रभाषा असावी असे मत त्यांनी मांडले. घटना समितीतील दुर्गाबाईंचे काम पाहून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर चिंतामण देशमुख (सीडी) प्रभावित झाले. सीडी यांनी १९५१ मध्ये सादर केलेले बजेट ‘श्रीमंतांचे’ असल्याची टीका दुर्गाबाईंनी केली होती, पण दुर्गाबाई आणि देशमुख यांच्यात लवकरच स्नेह जमला आणि ते विवाहबद्ध झाले.

● राजकुमारी अमृत कौर

राजघराण्यात जन्मलेल्या अमृत कौर यांच्यावर गोखले आणि गांधींचा प्रभाव होता. १९३० मध्ये मुंबईत मिठाच्या सत्याग्रहात त्यांना अटक झाली. १९३४ पासून त्या सेवाग्राम आश्रमात राहू लागल्या. काँग्रेसच्या कार्यकारिणीत एकही महिला नसल्याबद्दल एप्रिल १९३६ मध्ये अमृत कौर यांनी नेहरूंवर टीका केल्यानंतर त्याच वर्षी डिसेंबरात सरोजिनी नायडू यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले. १९३७ मध्ये वायव्य सरहद्द प्रांतातील पश्तून लोकांवर करण्यात आलेल्या अत्याचाराच्या विरोधात त्या सक्रिय होत्या. त्यांच्यावर ब्रिटिशांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात त्या आरोग्यमंत्री होत्या. एम्सची आखणी कौर यांनीच केली होती.

● हंसा मेहता

१८९७ मध्ये जन्मलेल्या हंसा यांचे वडील बडोदे येथील महाविद्यालयात तत्त्वज्ञान हा विषय शिकवत. हंसा यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स’ येथून पत्रकारितेचा अभ्यास केला. तिथे त्यांची सरोजिनी नायडूंशी भेट झाली. गांधींचे डॉक्टर जिवराज मेहता यांच्याशी हंसा यांची भेट झाली, ‘जिवराज वैश्य होते आणि आपण नागर ब्राह्मण’ म्हणून घरच्यांनी केलेला विरोध डावलून हंसा यांनी लग्न केले. १९४७ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगाने मानवी हक्कांच्या वैश्विक जाहीरनाम्याचा मसुदा मांडलेला. त्यातल्या अनुच्छेद १ मध्ये म्हटले होते, ‘प्रत्येक पुरुष जन्मत: स्वतंत्र आहे व त्यांना समान अधिकार आहेत.’ भारताच्या प्रतिनिधी हंसा यांनी ‘प्रत्येक पुरुष’ या शब्दांवर आक्षेप घेतलेला. ‘प्रत्येक मानव’ हा पर्यायी शब्द देण्यात आला.

● अम्मू स्वामीनाथन

१८९४ मध्ये जन्मलेल्या अम्मू यांचे वयाच्या १३ व्या वर्षी २० वर्षे मोठ्या असलेल्या सुब्बारामा स्वामीनाथन यांच्याशी लग्न झाले. वयाच्या विसाव्या वर्षीच त्या राजकारणात आणि महिलांच्या प्रश्नावर सक्रिय झाल्या. मताधिकार सार्वत्रिकच असला पाहिजे, अस्पृश्यता आणि बालविवाहवर बंदीच हवी, हे मुद्दे त्यांनी घटना समितीत मांडले. आझाद हिंद फौजेच्या कॅप्टन लक्ष्मी सेहगल आणि प्रसिद्ध नर्तिका मृणालिनी (डॉ. विक्रम साराभाई यांच्या पत्नी) या त्यांच्या मुली.

● अॅनी मस्केरीन

त्रावणकोर येथील कॅथलिक कुटुंबात जन्मलेल्या ॲनी यांनी इतिहास आणि अर्थशास्त्रात एम.ए. केले. २३ वर्षांच्या असताना १९२५ मध्ये त्यांनी सिलोनमधल्या (आताचा श्रीलंका) महाविद्यालयात प्राध्यापकी स्वीकारली. त्रावणकोरच्या महाराणी सेतू लक्ष्मी यांनी १९२७ मध्ये मुलींसाठी कायद्याचा अभ्यास सुरू केला; तेव्हा अॅनी कायद्याची पदवी घेण्यासाठी परत आल्या. त्रावणकोर संस्थानच्या भारतातील विलिनीकरणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनांत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्रावणकोर विधानसभेच्या प्रतिनिधी म्हणून डिसेंबर १९४८ ला घटना समितीच्या सभासदपदाची शपथ घेतली. नंतर त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन अपक्ष म्हणून थिरुवनंतपुरम येथून १९५२ च्या निवडणुकीत विजय मिळविला.

● बेगम कुदसिया एजाज रसूल

पंजाबच्या ऐतिहासिक मलेरकोटला येथील राजघराण्यात जन्मलेल्या कुदसिया या मुस्लीम लीगच्या प्रतिनिधी म्हणून घटना समितीत निवडून गेल्या असल्या तरी त्या स्वतंत्र मतदारसंघांच्या विरोधात होत्या. त्यांचे पती रसूल मुस्लीम हे १९३७ मध्ये लीगचे संयुक्त प्रांताचे सचिव होते. कुदसिया आणि रसूल यांची पाश्चात्त्य राहणी लीगमधील अनेकांना खटकत असे. फाळणीनंतरही रसूल दाम्पत्य भारतातच राहिले, १९५० मध्ये कुदसिया काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर गेल्या.

● दक्षायनी वेलायुधन

या घटना समितीत एकमेव दलित महिला होत्या. महात्मा गांधीच्या अनुयायी होत्या. पाच वर्षांहून अधिक काळ शिक्षक म्हणून काम केल्यानंतर सप्टेंबर १९४० ला सेवाग्राम आश्रमात, वेलायुधन यांच्याशी त्यांचा विवाह झाला. १९५२ मध्ये वेलायुधन लोकसभेत निवडून आले. भारताचे पहिले दलित राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचे ते काका. घटना समितीत दलितांच्या परिस्थितीबद्दल दक्षायनी यांनी १९ डिसेंबर १९४६ च्या पहिल्या भाषणात सविस्तर मांडणी केली आणि जातमुक्त समाज अस्तित्वात यावा, अशी आशा व्यक्त केली होती. त्या स्वतंत्र मतदारसंघांच्या विरोधात होत्या. जातिवाद, अस्पृश्यता, हिंदू-मुस्लीम यांसारख्या विषयांवर त्या परखड मत मांडत.

● कमला चौधरी

लखनऊ इथे १९०८ मध्ये जन्मलेल्या कमला यांचे वडील डेप्युटी कलेक्टर होते. कमला हिंदी साहित्यात एमए व गाजलेल्या लघुकथाकार होत्या. १९३० पासून असहकार आंदोलनात त्या पुढे होत्या. संयुक्त प्रांतातून त्या घटना समितीत निवडून आल्या होत्या. हिंदू कोड बिलच्या बाजूने होत्या.

● लीला रॉय

आसामात २ ऑक्टोबर १९०० रोजी जन्मलेल्या लीला यांचे वडील स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय होते. रवींद्रनाथ टागोर यांना त्या पहिल्यांदा १९२५ मध्ये भेटल्या. लीला आणि त्यांचे पती अनिल हे सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी प्रेरित झाले होते. १९३१ मध्ये ढाका मॅजिस्ट्रेटच्या हत्येबद्दल लीला यांना अटक झाली. ‘जयश्री’ हे मासिक त्यांनी दीर्घकाळ चालविले नेताजींच्या पक्षाचे मुखपत्र ‘फॉरवर्ड ब्लॉक’चे संपादन लीला करत. जवाहरलाल नेहरूंसह झालेल्या बैठकीत जेव्हा त्यांच्या लक्षात आले की आता फाळणीला पर्याय नाही तेव्हा त्यांनी लगेच घटना समितीतून राजीनामा दिला. दंगलग्रस्त नोआखालीत जाऊन मदत आणि पुनर्वसनाच्या कामाची सुरुवात केली. फाळणीच्या प्रस्तावाच्या विरोधात काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी गांधीजींना सांगितले. त्यावर गांधीजी म्हणाले- ‘तू नेहरू आणि सरदार पटेल यांना भेट. फाळणीच्या विरोधात जर तू आंदोलन उभं केलंस तर मी तुझ्याबरोबरच असेन,’ पण लीला यांचे शहर- ढाका- पाकिस्तानात गेले. दोघे ढाक्यातच राहिले. पाकिस्तान सरकारने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढल्यावर ते पश्चिम बंगालमध्ये आले.

● मालती चौधरी

कलकत्त्यात १९०४ मध्ये जन्मलेल्या मालती गांधी, नेहरूंना अटक झाल्यावर त्या भूमिगत झाल्या. त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या ओडिशात जाऊन स्वत:ला अटक करून घेतली. १९४६ मध्ये त्यांना घटना समितीत पाठवण्यात आले. मात्र नंतर, दंगली सुरू असताना आपण घटना समितीत बसणे योग्य नाही, असे सांगून त्यांनी राजीनामा दिला. १९५२ मध्ये त्यांचे पती नबकृष्ण चौधरी हे मुख्यमंत्री असताना, त्यांच्या सरकारवर मालती यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला (आजच्या काळात अशी कल्पनाही कोणी करू शकणार नाही) नबकृष्ण यांनी १९५६ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा आणि काँग्रेसचा राजीनामा दिला.

● रेणुका रे

रेणुका यांचा जन्म आजच्या बांगलादेशातला. गांधीजी सप्टेंबर १९२० मध्ये कलकत्ता येथे आले, तेव्हा कॉलेजात शिकणाऱ्या रेणुका यांचे आयुष्य बदलून गेले. पुढे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथे शिकताना रेणुकाचे पुरोगामी आणि समाजवादी विचार अधिक मजबूत झाले. हेरॉल्ड लास्की, क्लेमन्ट अॅटली यांसारखे शिक्षक तिथे होते. गांधींच्या सांगण्यामुळे १९४६ मध्ये त्या घटना समितीत निवडून आल्या. १९५२च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. नेहरूंनी त्यांना आणि दुर्गाबाईंना राज्यसभेत पाठवण्याची तयारी दाखवली. पण ते दोघींना मान्य नव्हते. रेणुका यांचे पती सत्येन रे पश्चिम बंगालचे मुख्य सचिव होते. १९५७ आणि १९६२ च्या निवडणुकीत मालदा मतदारसंघातून त्या लोकसभेत निवडून आल्या, पण १९६७ मध्ये काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली.

● पूर्णिमा बॅनर्जी

२६ जानेवारी १९३२ ला पूर्णिमा यांना अटक करण्यात आली होती. विधान परिषदेच्या सभासदासाठी किमान वय ३५ऐवजी ३० असावे, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. घटना समितीतील ज्या महिलांच्या जागा विविध कारणांनी रिक्त झाल्या, त्यांच्या जागेवर महिलेलाच संधी देण्यात यावी, अशी मागणी पूर्णिमा यांनी केली होती, मात्र ती पूर्ण झाली नाही. अशा या १५ शूर महिला होत्या. स्वातंत्र्य, समता त्यांचे स्वप्न होते. हे पुस्तक भारतीय संविधानाच्या जडणघडणीतील त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकते.

‘द फिफ्टीन: द लाइव्ह्ज ॲण्ड टाइम्स ऑफ द विमेन इन इंडियाज कॉन्स्टिट्युअन्ट ॲसेम्ब्ली’

लेखकअँजेलिका अरिबाम, आकाश सत्यवाली

प्रकाशक : हॅचेट

पृष्ठे : ३१०; किंमत: ७९९ रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

jatindesai123@gmail.com