दहशतवाद निपटून काढायचा असेल तर संबंधित भागात वावरणाऱ्या विविध सरकारी सुरक्षा यंत्रणांनी स्थानिक प्रशासन, स्थानिक लोक यांच्याशी आदराने वागणे, त्यांच्या संपर्कात राहणे, त्यांच्याशी नेहमी संवाद करणे आवश्यक ठरते. स्थानिक लोकांच्या मनात या यंत्रणांविषयी विश्वास निर्माण झाल्याशिवाय ते कोणतीही माहिती देणार नाहीत.
मोदी-शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजपने पहलगामवरील हल्ल्याचा अचूक अंदाज लावता न आल्याची जबाबदारी स्वीकारणे आणि २४ एप्रिल रोजी दिल्ली येथे त्यांचे मंत्री किरण रिजिजू यांनी सर्वपक्षीय बैठकीत ‘आपण दोषी आहोत’ असे मान्य करणे, ही गोष्ट अत्यंत सौजन्यपूर्ण होती. अशा उघड अपयशाच्या वेळी सत्ताधारी पक्षाने जबाबदारी नाकारणे किंवा सबबी सांगणे ही नेहमीची प्रथा आहे. पण अलीकडच्या काळात प्रथमच एखाद्या पक्षाने स्वत:चा दोष मान्य करण्याचे अकल्पनीय पाऊल उचलून संपूर्ण देशाला एकजुटीने आपल्यामागे उभे केले.

१९८०च्या दशकात पंजाबमध्ये दहशतीविरोधातील लढ्याच्या अग्रस्थानी असलेल्या एका माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या नात्याने, या लेखाची सुरुवात मी दहशतीच्या अंगभूत स्वरूपाची वाचकांच्या स्मृतीत उजळणी करून करत आहे. ‘दहशतवाद’ या शब्दावरूनच स्पष्ट होते की, दहशतवाद्यांचे उद्दिष्ट असते ते त्यांच्या बळींच्या तसेच मोठ्या लोकसंख्येच्या मनात भीती निर्माण करणे. ते हे उद्दिष्ट निष्पाप लोकांची अचानक हत्या करून साध्य करतात. कुरणात चरणारी हरणे ज्याप्रमाणे वाघसिंहांपासून लांब राहतात, तसाच या सामान्य माणसांचाही स्वभाव असतो.

गाफील राहणे भोवले

दहशतवादी अशा वेळी आणि अशा ठिकाणी हल्ला करतात, जिथे त्यांच्याकडून हल्ला होईल अशी शक्यता सगळ्यात कमी गृहीत धरलेली असते. १९८५ मध्ये त्यांनी आपल्या विध्वंसक कारवाया सुरू केल्या, तेव्हा अमृतसर आणि तरनतारन हे त्यांच्या कार्यासाठी पोषक भाग होते. हे जिल्हे सुरक्षा दलांनी पूर्णपणे घेरल्यावर त्यांनी अंतर्गत भागांवर हल्ला केला. जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांनी पंजाबमधील दहशतवादाचा इतिहास अभ्यासला असता तर त्यांनी हा परिसर असंरक्षित ठेवला नसता.

या वर्षी पहलगामला पर्यटकांची प्रचंड गर्दी होत होती. पर्यटन संयोजकांना सापडलेल्या या विस्तीर्ण कुरणावर शालेय सहली नियमितपणे आयोजित केल्या जात. कारण घोडेस्वारीसाठी हे कुरण आदर्श होते. गस्त घालणाऱ्या स्थानिक पोलिसांनी त्यांचे काम जबाबदारीने केले असते तर त्यांनी या पठारावर पर्यटकांचा ओघ वाढल्याची माहिती त्यांच्या वरिष्ठांना दिली असती आणि या वरिष्ठांनी श्रीनगरला या नवीन पर्यटन स्थळाबद्दल सतर्क केले असते.

स्थानिकांना विश्वासात घ्या

ज्यांच्यावर ही कारवाईची जबाबदारी होती, त्यांनी गस्त पोलीस व्यवस्था (बीट पोलिसिंग) आणि मानवी गुप्तवार्ता (ह्युमिंट) या गोष्टींचे महत्त्व पुरेसे लक्षात घेतलेले दिसत नाही. स्थानिक लोकच त्यांच्या भागात आलेल्या अनोळखी लोकांविषयी किंवा एरवीपेक्षा वेगळ्या हालचालींबाबत माहिती देऊ शकतात. पण ही सगळी माहिती, शंका ते त्यांच्याशी नियमित संपर्कात असणाऱ्या, तसेच ज्याच्यावर त्यांना विश्वास बसलेला असतो अशाच गस्त पोलिसाला सांगतात.

स्थानिक रहिवासी हे सामान्य परिस्थितीतसुद्धा पोलिसिंगच्या केंद्रस्थानी आणि अत्यंत महत्त्वाचे असतात. दहशतवादग्रस्त राज्यांमध्ये राहणारे लोक तर जीवन आणि मृत्यूदरम्यानच जगत असतात. जेव्हा काही स्थानिक लोक दहशतवादी टोळ्यांच्या संपर्कात येतात आणि त्यांच्यासोबत मिसळून जातात, तेव्हा तर मानवी गुप्त माहितीचे (ह्युमिंट) महत्त्व दहा पट वाढते.

आपल्याला आदराने, सन्मानाने वागवले जावे अशी प्रत्येक सामान्य नागरिकाची अपेक्षा असते. दहशतवादी हालचाली सुरू असतात तेव्हा तर या गोष्टीचे महत्त्व आणखीनच अधोरेखित होते. आपण दहशतवादाविरोधातील सरकारच्या लढ्याचा अविभाज्य भाग आहोत, असे स्थानिकांना वाटते तेव्हा ते आवश्यक संरक्षणात्मक उपाययोजना आखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली माहिती स्वत:हून पुढे येऊन देतात.

दहशतवादी हे सहसा संबंधित परिसरातील बहुसंख्य लोकांचा जो धर्म असतो, त्याच धर्माचे असतात. त्यामुळे स्थानिक लोकांच्या मनात आपल्या धर्मबांधवांविषयी अप्रकट सहानुभूती असणे ही एक नैसर्गिक गोष्ट असते. ही छुपी सहानुभूती सुरक्षा दलांचे काम अधिक कठीण करते. मात्र दहशतवादी सामान्य लोकांशी, विशेषत: स्थानिक महिलांशी, गैरवर्तन करतात, तेव्हा ही सहानुभूती पूर्णपणे नाहीशी होते.

दहशतवादाचे वर्णन ‘कमी खर्चाचे युद्ध’ असे केले गेले आहे! आणि हे नामकरण विनाकारण चिकटलेले नाही. दहशतवादाचा वापर नेहमीच संघर्षातील कमजोर पक्षाकडून केला जातो. दुर्बल पक्ष समोरासमोरच्या थेट लढाईत बलाढ्य पक्षाला हरवू शकत नाही. त्यामुळे तो त्या देशाविरोधातील संघर्षाशी दूरदूरपर्यंत संबंधित नसलेल्या निष्पाप नागरिकांची हत्या करून भीती पसरवण्याचा मार्ग स्वीकारतो. दहशतवाद्यांना आशा असते की भीतीने ग्रासलेले लोक सरकारवर दबाव आणतील, जेणेकरून सरकार त्यांच्या अवाजवी मागण्या मान्य करेल.

इतिहासात कोणत्याही सरकारने दहशतवाद्यांसमोर हार मानलेली नाही. दहशतवादाला त्याची उद्दिष्टे साध्य करण्यात कधीही यश आले नाही. तरीही, हे अरिष्ट सुरूच आहे. या कमी खर्चाच्या युद्धाचा एकमेव ज्ञात उपाय म्हणजे स्थानिक लोकांची हृदये आणि मने जिंकणे. स्थानिक आणि दहशतवादी सह-धर्मीय असल्याने ते सोपे नाही. परंतु प्रयत्नांनी ते घडू शकते. स्थानिकांशी आदर, प्रतिष्ठा आणि न्यायाने वागणे ही गुरुकिल्ली आहे.

जाट शीख शेतकऱ्यांनी त्यांच्या गावातील दहशतवाद्यांची माहिती पोलिसांना देण्यास सुरुवात केल्यावर पंजाबला या संकटातून मुक्तता मिळाली. के. पी. एस. गिल यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी शेतकऱ्यांवर असह्य दबाव आणला आणि त्यांना सुरक्षा दलांशी सहकार्य करण्यास भाग पाडले.

आत्मसंतुष्ट राज्यकर्ते

एखाद्या राज्यात दहशतवादी कारवाया सातत्याने होत असतात तेव्हा त्याविरोधात कोणतीही योजना आखण्याआधी स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करावा लागतो. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाया तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचे नियंत्रण करण्याची जबाबदारी तेथील नायब राज्यपालांकडे आहे. ते फार आत्मसंतुष्ट असल्याचे दिसून येते. ही गोष्ट घातक ठरली. दहशतवादग्रस्त भागात तुम्ही क्षणभरही बेसावध राहू शकत नाही!

केंद्रीय गृह मंत्रालयाची धुरा सांभाळणारे बलाढ्य नेते अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून भारतात व्हिसावर राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार करण्यास सांगितले आहे. या सगळ्यांना भारतातून हद्दपार करायची इच्छा गृहमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. पण ही एक प्रकारे उतावीळ प्रतिक्रिया वाटते. यापैकी काही पाकिस्तानी नागरिक गुप्तचर विभागाच्या (आयबी) नजरेत खुपत असतील, त्यांना भारत सोडण्यास सांगणे योग्य ठरेल, पण त्याबरोबरच बहुतांश लोक निरुपद्रवीही असतील. काही जण वैद्याकीय उपचारांसाठी आलेले आहेत. अशा लोकांना हाकलून देण्यातून काहीही साध्य होणार नाही.

आपल्या गुप्तचर यंत्रणेने हा हल्ला करणारे आणि त्यांना पाठबळ देणारे लोक शोधून काढण्यासाठी मित्रदेशांची मदत घ्यावी, कारण अनेक वेळा त्यांच्या एजंटांची पाकिस्तानमधील गुन्हेगार शोधण्यासाठीची पोहोच आपल्यापेक्षा अधिक चांगली असते. गुन्हेगारांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. हे पाकिस्तानची आयएसआय आणि आपली रॉ यांच्यामधील एक प्रकारचे बुद्धिबळाचे युद्धच असेल. पहलगामचा बदला घ्यायचा असेल तर रॉला हे युद्ध जिंकावे लागेल. आणि रॉ हे करण्यास पूर्णत: सक्षम आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून ज्या प्रतिक्रिया आल्या त्या देशाची एकजूट दाखवणाऱ्या होत्या. आपण काश्मिरी जनतेसाठी आलो आहोत असे दहशतवाद्यांचे म्हणणे असले तरी काश्मिरी लोकही या हल्ल्यामुळे संतापलेले होते. हा त्यांच्या रोजगारावर, त्यांच्या पोटावरच केलेला हल्ला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदी सरकारने पाकिस्तानला दिलेले प्रत्युत्तर देशातील सर्वधर्मीय जनतेच्या संतापावर आधारित असायला हवे होते. पण त्याऐवजी सरकारने कथित दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्याचा मार्ग स्वीकारला. असे शॉर्टकट उपाय प्राधान्याने करणे हे या सरकारच्या कार्यपद्धतीचे प्रतीक आहे. हे सरकार सतत स्वत:ला मजबूत सरकार म्हणून मिरवत राहते, पूर्वीच्या सरकारांपेक्षा वेगळे असल्याचा अभिमान बाळगते. पण या स्वस्तुतीतून ते आत्मसंतुष्ट राहिले. या सरकारने तातडीने करण्याची गोष्ट म्हणजे आपले कडक पोलिसी धोरण बदलणे. दहशतवादी ज्या समुदायातून येतात, त्या समुदायाची मने आणि विश्वास जिंकल्याशिवाय दहशतवाद संपवता येणार नाही, हा जाणकारांचा निष्कर्ष अंगीकारण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही!