अमेरिकेने आपल्या देशावर अवास्तव आयातशुल्क लादल्यामुळे आपल्या सरकारने आता स्वदेशीची घोषणा केली आहे. ती देर आये दुरुस्त आये या म्हणीप्रमाणे योग्य अन् स्वागतार्ह आहे. आता जागतिक वातावरण, राजकारण आरपार बदलले आहे. अनेक देशांत तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात म्हणता येईल असा शस्त्र संघर्ष सुरू आहे. त्यामुळे अनेकांच्या बाबतीत परराष्ट्र धोरण, राजकीय समीकरण असे सगळेच बदलले आहे. पूर्वीचे मित्र आता बोलेनासे झाले आहेत. भारताच्याच मदतीने निर्माण झालेला बांगला देश आज आपल्या विरोधात उभा आहे. या बाबतीत कुणाला दोष देण्यात ही अर्थ नाही. कारण प्रत्येकासाठी आपला देश आपली अस्मिता जास्त महत्वाची आहे. त्यामुळे प्रत्येकालाच स्वावलंबी व्हावे लागेल. अवती भवती इतकी अनिश्चितता, अशांतता, अन् गोंधळाचे वातावरण आहे की ताकदेखील फुंकून प्यावे लागेल.

संरक्षण, अवकाश संशोधन अशा अनेक क्षेत्रांत आपण एक नव्हे अनेक देशांवर अवलंबून आहोत. अनेक लशी, औषधे, उपकरणे, युद्ध सामुग्री आपल्याला आयात करावी लागते. आपण मूलभूत संशोधनावर भर देण्याऐवजी कट कॉपी पेस्ट असेच धोरण ठेवले बहुतेक क्षेत्रांत. कोऱ्या पाटीवर नवा अध्याय लिहिण्याऐवजी आयात करणे, असेंबल करणे अन् आपले स्वदेशी म्हणून स्टिकर लावणे हेच काम आपण करत आलो. चिप्स, आय सीज,मेझरिंग इक्विपमेंटस यांची आयात बंद झाली तर आपण अनेक क्षेत्रात पांगळे होऊन जाऊ ही वस्तुस्थिती आहे. काही मोजके अपवाद सोडले तर!

मला असे वाटते की ज्यांची पांढरा हत्ती म्हणून सहज गणना होईल अशा सीएसआयआर, डीआरडीओ, इस्रो, स्पेस रिसर्च, सर्व जुन्या आयआयटीज यांचे सरकारने अकॅडेमिक ऑडिट करावे, म्हणजे या संस्थेसाठी सरकार जितका अमाप पैसा खर्च करते त्या तुलनेत यांचे नेमके योगदान काय याची सखोल तपासणी करावी. लाखो रुपयाचा पगार घेणारे सायंटिस्टस,प्राध्यापक नेमके काय किती संशोधन करतात,त्यापैकी देशाच्या,समाजाच्या उपयोगाचे किती याचा खरेच शोध घ्यावा. १९७०-८० च्या दशकात सुरू झालेल्या जुन्या पाच आयआयटीतील संशोधन, आयआयटी मद्रासमधील कम्युनिकेशन, दूरसंचार क्षेत्रातील संशोधन अन् असेच काही अपवाद सोडले तर फारसे मूलभूत संशोधन झालेले नाही हे कटू सत्य. परदेशातील विद्यापीठांचे संशोधन हे डिफेन्स, स्पेस, संगणक, आयटी अशा थेट उद्योगांशी निगडीत असते. तेथील प्राध्यापकांच्या प्रकाशित संशोधन पेपरांखाली तळटीप असते- कोणत्या अनुदानाने संशोधन झाले याची. असे करार आपल्याकडे केवळ अपवादात्मक दिसतात.

आपले आयआयटीचे विद्यार्थी इथल्या शिक्षणाचा लाभ घेऊन परदेशात योगदान देतात. हे वर्षानुवर्षे चालले आहे. कोणत्याच सरकारला त्यावर उपाय शोधता आला नाही. आता स्वदेशीचा नारा दिलाच आहे तर इकडचे मूळ शिक्षण घेऊन परदेशात स्थायिक झालेल्या सर्व भारतीयांना राष्ट्रभक्तीचे, इथे परत येण्याचे आणि आपली बुद्धिमत्ता इथल्या मातीत रुजवण्याचे आवाहन करावे. पण प्रश्न असा आहे की आपले चांगले सुख शांतीचे जीवनमान सोडून ते इकडे कुठल्या आकर्षणाने येतील? आपण त्यांना स्वच्छ, नैतिक पोषक वातावरणाची, योग्य पगाराची हमी देऊ शकू का? इकडचे घाणेरडे राजकारण, सरकारच्या लाल फितीची दिरंगाई, पैसा दिल्याशिवाय कोणतेच काम होत नाही ही ‘सामाजिक श्रद्धा’ याचा सामना आपण कसा करणार आहोत? ट्रम्प यांच्या धमक्यांना तिकडे स्थिरावलेली आयटी अन् तत्सम क्षेत्रांत उत्तम काम करणारी आपली भारतीय मंडळी स्वदेशीचा नारा देत तो देश सोडण्याची धमकी देत आपल्या राष्ट्रभक्तीचे प्रदर्शन करू शकतात, पण आपल्या सरकारच्या नव्या स्वदेशी धोरणात अशा परदेशातून देशभक्तीसाठी परत येऊ इच्छिणाऱ्यांसाठी काय उपाय योजना आहेत? या संबंधात आपण काही विचार केलाय का?

आपल्याकडे बुद्धिमान युवा वर्ग आहे. त्याच्यात प्रतिभा आहे, पण आज हा युवा वर्ग भांबावलेला, धास्तावलेला आहे. तो दिशाहीन आहे. कोणी पुढाऱ्याने, आकाने हाक दिली की हाच वर्ग खांद्यावर झेंडा अन् गळ्यात उपरणे घालून लाखोंच्या संख्येने काही क्षणांत जमा होतो, पण ही गर्दी उच्च शिक्षणासाठी विद्यापीठाच्या दारात दिसत नाही. कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाच्या कार्यालयात दिसत नाही. सर्व राज्यांत उच्च शिक्षणासाठीच्या जागा चक्क खाली असतात. आयआयटीसारख्या संस्था सोडल्या तर पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांची वर्गातील संख्या नगण्य असते. विद्यापीठातील पीएचडीचे संशोधन हास्यास्पद असते. त्याचा समाजाला, देशाला काही उपयोग नसतो. मग ही परिस्थिती सुधारण्यासाठी आपण काय केले? कोणते धोरण स्वीकारले? की या प्रश्नाकडे आपले पूर्ण दुर्लक्ष झाले? हे सगळे गांभीर्याने विचार करण्यालायक मूलभूत प्रश्न आहेत. स्वदेशीचा नारा देताना समांतररीत्या या प्रश्नाचा शोध घेणे गरजेचे आहे.

आपल्याकडे संसाधने आहेत, प्रतिभा आहे, उत्साही युवा वर्ग आहे, पण गलिच्छ राजकारणाने, भ्रष्टाचारी शासन व्यवस्थेने, गुंडगिरीच्या समाजकारणाने, धर्म-जातीच्या विभाजनाने आपले सशक्त राष्ट्रीय व्यक्तिमत्व आतल्या आत पोखरले आहे. ही कीड वेळीच मुळापासून दूर करणे गरजेचे आहे. स्वदेशी नाऱ्याच्या निमित्ताने हे काम प्राधान्याने केले तर एक काय दहा ट्रम्प अंगावर घेता येतील. गरज प्रबळ इच्छाशक्तीची आहे.