डॉ. राजू अडागळे

क्रांतिगुरू लहुजी साळवे यांचा जन्म झाला त्या काळात (१४ नोव्हेंबर १७९४) भारतामध्ये जातिव्यवस्था, अस्पृश्यता खोलवर रुजलेली होती. त्यामुळे फक्त ब्रिटिश राजवटीतून देश स्वतंत्र होऊन सर्व समस्या सुटणार नाहीत, तर स्वातंत्र्याबरोबरच ‘सामाजिक समता’ प्रस्थापित करणे गरजेचे आहे हे लहुजी ओळखून होते.

लहुजींची ब्रिटिशविरोधी भूमिका

१८१७ मध्ये खडकी येथे पेशवे-ब्रिटिश लढाईमध्ये ब्रिटिशांशी लढता-लढता लहुजींचे वडील राघोजी साळवे यांना वीरमरण आले. या युद्धात विजयी झालेल्या ब्रिटिशांनी १८१७ मध्ये शनिवारवाड्यावरील भगवा ध्वज उतरवून त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीचा युनियन जॅक फडकविला. या घटनेनंतर लहुजींनी प्रतिज्ञा केली की, ‘जगेन आणि मरेन तर देशासाठी…’ १८२२ मध्ये कुस्तीच्या आखाड्याची तालीम स्थापन करून ते त्या माध्यमातून तरुणांना लष्करी प्रशिक्षण देत होते. इ. स. १८३२ मध्ये ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध उठाव करणाऱ्या क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या सैनिकांना गनिमी काव्याचे लष्करी प्रशिक्षण लहुजींनीच दिले होते. क्रांतिकारक वासुदेव फडके व लोकमान्य टिळक हेसुद्धा लहुजींचे शिष्य होते असे मानले जाते.

लहुजींचे सामाजिक क्रांतीतील योगदान

वसाहतवादाच्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रातील कर्मठ सनातन्यांचा रोष ओढवून घ्यायचा नाही, यासाठी ब्रिटिशांनी अस्पृश्यांना शिक्षण न देणेच पसंत केले. सामाजिक क्रांतीला बळ मिळण्यासाठी लहुजींनी महात्मा फुलेंना प्रोत्साहन देऊन त्यांच्यामार्फत शाळा स्थापन केल्या. लहुजींनी अस्पृश्य समाजास शिक्षणाचे फायदे सांगून त्यांच्यामध्ये स्वाभिमान निर्माण केला. महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचा कर्मठ सनातन्यांनी छळ करून स्त्री-शूद्रातिशूद्रांच्या शिक्षणात अडचणी निर्माण केल्या होत्या. त्या वेळी लहुजी हे फुले दाम्पत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. सावित्रीमाईंना शाळेत जाता-येता सनातन्यांकडून त्रास होऊ नये, यासाठी लहुजी त्यांच्या बलवान शिष्यांमार्फत संरक्षण पुरवीत होते. अस्पृश्य पालकांचे त्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाविषयी प्रबोधन करून त्यांना प्रोत्साहित केले. १८४७ मध्ये लहुजींच्या सल्ल्याने लष्करी शिक्षणाबरोबरच तालमीत प्रौढ शिक्षण देणारी रात्रीची शाळा सुरू करण्यात आली होती. या शाळेत तालमीतील अस्पृश्यांना महात्मा फुलेंनी अध्यापनाचे कार्य केले.

‘ज्ञानोदय’च्या अंकांत उल्लेख आहेत की, अस्पृश्यांच्या सामाजिक व्यवहारांवर पेशव्यांचे नियंत्रण होते. अस्पृश्यांनासुद्धा उच्चवर्णीयांप्रमाणे शिक्षण मिळावे यासाठी लहुजींच्या नेतृत्वाखाली महार-मांगांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या व्हिक्टोरिया राणीस आपल्या वस्तीस भेट देण्याचा आग्रह धरला. राणीशी झालेल्या भेटीदरम्यान अस्पृश्यांनी त्यांची कैफियत मांडली.

लहुजींनी त्यांच्या जीवनात अनेक कुप्रथा, अंधश्रद्धा, भोंदूगिरी यास कडाडून विरोध केला. १८६५ साली विधवा केशवपन कुप्रथेस विरोध करण्यासाठी नाभिक समाजाने एक दिवसाचा संप केला होता. त्या वेळी नाभिक समाजाच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी लहुजींनी घेतली होती. लहुजींचा त्यांची पुतणी मुक्ता साळवे यांच्यावर प्रभाव होता. मुक्ताने चौथीच्या वर्गात शिक्षण घेत असताना मांग-महारांच्या दुःखाविषयी एक निबंध लिहिला. ‘आमच्या अस्पृशांचा धर्म कोणता?’ हा मूलभूत प्रश्न विचारून मुक्ताने प्रस्थापित धर्मव्यवस्थेतील अनाचार, विषमता, कर्मठांचा दांभिकपणा उघड केला.

महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. लहुजींनी फुलेंना सत्यशोधक समाजाच्या स्थापनेसाठी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले. लहुजी आणि त्यांचे शिष्य फुलेंसोबत सक्रियपणे सत्यशोधक समाजाच्या स्थापनेत सहभागी झाले होते. लहुजींनी इ.स. १८७३ ते १८८० या काळात सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून अस्पृश्यांमध्ये सातत्याने प्रबोधनाचे कार्य केले. त्या वेळी समाजसुधारक व आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांची महात्मा फुलेंना जाहीर मिरवणूक काढायची होती. त्याला कर्मठ जातीयवादी विचारांच्या लोकांनी विरोध केला. मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लहुजी आणि त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने हातात दांडपट्टा घेऊन संरक्षणासाठी उभे होते.

लहुजींचा मृत्यू वयाच्या ८७ व्या वर्षी दि. १७ फेब्रुवारी १८८१ रोजी झाला. त्यांचा अंत्यविधी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, इतर सत्यशोधक मंडळी व त्यांचे शिष्यगण यांच्या उपस्थितीत ‘सत्यशोधक’ पद्धतीने संगमवाडी पुणे येथे करण्यात आला. लहुजींचा ब्रिटिश साम्राज्यशाहीला विरोध होता, त्याचबरोबर त्यांना पेशवाईची पुनर्स्थापना मान्य नव्हती. कारण, तत्कालीन पेशवे, वतनदार, जमीनदार, सावकार यांचा ब्रिटिशांविरोधी उठाव स्वहितातून निर्माण झाला होता. पेशवाईतील जातिव्यवस्थेची रचना पुनर्स्थापित करायचा त्यांचा प्रयत्न होता. तसेच, रामोशी, आदिवासी, शेतकरी या वर्गांनी ब्रिटिशविरोधी केलेल्या उठावात या लोकांनी सहभाग घेतला नाही. उलट ऐशोआरामात जीवन घालवले. याउलट, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य पुन्हा प्रत्यक्षात यावे यासाठी लहुजींचा लढा होता. सामाजिक क्रांतीत लहुजींचे योगदान पाहता, लहुजी हे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक पुनर्रचना करू इच्छिणारे धाडसी समाजसुधारक होते हे स्पष्ट आहे. सामाजिक समतेचे त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.

संगमवाडी पुणे येथे क्रांतिगुरू लहुजी साळवे यांचे स्मारक विकासाचे काम महाराष्ट्र शासनाने २०१६ पासून हाती घेतले आहे. परंतु, शासनाने स्मारकनिर्माणाकडे दुर्लक्ष करून सद्य:स्थितीत विकासाचे काम ठप्प करून ठेवले आहे. वेळेत स्मारक निर्माण व्हावे अशी महाराष्ट्रातील लहुजींच्या तमाम अनुयायांची इच्छा आहे. स्मारकनिर्मितीमुळे लहुजींचा इतिहास, त्यांची स्वराज्य-सेवा आणि त्यांचे सामाजिक योगदान उजेडात येईल. त्या माध्यमातून समाजासमोर आदर्श ठेवला जाईल. समाजासाठी विधायक कार्याची अनेकांना प्रेरणा मिळेल असे वाटते.

(लेखक महाराष्ट्र शासनाच्या ‘क्रांतिगुरू लहुजी साळवे स्मारक समिती’चे माजी सदस्य आहेत.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rajuadagale13@gmail.com