‘अखेर अँडीज पर्वताने आपल्या निसर्ग सुपुत्राला कुशीत सामावले’अशी फेसबुक पोस्ट त्याच्या मित्रांनी ‘रेस्क्यू मल्ली मस्तान बाबू’या गिर्यारोहकाच्या मृत्यूनंतर टाकली आहे. आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्य़ातील गांधी जनसंघम या छोटय़ा गावातील मल्ली मस्तान बाबू या गिर्यारोहकाने अँडीज पर्वतातील मोहिमेत आपला आवडता छंद जोपासताना निसर्गाचे देणे निसर्गाला परत केले. एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर करणारे मल्ली मस्तान बाबू हे त्यांच्या आंध्रातील पहिलेच गिर्यारोहक होते.
अर्जेटिना ते चिलीदरम्यानचा पर्वतीय भाग चढून गेल्यानंतर ते बेपत्ता झाले. त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारनेही प्रयत्न केले. अखेर सेरॉस पर्वत चढत असताना त्यांनी २४ मार्चला जी राहुटी बेस कॅम्पला उभारली होती, तेथे खराब हवामानामुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत, तेथेच त्यांचा मृतदेह सापडला. बाबू यांचे शिक्षण विझागनगरम येथे कोरूकोंडा शाळेत झाले त्यावेळी शाळेने आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तरकाशी व दार्जिलिंगला पाठवले होते. तेव्हापासून त्यांच्यात गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. २०००-२००२ मध्ये ते आयआयएमधून पदवी घेऊन बाहेर पडले. त्यांनी इंडियन माउंटनेरिंग फाउंडेशनचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता, सरकारी मदत त्यांनी कधी मागितली नाही. त्यांनी २००६ मध्ये सात शिखरे १७२ दिवसांच्या कमी काळात पादाक्रांत करण्याचा विक्रम केला होता. अर्जेंटिना व चिलीच्या हेलिकॉप्टर्सनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, एवढेच नव्हे; तर त्यांचे गिर्यारोहक मित्र त्यांना शोधण्यासाठी अँडीज पर्वतराजीत जायला सिद्ध झाले होते, पण तोपर्यंत काळ थांबणार नव्हता. मल्ली मस्तान बाबूच्या आईला म्हणजे मस्तानम्माला आपला मुलगा परत येईल याची खात्री होती . कारण असे अनेक कठीण प्रसंग आपल्या मुलाने अंगाखांद्यावर खेळवले आहेत असे त्यांचे म्हणणे होते. पण मुलाच्या मृत्यूने त्यांना शोक अनावर झाला.
नैसर्गिक संकटांना झेलून असे साहस करणारे लोक फार कमी असतात, त्यात मल्ली मस्तान बाबू होते. माणसाची मानसिकता दोन टोकांची आंदोलने घेत असते, जर्मन विंग्जच्या विमानाचा चालक फ्रान्समध्ये आल्प्स पर्वतात विमान हिमकडय़ांना धडकवून आपले नाव सगळ्यांना कळेल अशा हेतूने सर्व प्रवाशांसह विमान पाडून आत्महत्या करतो व जीवनापासून पळून जातो तर दुसरीकडे मल्ली मस्तान बाबूसारखा गिर्यारोहक तशाच एका पर्वतराजीत निसर्गाची आव्हाने स्वीकारण्याच्या प्रेरणेने एकटा वीरोचित मरण पत्करतो; हीच माणसाच्या आयुष्यातील खरी गुंतागुंत आहे.