ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा असो किंवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो, भारतीय क्रीडा पदाधिकारी नेहमी मैदानावर व मैदानाबाहेरही आपले ‘कर्तृत्व’ दाखवीत असतात. ग्लासगो येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे (आयओए) सरचिटणीस राजीव मेहता व भारताचेच आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच देविंदर मलिक यांना वेगवेगळ्या आरोपाखाली स्कॉटलंडच्या पोलिसांनी अटक केली आहे. नियमांचे उल्लंघन करीत मद्यधुंद अवस्थेत मोटार चालविली, असा आरोप मेहता यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तर मलिक यांच्यावरील आरोप आणखीच लाजिरवाणा आहे. ग्लासगो येथील हॉटेलातील स्वागतिकेशी लैंगिक गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली मलिक यांची चौकशी सुरू आहे. भारतीय ऑलिम्पिक महासंघ ही आपल्या देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च संघटना, मेहता यांच्याकडे तिच्या सचिवासारखे अत्यंत महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे त्यांचे कृत्य देशाची मान खाली जाईल असे ठरते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आपल्याला अटक केल्याची माहिती कोणास देऊ नये, अशीही विनंती त्यांनी पोलिसांना केल्याचे समजते. मुळात बेजबाबदार वर्तन करायचे आणि केवळ प्रसारमाध्यमांसमोर लपवाछपवीचा प्रयत्न करायचा अशी यांची धारणा. प्रत्येक पथकातील पदाधिकाऱ्यांकरिता स्पर्धा संयोजन समितीतर्फे क्रीडाग्राममध्ये निवासव्यवस्था असते. मात्र मेहता व मलिक यांनी त्याऐवजी हॉटेलमध्ये राहण्यास प्राधान्य दिले. उत्तराखंड ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष असताना पंधरा लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप मेहता यांच्यावर असून अद्याप या प्रकरणाची शासनाकडून चौकशी सुरू आहे. आयओए किंवा शासकीय खर्चाने विविध स्पर्धासाठी जाऊन तेथे देशाच्या प्रतिष्ठेस काळिमा लागेल, असे कृत्य आजपर्यंत अनेक वेळा भारतीय क्रीडा पदाधिकाऱ्यांकडून घडले गेले आहे. महान कुस्तीगीर खाशाबा जाधव यांनी १९५२ मध्ये हेलसिंकी येथे भारतास ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक पदक मिळवून दिले, परंतु कांस्यपदकासाठी त्यांची कुस्ती जाहीर झाली तेव्हा भारतीय संघाचे पदाधिकारी शहरात बाजारहाट करायला गेले होते. तेव्हापासून आजपर्यंत असेच प्रकार पाहावयास मिळाले आहेत. भारतीय संघाचे अनेक पदाधिकारी केवळ मौजेखातर अशा स्पर्धासाठी व्यवस्थापक किंवा अन्य तांत्रिक अधिकारी या नात्याने आपली वर्णी लावण्यात पटाईत असतात. किंबहुना आयओए किंवा अन्य खेळांच्या राष्ट्रीय संघटनांचे निवडणुकीत तडजोड होते तीच अशा बोलीवर. नवी दिल्ली येथे २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्पर्धा समितीचे सर्वेसर्वा सुरेश कलमाडी व त्यांच्या काही सहकाऱ्यांवर करण्यात आला होता. त्यांना काही महिने तुरुंगवासही झाला आहे. भारताने या स्पर्धेचे भव्य स्वरूपात यशस्वी आयोजन केले, मात्र या संयोजनापेक्षाही स्पर्धेनिमित्त झालेल्या गैरव्यवहाराचीच अधिक चर्चा झाली आणि अजूनही सुरू आहे. मैदानावरही भारतीय खेळाडूंची कामगिरी नवी दिल्लीतील स्पर्धेच्या तुलनेत निराशाजनक झाली. गतवेळी भारताने ३० सुवर्णपदकांसह १०१ पदके मिळवून पदकतालिकेत दुसरे स्थान घेतले होते. यंदा भारतीय संघ पाचव्या क्रमांकावर फेकला गेला. भारताची सुवर्णपदके निम्म्याने कमी झाली. टेनिस, तिरंदाजी, कुस्तीमधील ग्रीकोरोमन, नेमबाजीतील दुहेरीच्या स्पर्धा आदी क्रीडा प्रकारांचा यंदा समावेश नव्हता. अर्थात निराशाजनक कामगिरीचे हे कारण होऊ शकत नाही. जलतरण, अॅथलेटिक्स यांसारख्या हुकमी क्रीडा प्रकारात आपले खेळाडू खूपच मागे आहेत हे प्रकर्षांने दिसून आले आहे. ऑलिम्पिकपटू सहानाकुमारी, मायुखा जॉनी, कृष्णा पुनिया यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंना स्वत:च्या वैयक्तिक कामगिरीइतकी कामगिरीही तेथे करता आली नाही.
संग्रहित लेख, दिनांक 5th Aug 2014 रोजी प्रकाशित
भारताची ‘लाजिरवाणी’ कामगिरी!
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा असो किंवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो, भारतीय क्रीडा पदाधिकारी नेहमी मैदानावर व मैदानाबाहेरही आपले ‘कर्तृत्व’ दाखवीत असतात. ग्लासगो येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे (आयओए) सरचिटणीस राजीव मेहता व भारताचेच आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच देविंदर मलिक यांना वेगवेगळ्या आरोपाखाली स्कॉटलंडच्या पोलिसांनी अटक केली आहे.

First published on: 05-08-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ioa official rajeev mehta wrestling referee arrested in glasgow