लाखो वर्षांपूर्वी काही प्राणी जमिनीवरचा आपला वावर सोडून पुन्हा पाण्याच्या दिशेने का गेले असावेत?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रदीप रावत

सरपटणाऱ्या प्राण्यांमधून पक्षी उपजत घडत गेले! हे वरपांगी अविश्वसनीय वाटत असे! आणखी एक असेच स्थित्यंतर आहे. जमिनीवर वावरणाऱ्या काही भूचरांनी पुन्हा एकदा जलचर होत होत पाण्याचा आश्रय घेतला!! असेही स्थित्यंतर असते? भूचर असणारी कुणी सस्तन गाय मत्स्यकन्या असल्यागत उभयचरी होऊ शकते? उत्क्रांतीच्या कल्पनेची टवाळी करणाऱ्या विरोधकांच्या युक्तिवादात हा प्रश्न नेहमी टिंगलीच्या स्वरात विचारला जाई! पण त्यांनी आसपास नीट नजर टाकली असती तर या भलत्यासलत्या वाटणाऱ्या शक्यतेचा थोराड पुरावा सहजी गवसला असता! तो म्हणजे जमिनीवर चालू शकणारा पण सदा पाण्यात डुंबणारा पाणघोडा. त्याचे वैज्ञानिक नाव हिप्पोपोटेमुस आम्फिबिउस. (ग्रीक भाषेत हिप्पो म्हणजे घोडा आणि पोटेम म्हणजे नदी, आम्फिबिऊस म्हणजे एकाच वेळी भूचर आणि जलचर असणारा). हिप्पो बहुतेक काळ पाण्यात डुंबत असतात. ते कान, डोळे, नाक मिटून पाण्याखाली राहू शकतात. त्यांचे समागम, स्तनपान हे सगळे पाण्याखालीच होते. आपण व्हेल, डॉल्फिनसारख्या काही सागरी जीवांना ढोबळपणे देवमासा किंवा गाधा (वा घडय़ाळ) मासा असे म्हणतो. त्यांचे दिसणे, पोहणे, पाण्यात राहणे, माशांसारखे भासते म्हणून तसे नाव पडले. परंतु ते तर सस्तन प्राणी आहेत. उष्ण रक्ताचे आहेत. त्यांच्या डोक्यावरच्या नाकपुडीने ते श्वास घेतात आणि त्या नाकपुडीत केस असतात. पण त्यांचे अविकसित ओटीपोट, मागच्या पायांचे खुरांसारखे पुरून उरलेले घटक आणि डीएनए साधम्र्य यावरून देवमाशांचे पूर्वज भूचर होते हे खात्रीने सांगता येते. फार काय आजवर साचत आलेल्या पुराव्यांवरून हिप्पो हे देवमाशांच्या पूर्वजांपैकी आहेत अशी आता वैज्ञानिकांची खात्री होत चालली आहे.

काही प्राणी पुन्हा एकदा पाण्याकडे परतले? अशी उठाठेव कशामुळे घडली? कोटय़वधी वर्षांपूर्वी त्यांच्या पूर्वजांनी जमिनीवर आक्रमण केले होते. मग दिशा उलटून ते पाण्याकडे कसे परतले? ‘येतो माघारी जळघरी आता’ असे करण्याजोगते कोणते शरीररचनेतील बदल घडले असतील? जसे ‘सरपटय़ां’मधून ‘पक्षी’ विकसित झाले किंवा असामाजिक गांधीलमाशी वर्गातून मुंग्या घडत गेल्या. तसे या स्थित्यंतराचे पुरावे मिळतात का?

याचे उत्तर अर्थातच जीवाश्मांच्या संहितेत मिळते! जीवाश्मांचे कालानुरूप क्रम पाहिले तर ‘उभयचरी हिप्पो ते देवमासा’ असे वरपांगी भलतेसलते वाटणारे स्थित्यंतर घडू शकले याची साक्षच मिळते. व्हेलवर्गी ऊर्फ देवमासे हे सस्तन प्राणी आहेत. पण देवमाशांची काही लक्षणे भूचर नातेवाईकांपेक्षा अगदी भिन्न आहेत. उदा. मागच्या पायांचा अभाव! वल्ह्यांच्या आकाराचे असलेले पुढचे बाहू, जहाजाच्या नांगराचा फाळ असतो तशी पसरट शेपटी. नाकपुडी डोक्यावर! ओरबाड तुकडे करू शकणारे पण चर्वण न करणारे असे साधे शंकूसारखे दात. आखूड मान. पाण्याच्या पृष्ठभागाखाली ऐकू येण्यासाठी कानांमध्ये विशेष घटकांची रचना, मणक्यांच्या वरच्या अंगाला दणकट उपांगे आणि त्यांच्या आधारे पोहण्याजोगती शक्तिशाली स्नायूंची शेपटी! ६० दशलक्ष वर्षांपूर्वी सस्तन प्राण्यांचे मुबलक जीवाश्म सापडतात. पण देवमाशांचे सापडत नाहीत. पण ३० दशलक्ष वर्षांपूर्वीच्या थरात मात्र देवमाशांची हजेरी दिसते. म्हणजे या दोन कालखंडांच्या मध्ये दरम्यानच्या ऊर्फ संक्रमणी जीवांची उपस्थिती दर्शविणारे जीवाश्म सापडले पाहिजेत! सोबतचे चित्र पाहा. त्यात ५२ ते ४० दशलक्ष वर्षांपर्यंतचे जीवाश्म रेखलेले आहेत. सर्वात तळाशी असलेले ‘सांगाडा-रेखाचित्र’ इंडोहायस या प्राण्याचे आहे. हा प्राणी आकाराला साधारणत: घुशीइतपत पण थोडा मोठा असे. हा आर्टिओडाक्टिल म्हणजे ‘समखुरी’ आहे. (समखुरी म्हणजे त्यांच्या वजनाचा भार एकूण खुरांमध्ये मुख्यत: ‘सम संख्ये’च्या खुरांवर येतो) त्याच्या हाडांची घनता भूचर सस्तनांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे पाण्यात गटांगळय़ा खाण्यापासून बचाव शक्य होतो. त्यांच्या दातांत साचलेल्या समस्थानिकांवरून पाण्यातला ऑक्सिजन भरपूर शोषलेला दिसून येतो. शेव्रोटिन या वर्तमान आफ्रिकन जलचरासारखी त्याची जीवनशैली असावी. हा देवमाशांचा थेट पूर्वज नसेल पण चुलतभावंडांपैकी आहे हे नक्की.

त्याच्यावरचा सांगाडा पाकिसेटस् या प्राण्याचा आहे. त्याचे दात अधिक साधे आणि कानांची रचना देवमाशांसारखी आहे. पण अशी साधम्र्ये असली तरी तो देवमाशांसारखा दिसत नाही. आपण अगदी त्या काळात हजर असतो तरी पाकिसेटस् किंवा त्याचे जवळचे नातलग यांच्यावरून भावी संक्रमणाचा आपल्याला अंदाज आला नसता. मात्र त्यानंतरच्या काळात जीवाश्मांची एक क्रमवार मालिका मोठय़ा जलदगतीने आपल्यासमोर येते. त्यामधून जसजसा काळ लोटला तसा या प्रकाराच्या प्राण्यांनी कशी अधिकाधिक जळधार्जिणी जीवनशैली आत्मसात केली याचा बोध होतो.

५० दशलक्ष वर्षांनंतर आम्बुलोकेटिऊस (अ‍ॅम्बुलेकेटिअस) या प्राण्याची आपली गाठ पडते. याचे नावच मोठे लक्षणीय आहे. आम्बुलेर म्हणजे चालणे आणि केटुस म्हणजे देवमासा अर्थात चालणारा देवमासा! हा प्राणी लांब कवटी आणि दणकट अवयवांचा होता. त्याच्या खुरांच्या ठेवणीमुळे त्याची पूर्वज परंपरा उघड दिसते. तो उथळ पाण्यात बहुतांश वेळ वस्तीला असावा. पण सील प्राणी जमिनीवर जसे सफाईदार चालतात तसे आम्बुलोकेटिऊसचे नसावे. त्याच्या पुढचा जीवाश्म रोडोकेटुस ४७ दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे. तो आम्बुलोकेटिऊसपेक्षा अधिक प्रमाणात ‘जलचर’ होता. त्याची कवटी अधिक लांबटलेली आहे. नाकपुडय़ा काही प्रमाणात मागे सरकलेल्या आहेत. मणक्याला मजबूत विस्तारित अंगे आहेत. शेपटीचे स्नायू या उपांगांच्या आधारामुळे अधिक ताकदवान बनलेले आहेत. पोहणे उत्तम असले तरी लहान ओटीपोट आणि मागचे पाय आखूड असल्याने जमिनीवरचा त्याचा वावर अवघड जात असावा. हा प्राणी निश्चितच बराचसा काळ सागरामध्ये व्यतीत करत असावा. सरतेशेवटी ४० दशलक्ष वर्षांपूर्वी डोरुडॉन आणि बकिलोसॉरस यांचे जीवाश्म सापडतात. आखूड मान आणि कवटीच्या वर नाकपुडय़ांवरून ते पूर्णरूपाने जलचर होते हे खात्रीपूर्वक दिसते. त्याचे ओटीपोट आणि मागचे पाय फार आकसलेले आढळतात. उदा. ५० फूट लांबीच्या डोरुडॉनचे पाय केवळ दोन फूट होते. तात्पर्य ‘भूचर’ ते देवमासा ही उत्क्रांती लक्षणीय म्हणावे अशा वेगाने घडली. अवघ्या दहा दशलक्ष वर्षांच्या अवधीत या संक्रमणाचे सर्व महत्त्वाचे टप्पे पार पडले! काही प्राणी पुन्हा एकदा पाण्याकडे का परतले असतील? त्यांच्या पूर्वजांनी कोटय़वधी वर्षांपूर्वी जमिनीवर आक्रमण केले होते. मग त्यांची धाव उलट दिशेने पाण्याकडे का घडली?

याबद्दल काही निश्चित माहिती व पुरावा नाही. आपण फार तर संभाव्य परिस्थितीच्या कल्पना रचून त्याआधारे कारणांबद्दल कयास करू शकतो. डाईनासोर आणि त्यांची हिंस्र जलचर भावंडे नामशेष होणे हे एक कारण संभवते. मासेखाऊ मोसासोर इक्तोसोर लेसिओसोर या प्राण्यांनी अन्नासाठी सस्तन जलचरांशी स्पर्धा केली असेल. केवळ स्पर्धाच नाही तर त्यांचीच अन्नासाठी शिकार केली असती ही शक्यता अधिक आहे. अशा सरपटय़ा स्पर्धकांच्या नाशापोटी नाटय़पूर्ण परिस्थिती वा अवस्था उद्भवली असणार. भक्षकांचा अभाव आणि अन्नाचा मुबलक साठा असणारी सागरसृष्टी आक्रमणासाठी अनुकूल ठरली असेल. देवमाशांच्या पूर्वजांना शिरकाव करण्यासाठी ही परिस्थिती लाभदायक ठरली असणार. दुसऱ्या शब्दांत संभाव्य अनुकूलन आणि वास्तवातील अनुकूलन यामध्ये केवळ काही वा थोडय़ा जनुकीय शारीरिक बदलांचे अंतर उरले असावे! भूचर ते जलचर हा प्रवास नाटयमय आहे पण नावीन्यपूर्ण खचितच नाही. संक्रमणाचे टप्पे आणि काळ हे कमीजास्त असू शकतात. भूचर ते देवमासे असो किंवा चिम्पांझी ते माणूस.. एकूण जीवसृष्टीच्या उत्क्रांती प्रक्रियेमध्ये अतोनात असे भिन्नत्व नाही. अर्थात आपण चिम्पांझीपासून वेगळे व्हायला जेवढा काळ जावा लागला त्यापेक्षा या उत्क्रांतीला लागलेला काळ थोडा अधिक आहे. मानववंशाच्या संक्रमणासाठी शरीररचनेमध्ये तुलनेने फार कमी फेरबदल गरजेचे होते. आणखी एक पैलू नीट ध्यानी घ्यायला पाहिजे. केवळ जुन्या घटकांमध्ये फेरबदल घडल्यानेच उत्क्रांती साध्य होते. सागरी किंवा कोणत्याही जीवनशैलीचे अनुकूलन साधण्यासाठी म्हणून नव्याने अकस्मात घटक उद्भवावे अशी उत्क्रांती घडत नसते.

pradiprawat55@gmail.com

मराठीतील सर्व सृष्टी-दृष्टी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Srushti drushti aquatic millions years ago animals ground water direction change ysh
First published on: 08-04-2022 at 01:01 IST