प्रसंग पहिला-  फरारवीर (विदेशातून)- देस कब लौटू मै? आता तर त्यांनी मला फरारी घोषित करून टाकले. आणखी किती दिवस असे लपून बसायचे. ‘कंटाळा’ आ गया है यहा बैठ बैठकर।

चाणाक्य मंडळी (दिल्ली)कार्यालय – ये देखो, आणखी काही दिवस तुम्हाला तिथेच राहायचेय. येथून जसे सुरक्षितपणे बाहेर काढले तसेच परतसुद्धा आणू. त्या महाराष्ट्रात एकदा सत्ता आली की तुमचा वनवास संपला. खूपच कंटाळा येत असेल तर तिथल्या एखाद्या पोलीस ठाण्यात तुम्ही जाऊन बसू शकता. तशी व्यवस्था करता येईल पण फक्त पाहुणे म्हणून! तिथे तुमचा खिसा खाजवणार नाही याची काळजी घ्यावी लागेल..

फरारवीर- सर, जले पे नमक मत छिडको. आता ते माझी मालमत्ता जप्त करतील..

चाणाक्य- एक नंबरचीच जप्ती होईल ना! दोन नंबरची तर तशीच राहील. एकदा सत्ता मिळाली की सारी कारवाई मागे घेऊ. आणि आपल्याकडे सगळे डाग धुवायची वॉशिंग मशीन आहे. त्यातून बाहेर पडले की स्वच्छ चारित्र्याचे म्हणून ओळखले जाल तुम्ही.

फरारवीर- त्या अनिलबाबूंना तरी लवकर जामीन द्या म्हणजे माझ्यावरचा माध्यमरोख तरी दुसरीकडे वळेल.

चाणाक्य- त्यांचा पक्ष अजून सहकार्यासाठी तयार होत नाही, त्यामुळे ते शक्य नाही. आता तो पक्ष फुटण्याची वाट बघतोय आम्ही. आणि माध्यमांची काळजी करू नका. ते जेवढी बदनामी करतील तेवढी तुमची देशभक्ती मोठी असा प्रचार करण्याचे काम आमचे

फरारवीर- सगळे म्हणतात आरोप करणारा फरार, झेलणारा कोठडीत..

चाणाक्य- अरे बाबा हा २०१४ नंतरचा भारत आहे. खरे स्वातंत्र्य व सत्ता यात ताळमेळ साधणारा. तुम्ही जर खोटय़ा स्वातंत्र्यात रमणाऱ्यांच्या कळपात राहिले असते तर त्या वाझेसोबत कधीचेच कोठडीत गेले असते. तुम्ही आमच्या बाजूने येऊन खऱ्या स्वातंत्र्याची बूज राखलीत; तुमचीही काळजी घेतली जाईल.

फरारवीर- पण राज्याने गुन्हे दाखल करण्याचा सपाटा सुरू केला. माझे म्हातारपण कोर्टकचेरीतच जाणार..

चाणाक्य- कितीही गुन्हे दाखल झाले तरी आमच्या मदतीशिवाय ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही हे लक्षात ठेवा. आणि कोर्टकचेरीची भीती बाळगू नका. परत आल्यावर घटनात्मक संरक्षण असलेले पद तुम्हाला देऊ. तशीही मेघालयात एक जागा लवकरच रिकामी होतेय.

फरारवीर- मला घरची आठवण येते. मागे पत्नीला दोन कंपन्यांच्या संचालकपदावरून काढून टाकले.

चाणाक्य- आणखी काही दिवस कळ सोसा. सध्या तरी आम्ही त्यांची काळजी घेत आहोत. भाभींना लवकरच आणखी दोन संचालकपदे मिळतील. ये भाईकी जुबान है.

फरारवीर- (खूश होत) रिकामा वेळ आहे तर आत्मचरित्र लिहू का?

चाणाक्य- गुड आयडिया. तसेही तुम्ही सध्या राज्यात सत्तेत असलेल्या पक्षांच्या राजवटीत बराच काळ काम केले. त्यातल्या नेत्यांविषयी आणखी काही गौप्यस्फोट करता येतील तर बघा. मात्र लिहिलेले प्रत्येक पान आधी मंजुरीसाठी माझ्याकडे पाठवा. त्यात दम असेल तर प्रसिद्धीचा नवा बार उडवून देऊ. बाकी सब ठीक ना. देन ओके! मलाही अंतर्गत सुरक्षेसंबंधीच्या दोन बैठकींना जायचेय. प्रसंग दुसरा- भायखळा कारागृहाची कोठडी – रात्रीच्या जेवणासोबत अनिलबाबूंना नवाबभाईंनी पाठवलेले एक पत्र मिळते. त्यात वर झालेला संवाद जसाच्या तसा उतरवलेला असतो. वाचून अस्वस्थ झालेले अनिलबाबू मग थेट साहेबांनाच पत्र लिहायला घेतात.